Friday, May 10, 2019

डोंगरची काळी मैना बाजारात ......

अकोले तालुक्यातील पश्चिम भागात घाटमाथ्यावर असणा-या राजूर परिसरातील रंधा माळेगाव जंगलात रानमेव्याचे आगमन झाले असुन डोंगरची काळी मैना या नावाने ओळख असलेली करवंदे राजुरच्या बाजारपेठेत यांच आगमन झाल आहे.
      अकोले तालुक्यातील पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगेचे साम्राज्य पसरलेले आहे. या डोंगररांगेमध्ये डोंगरची काळी मैना (करवंदे) पिकायला आता  सुरुवात झाली आहे. तसं म्हटलं तर करवंदाचा सिजन हा एप्रिल व मे महिण्यातच असतो.डोंगराळ भागात पिकणारा हा रानमेवा तसा दुर्मिळच.पण चवीने आंबट गोड पण चवीष्ट असणारे हे फळ बघता क्षणीच कुणालाही हेवा वाटावा असच आहे.डोंगराच्या चढ उताराला सध्या करवदांच्या असंख्य जाळ्या ह्या काळ्याभोर फळांनी भरगच्च लगडलेल्या अवस्थेत दिसुन येत आहे.रंगाने काळ्या व डोंगराच्या पायथ्याशी हे फळ आढळत असल्याने या करवंदालाच डोंगरची 'काळी मैना  'या नावानेही ओळखलं जातं.त्यातच शाळेला सुट्ट्या लागल्याने बरेचशी शाळकरी किलबिल कंपनी पाटी घेऊन भल्या सकाळीच अनवाणी पायाने जंगलाची वाट धरताना आता दिसु लागली आहेत.पाटीभर करवंद खुडायची आणि राजुरच्या बाजारपेठेची वाट धरायची असा नित्याचाच कार्यक्रम या चिमुरड्यांचा होऊन बसलाय.पळसाच्या किंवा चांद्याच्या पानाचा डोमा तयार करायचा आणि राजुरच्या बस स्टँडवर एस टी बस भोवती जोरात 'करवंद घ्या.....करवंद ...'अशी साद घालत ही चिमणी पाखरं अगदी ठेक्यात करवंद घेण्याची प्रवाशांना विनंती करताना दिसत आहेत.तर भंडारदरा व हरिश्चंद्रगड पर्यटनासाठी आलेली एखादी गाडी दिसली तर करवंद विकणारी ही किलबिल टोळी त्या गाडीलाच गराडा घालते.त्यावेळी नक्की कोणाची  करवंद विकत घ्यावी हा मोठा प्रश्न भंडारदरा,हरिश्चंद्र,रंधा सहलीसाठी आलेल्या निसर्गप्रेमींना पडतो.ज्याची करवंद विकत घेतली जातील त्या मुलाला आभाळ ठेंगणं झालेलं असतं.एक करवंदाचा डोमा साधारणत: पाच ते दहा रुपयापर्यंत विकला जातो.दिवसभरात शंभर ते दिडशे रुपयापर्यंत या मुलांची विक्री होते.तर रंधा,माळेगाव,केळुंगणया गावावरून वयोवृद्ध आजी छोटी-छोटी मुले ही पाच दहा किलोमीटर असणा-या गावांवरून येऊन करवंद विकत आहेत.त्यांना या करवंदाच्या विक्रितुन येणा-या पैशातुन स्वत:च्या शाळेचा खर्च भागवायचा आहे.शाळा उघडल्यावर नविन ड्रेस,वह्या, पुस्तके घेण्याची ईच्छा या लहानग्यांनी बोलुन दाखविली आहे.तर काही चिमुकली ही घरखर्चासाठी आई वडिलांना मदतीचा हात पुढे करत आहे.उन्हातान्हात आदिवासी मुलांची चरितार्थासाठी चाललेली ही पायपीट बरीच काही शिकवणारी असल्याची भावना काहीजन बोलुन दाखवतात तर उडदावणे,पांजरे,घाटघर, शिंगणवाडी या अतिदुर्गम आदिवासी भागातील महीलाही सकाळी सहा वाजल्यापासुन करवंद गोळा करण्यासाठी काटेरी जाळीत घुसुन करवंद खुडत असतात.
    घाटघर,शिंगणवाडी,मुरशेत,बारी,रतनवाडी, कोलटेंभे,या परिसरात करवंदाचे साम्राज्य हे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे.या भागामध्ये राहाता,शिर्डी,राहुरी,कोल्हार,संगमनेर,अकोले सारख्या प्रगतशिल गावामधुन काही व्यापारी हे घाटघर परिसरात येऊन मिठाच्या मोबदल्यात किंवा १० ते १५ रु किलो ने कवढी मोल भावाने खरेदी करतात.या रानमेव्याला सध्या फक्त राजुर,अकोले,घोटी तसेच शेंडी (भंडारदरा) अशाच ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध असते. आदीवासी महामंडळ हे आदिवासी भागातुन हिरडा सारख्या मालाची खरेदी करुन योग्य हमी भाव देत असते.या अतिदुर्गम भागामध्ये डोंगरची काळी मैना या नावाने ओळखली जाणारी करवंद जर आदिवासी महामंडळाने खरेदी केली व योग्य हमी भाव दिला तर आदिवासी पट्टयातुन नारायणगाव सारख्या एम.आय.डि.सी.मध्ये रोजगारासाठी जाणारा लोंढा हा थबकला जाऊ शकतो.ग्रामीण आदिवासी बांधव हा करवंदाच्या रुपाने नविन रोजगार तयार करुन आपल्या संसाराला निश्चितच हातभार लावु शकतो.या डोंगरी मैनेचे जर आकर्षक असे पँकिंग तयार करुन ते पुणे व मुंबई सारख्या बाजारपेठेत जर महामंडळाने पाठवली तर निश्चितच ही काळी मैना ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याचा मार्ग खुला होईल.
       भंडारद-याच्या अभयारण्यात दरवर्षी चैत्र महिण्यात पिकणा-या करवंदाच्या जाळ्या यावर्षी वैशाख महिना सुरु असुन अजुनही म्हणावी तशी पिकलेली आढळुन येत नाही.उशीरा करवंद पिकत असल्याकारणाने निसर्गाचे कालचक्र तर बदलले नाही ना ? अशी शंका उपलब्ध होऊ लागली आहे.यंदा करवंदं उशीरा पिकत असल्या कारणाने काही आदिवासी बांधव उशिरा पाऊस सुरु होणाची ही लक्षणं असल्याचे काही आदिवासी बांधव सांगत आहेत.
      यावर्षी काही अज्ञान व्यक्ती मुद्दाम होऊन डोंगरांना आग लावीत असुन या आगिच्या भक्षस्थानी या करवंदाच्या जाळ्या सापडत असुन त्याचे अस्तित्व संपत चालेले आहे.याशिवाय नविन झाडेही लावली जात नसल्याकारणाने रंधा, माळेगाव,भंडारदरा गावाच्या आसपास सापडणा-या करवंदाच्या जाळ्याही सापडणे अवघड झाले.वनविभागाने या झांडाचे संगोपन करणेगरजेचे झाले आहे.

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...