Saturday, May 30, 2026

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कोंभाळणे गावाविषयी मनोगत











 

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कोंभाळणे गावाविषयी मनोगत







 

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कोंभाळणे गावाविषयी मनोगत

 “माझे पाय मातीतच राहणार...”


पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कोंभाळणे गावाविषयी मनोगत


अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोंभाळणे हे गाव आज जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. मात्र, या यशानंतरही “माझे पाय मातीतच राहणार,” असे ठामपणे सांगणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या मनात आजही आपल्या गावाविषयी तितकाच जिव्हाळा आहे. बीजमाता म्हणून देशभर ओळख निर्माण करणाऱ्या राहीबाई आपल्या प्रत्येक यशाचे श्रेय गाव, गावकरी आणि निसर्गाला देतात.


“माझं माहेर आणि सासर दोन्ही कोंभाळणेच. माझं संपूर्ण आयुष्य या गावात गेलं. गावातली माणसं आजही कोठेही गेली की अभिमानाने सांगतात, ‘आम्ही पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे गावचे आहोत.’ हीच माझी खरी कमाई आहे,” असे त्या सांगतात.


जंगलाच्या कुशीत वाढलेल्या राहीबाईंचं बालपण अत्यंत संघर्षमय होतं. सात बहिणी आणि एक भाऊ अशा मोठ्या कुटुंबात लहानपणीच आईचं छत्र हरपलं. वडिलांनीच आईची माया देत संसार आणि मुलांचा सांभाळ केला. “गरिबीने लाजू नये; चांगल्या कामात मरून निघायचं पण सरून निघायचं नाही,” ही वडिलांची शिकवण आयुष्यभर सोबत राहिल्याचं त्या आवर्जून सांगतात.


अत्यंत हालअपेष्टांत बालपण गेले. जंगलातून सरपण गोळा करणे, मोळ्या विकणे, शेतीकाम, घरकाम या सगळ्या जबाबदाऱ्या लहान वयातच त्यांच्या खांद्यावर आल्या. शिक्षणाचा गंधही नव्हता. देवळात भरायच्या शाळेतील एक प्रसंग त्या आजही विसरलेल्या नाहीत. “गुरुजींनी मारल्यामुळे मला शाळेची भीती वाटली आणि मी पुन्हा कधीच शाळेत गेले नाही,” असे सांगताना त्यांच्या आवाजात आजही वेदना जाणवतात.


वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. संसार, मुलं, शेती आणि संघर्ष यात आयुष्य पुढे सरकत राहिलं. “मुलांना पाठीवर बांधून शेतात काम केलं. गरिबीतही आम्ही आनंदाने जगलो,” असे त्या सांगतात. आजही त्या आपल्या संघर्षाकडे खंत म्हणून नव्हे, तर ताकद म्हणून पाहतात.


कोंभाळणे गावाची ओळख पूर्वी कुस्तीपटूंमुळे होती. गावातील अनेक पहिलवानांनी पंचक्रोशीत नाव कमावले. “त्यांनी गाव सोडलं नाही, याचाही अभिमान वाटतो,” असे त्या सांगतात. पुढे देशी बियाण्यांच्या जतनासाठी केलेल्या कार्यामुळे राहीबाईंची ओळख देशभर पोहोचली. केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.


मात्र, इतकी मोठी ओळख मिळूनही राहीबाईंची मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. “आम्ही जंगलचे राजे आहोत. यापेक्षा मोठी पदवी कोणती?” असे त्या अभिमानाने म्हणतात.


गाव बदलत असले तरी आदिवासी भागातील समस्या मात्र कायम असल्याची खंत त्या व्यक्त करतात. “दवाखाना आहे पण उपयोग नाही. पाणी आठ-आठ दिवस येत नाही. रस्त्यांची कामं वर्षानुवर्षे अपूर्ण आहेत. लोक आजारी पडतात. आम्ही कसं जगायचं ते सरकारने सांगावं,” असा सवाल त्या करतात.


“देशात भव्य विकास होतोय, पण आदिवासी भागाकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे. किमान प्राथमिक गरजा तरी पूर्ण करा आणि आम्हाला माणसासारखं जगू द्या,” अशी आर्त मागणी राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली.


(शब्दांकन : शांताराम काळे)

Thursday, May 21, 2026

लग्न वाढदिवस

प्रिय अहो, आज आपल्या लग्नाला ३४ सुंदर वर्ष पूर्ण झाली… ही ३४ वर्ष म्हणजे फक्त काळाचा प्रवास नाही, तर प्रेम, विश्वास, साथ, समजूतदारपणा आणि असंख्य आठवणींनी सजलेला आपल्या नात्याचा अमूल्य खजिना आहे. ❤️ जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझा हात घट्ट धरून उभे राहिलात… सुखात हसवलंत, दुःखात धीर दिलात आणि प्रत्येक क्षणी जाणवून दिलंत की — “खरं प्रेम हे शब्दांत नसतं, तर सोबत निभावण्यात असतं.” तुमच्यासोबतचा प्रत्येक दिवस मला नवीन प्रेरणा देतो. तुमचं प्रेम, तुमची काळजी आणि तुमचा निस्वार्थ स्वभाव हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं भाग्य आहे. 💕 आज आपल्या ३४ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवाकडे एकच प्रार्थना — आपलं हे नातं असंच प्रेमाने, विश्वासाने आणि आनंदाने फुलत राहो… 🌸 लग्नाच्या ३४ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… तुम्ही आहात म्हणून माझं आयुष्य इतकं सुंदर आहे… आणि पुढचं प्रत्येक वर्षही तुमच्यासोबतच जगायचं आहे. ❤️

Tuesday, May 19, 2026

मजुषा वाढदिवस

सहजीवनाची शिल्पकार प्रेमाचा झरा त्यागाची मूर्ती ममतेची सावली कर्तृत्ववान अर्धांगिनी संघर्षातील दीपस्तंभ आयुष्याची सोनेरी साथ,जीवनाची प्रेरणा आनंदाची सावली सुखदुःखाची सोबती प्रेमाची मूर्ती आज माझ्या,अर्धांगिनी, जीवनसाथीचा, सौ. मंजुषा काळे हिचा वाढदिवस… २० मे १९७१ रोजी जन्मलेली मंजुषा माझ्या आयुष्यात १० मे १९९२ रोजी आली आणि आयुष्यालाच नवी दिशा मिळाली. पुण्यासारख्या शहरात बालपण गेलेल्या या मुलीने राजूरसारख्या खेड्यात संसाराची सुरुवात केली. बी.ए. पूर्ण झाल्यानंतर लग्न झाले, पण शिक्षणाची जिद्द मात्र कायम ठेवली. संसाराचा गाडा हाकताना डोक्यावर हंडे घेऊन पाणी भरणे असो, किराणा साहित्याचे पॅकिंग असो किंवा घरातील प्रत्येक जबाबदारी हसत स्वीकारणे असो… कोणत्याही कामाची तिने कधी लाज बाळगली नाही. प्रपंचाला हातभार लावत तिने बी.एड., एम.ए., एम.एड. आणि व्यवस्थापन पदविका पूर्ण केली. आज ती राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची यशस्वी प्राचार्या म्हणून कार्यरत आहे. स्वप्नील आणि ऋषीकेश या दोन मुलांवर उत्तम संस्कार करत तिने आईपणही तितक्याच समर्थपणे जपले. गेली ३४ वर्षे संसार करताना अनेक चढ-उतार आले, पण तिच्या जिद्दीने, संयमाने आणि कष्टाने प्रत्येक संकटावर मात केली. आज अनेक पुरस्कारांनी सन्मानित होत असतानाही तिची पावले अजूनही गोरगरीब मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धावत आहेत. वयाचे अर्धशतक पार करूनही तिची उर्मी, कामावरील निष्ठा आणि समाजासाठीची तळमळ आजही तितकीच प्रेरणादायी आहे.माझ्या भाऊ बहिणी,भाचे नातेवाईक यांना एकत्र ठेवून त्यांची काळजी घेऊन त्यांच्या मनात घर करणारी..... माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या सहचारिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुझे आयुष्य निरोगी, आनंदी आणि यशस्वी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… 🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंजुषा! 💐

डोंगराची काळी मैना बाजारात

अकोले, ता. १९ : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सध्या रानमेव्याची चाहूल लागली असून डोंगरची ‘काळी मैना’ म्हणून ओळख असलेल्या करवंदांनी राजूर परिसरातील बाजारपेठ गजबजू लागली आहे. रंधा, माळेगाव, घाटघर, शिंगणवाडी, रतनवाडी आदी डोंगराळ भागातील करवंदांच्या जाळ्या काळ्याभोर फळांनी लगडल्या असून उन्हाळ्यातील हा आंबट-गोड रानमेवा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये एप्रिल-मे महिन्यात करवंदांचा हंगाम सुरू होतो. यंदा मात्र वैशाख सुरू होऊनही करवंदे उशिरा पिकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्राबाबत आदिवासी बांधवांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. काही जण यंदा पावसालाही उशीर होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. शाळांना सुट्ट्या लागल्याने अनेक आदिवासी मुले पहाटेपासून जंगलाची वाट धरत आहेत. पाटीभर करवंदे गोळा करून राजूर बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्याचा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला आहे. पळस किंवा चांद्याच्या पानांचे डोमे तयार करून राजूर बसस्थानक परिसरात ‘करवंद घ्या... करवंद...’ अशी हाक देत ही चिमुकली विक्री करताना दिसत आहेत. भंडारदरा, हरिश्चंद्रगड किंवा रंधा धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांभोवतीही ही मुले गर्दी करत असल्याचे चित्र आहे. एका डोम्याची किंमत पाच ते दहा रुपये असून दिवसभरात शंभर ते दीडशे रुपयांची विक्री होत असल्याचे मुलांनी सांगितले. शाळा सुरू झाल्यावर नवीन वह्या, पुस्तके आणि गणवेश घेण्यासाठी हे पैसे उपयोगी पडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही मुले घरखर्चाला हातभार लावण्यासाठीही करवंद विक्री करत आहेत. रंधा, माळेगाव, केळुंगण, घाटघर, शिंगणवाडी, मुरशेत, बारी, रतनवाडी, कोलटेंभे या भागात करवंदांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र या रानमेव्याला स्थानिक बाजारपेठेपलीकडे फारसा पर्याय उपलब्ध नाही. राहाता, शिर्डी, राहुरी, कोल्हार, संगमनेर परिसरातील व्यापारी अल्प दराने करवंद खरेदी करत असल्याने आदिवासी बांधवांना अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. आदिवासी महामंडळाने करवंद खरेदीसाठी पुढाकार घेत योग्य हमीभाव दिल्यास आदिवासी भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. आकर्षक पॅकिंगद्वारे पुणे, मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत करवंद पोहोचल्यास ‘डोंगरची काळी मैना’ ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला. दरम्यान, काही ठिकाणी डोंगरांना लागणाऱ्या आगीमुळे करवंदांच्या जाळ्या नष्ट होत असल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. वनविभागाने करवंदाच्या झाडांचे संवर्धन व संगोपनासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.