Writing
भंडारदरा-कळसूबाई परिसरात पर्यटकांची मांदियाळी; वाहतूक कोंडीने प्रशासनाची कसोटी
अकोले, ता. १६ : स्वातंत्र्यदिनाची सुटी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या सलग सुट्यांमुळे अकोले तालुक्यातील पर्यटन पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, कळसूबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड परिसरात लाखो निसर्गप्रेमी पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळाली. सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, काळ्याकभिन्न कातळावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, धुक्याची दुलई आणि निसर्गाचा मनोहारी आविष्कार पाहून पर्यटक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नगरसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक भंडारदरा परिसरात दाखल झाले. कळसूबाई शिखर, घाटघर, रतनवाडी, भंडारदरा धरण परिसर तसेच हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या मार्गांवर दिवसभर पर्यटकांची वर्दळ सुरू होती. डोंगरदऱ्यांमधून फेसाळत खाली येणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी पर्यटकांनी मोबाईल व कॅमेऱ्यांमध्ये क्षण कैद केले. अनेक पर्यटकांच्या तोंडून ‘वा क्या बात है!’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत होत्या.
पर्यटकांची संख्या वाढल्याने परिसरातील हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट आणि व्हिला मोठ्या प्रमाणावर बुक झाले होते. अनेक ठिकाणी निवासाची व्यवस्था उपलब्ध न झाल्याने पर्यटकांनी टेंटचा आधार घेतला. त्यामुळे पर्यटनस्थळांच्या परिसरात तात्पुरत्या कॅम्पिंगलाही मोठी मागणी दिसून आली.
दरम्यान, पर्यटकांच्या वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने भंडारदरा, शेंडी, घाटघर, रतनवाडी तसेच कळसूबाईकडे जाणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. चारचाकी, दुचाकी आणि एशियाड बसची मोठी गर्दी झाल्याने काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अरुंद घाटरस्ते आणि मोठ्या प्रमाणातील वाहनांमुळे वाहतूक सुरळीत ठेवणे पोलिसांसमोर आव्हान ठरले.
एकेरी वाहतुकीमुळे अपघातांना आळा
राजूर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी परिस्थितीचा अंदाज घेत एकेरी वाहतुकीचे नियोजन केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहतूक नियंत्रित करण्यास मदत झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांचे प्रमाण कमी राहिल्याचे दिसून आले. गर्दीच्या ठिकाणी वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात आले.
मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांकडून मद्यपान केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले. रस्त्यांवर तसेच पर्यटनस्थळांच्या परिसरात मद्यपी पर्यटकांवर करडी नजर ठेवण्यात आली. त्यामुळे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण तुलनेने कमी दिसून आले. पोलिसांच्या कारवाईच्या धाकामुळे पर्यटनाचा आनंद घेताना शिस्त पाळण्याकडे पर्यटकांचा कल दिसून आला.
निसर्गसौंदर्याबरोबर सुरक्षेलाही प्राधान्य
पावसाळ्यात डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची, घसरून पडण्याची तसेच अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. धबधबे, कड्यांचे टोक आणि खोल दऱ्यांच्या परिसरात विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
सलग सुट्यांमुळे अकोले तालुक्यातील पर्यटनस्थळांना मिळालेला हा प्रतिसाद स्थानिक पर्यटन व्यवसायासाठीही दिलासादायक ठरला. हॉटेल, खानावळी, वाहनचालक, स्थानिक विक्रेते तसेच पर्यटनाशी संबंधित विविध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार व व्यवसाय मिळाला. त्यामुळे पावसाळी पर्यटनामुळे परिसरातील अर्थचक्रालाही चांगलीच गती मिळाली.
































































































