Wednesday, February 21, 2018

agrovan


जलसंधारणातून कुमशेतची बारमाही शेतीकडे वाटचाल शांताराम काळे

जलसंधारणातून कुमशेतची बारमाही शेतीकडे वाटचाल

शांताराम काळे
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018
नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांग भागातील धारेगाव आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. या धारेगावच्या प्रांगणात व मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या आज्या पर्वताच्या पायथ्याशी कुमशेत हे टुमदार गाव वसले आहे. जलसंधारणाच्या विविध कामांतून गावातील पिण्याच्या पाण्याचा टॅंक बंद झाला आहे. शिवारात विविध हंगामांत पिके डोलू लागली आहेत. जोडीला ठिबक सिंचन आहे. पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक असलेल्या या गावातील महिला हस्तकलेतून विविध वस्तू तयार करतात. त्या विक्रीतून संसाराला हातभार लावतात.


नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांग भागातील धारेगाव आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. या धारेगावच्या प्रांगणात व मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या आज्या पर्वताच्या पायथ्याशी कुमशेत हे टुमदार गाव वसले आहे. जलसंधारणाच्या विविध कामांतून गावातील पिण्याच्या पाण्याचा टॅंक बंद झाला आहे. शिवारात विविध हंगामांत पिके डोलू लागली आहेत. जोडीला ठिबक सिंचन आहे. पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक असलेल्या या गावातील महिला हस्तकलेतून विविध वस्तू तयार करतात. त्या विक्रीतून संसाराला हातभार लावतात.

नगर जिल्ह्यात अकोले या तालुका ठिकाणापासून सुमारे ५५ किलोमीटरवर कुमशेत हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव येते. रामायणात वाल्मीक ऋषींचा आश्रम असल्याचा उल्लेख आज्या पर्वतासंबंधी आहे. हा पर्वत तसेच वाकडा, सुपली, करंडा आदी डोंगरांच्या मध्यावर गावठा, पाटीलवाडी, बोरीची वाडी, ठाकरवाडी, मुडाची वाडी व नाडेकरवाडी अशा सहा वाड्यांचे मिळून कुमशेत गाव तयार झाले आहे. गावाच्या एका बाजूस धारेगाव कोकणकडा आहे.
दुष्काळापासून मुक्ती
कुमशेतचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ३०२७. ५४ हेक्टर आहे. त्यात वनक्षेत्राचा मोठा वाटा आहे. पावसाळ्यात तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र खडकाळ जमीन असल्याने उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न जाणवतो. सतत टँकर तर रोजगारासाठी दाही दिशा अशा दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव आता परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू लागले आहे. पाणीदार गाव म्हणून आपली ओळख निर्माण करू लागले आहे. विशेष म्हणजे गाव दुष्काळमुक्त होण्यामध्ये व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यामध्ये लोकसहभाग व त्यातही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न होतो आहे.
जलसंधारणातून ठिकठिकाणी अडले पाणी
नजीकच्या काळात कुमशेत गावशिवारात कृषी विभागामार्फत सिमेंट काँक्रीटचे सात दगडी बंधारे, लघू पाटबंधारे विभागाकडून पाच तर लोकसहभागातून वनराई बंधारे झाले. त्यातून डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी अडविले. जलयुक्त अभियान कार्यक्रमातून पाणी अडविण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनीता भांगरे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. बंधाऱ्यांमध्ये मेअखेरपर्यंत पाणी टिकले. त्याचा फायदा म्हणजे गावाला पिण्यासाठी पाणी मिळालेच, शिवाय उन्हाळी पिकेही शेतकरी घेऊ लागला आहे.
शिवारात डोलू लागली विविध पिके
पाटीलवाडी, ठाकरवाडी, चोंढी उत्तर ओढा आदी काँक्रीट बंधाऱ्याच्या काठावरील भात खाचरात गहू, हरभरा, भुईमूग, देशी वाल, वांगी, मेथी, पालक अशी पिके डोलू लागली आहेत. कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाच्या वाणाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. नैसर्गिक पाण्याचा ओलावा, त्याला बंधाऱ्यातील २५ ते ३० दशलक्ष घनफूट पाण्याची जोड व ठिबक सिंचन यांचा वापर झाला. त्या आधारे कांदा, बटाटा या पारंपरिक पिकांसह आंबा, आवळा, पेरू, बोरे, मेथी अशी विविधताही शिवारात दिसू लागली आहे.
शेतकरी समाधानी
कुमशेत शिवारातील बहुतांश उत्पादने सेंद्रियच म्हणावी लागतील. वेगवेगळ्या हंगामात शेती करणे शक्य झाल्याने रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनीही झालेल्या कामांविषयी समाधान व्यक्त करून निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. यावर्षी पाऊस अधिक झाल्याने बंधारेदेखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चारसूत्री भात लागवड करून परिसरात मार्गदर्शकाची भूमिकाच गावाने बजावली आहे.
हस्तकला व्यवसायातून संसाराला हातभार
कृषी विभागाने गावातील महिलांना बांबू उद्योग सुरू करून देण्यासाठीही मदत केली आहे. नेहमीच्या कामातून वर्षातून थोडा फुरसतीचा वेळ मिळतो. त्यावेळी ग्रामस्थ हस्तकलेचा व्यवसाय करतात. पावसाची वाट पाहण्याच्या किंवा पीक तयार होण्याच्या काळात ते आपल्याच शेतीस्त्रोतांच्या आधारे वस्तू तयार करण्याकडे वळतात. अशा हंगामी आदिवासी कारागिरांमध्ये सर्वात उल्लेखनीय कारागीर म्हणजे वेताच्या व बांबूच्या टोपल्या आणि तट्टे विणणारे लोक. पूर्वी बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंना अधिक मागणी होती. काही वर्षांपूर्वी या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात घरगुती वापर होत असे. मात्र आताच्या जमान्यातही बांबूपासून हारे, टोपल्या, तट्टे, खुराडे, कणगी आदी घटक बनवून देणारी कुमशेत गावातील आदिवासी कुटुंबीय दोन वर्षे बांबूच्या साहाय्याने बुरूडकाम करीत आहेत. टोपल्या, रोवली, सूप, करंडा आदी वस्तूंचे विणकाम करीत त्यांनी या व्यवसायातून आपल्या संसाराला हातभार लावला आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून कृषी विभाग व वन विभागाने गावात कामे केली. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पाण्याची समस्या दूर झाली अाहे. शेतीशिवार हिरवेगार झाल्याने पर्यटकांचा ओढा इथे वाढू लागला आहे. कुमशेत गाव नजीकच्या काळात पर्यटनासाठी नावारूपास येईल.
- सौ. सुनीता भांगरे,
जिल्हा परिषद सदस्य

शिवारात पाणी आहे, पण वीज नाही. ती उपलब्ध झाल्यास शेतीसाठी बंधाऱ्यातून पाणी उचलल्यास येथील शेती आठमाही होईल. त्या दृष्टीने पावले टाकीत आहोत.
- विठल अस्वले
शेतकरी, कुमशेत
सर्वांच्या मदतीतून गाव बदलतेय
कुमशेतच्या सरपंच सोनाबाई विठ्ठल अस्वले म्हणाल्या की, प्रत्येक उन्हाळ्यात गावाला वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागे. पाण्याच्या टँकरवर सतत अवलंबून राहावे लागे. आता उन्हाळ्यात गावात येणारा पिण्याचा पाण्याचा टँकर बंद झाला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. शेतीलाही पाणी उपलब्ध होऊन रब्बी, उन्हाळी क्षेत्र वाढले आहे. गावातील महिलांचा तनिष्का गट स्थापन केला आहे. त्या आधारे वीस महिलांना एकत्र करून छोटे, मोठे उद्योग करण्याचे काम सुरू अाहे. बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मिळाला. हा गाळ खडकाळ माळरानावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात टाकला. त्यातून पाच हेक्टर क्षेत्र तयार होऊन त्यात पिके डोलू लागली आहेत. आता या जमिनींची पाणीक्षमताही वाढीस लागली आहे. या बंधाऱ्यांना भेट देण्यासाठी पर्यटक येतात. येथे वस्ती करतात. आमचे ग्रामस्थ त्यांना चुलीवरची भाकर तसेच अन्य जेवण देतात. पर्यटकांसाठी हुरडा पार्टीचे आयोजनही करण्यात येते. त्यातून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे पर्यटनाचे केंद्र म्हणून आमच्या गावाची ओळख झाली आहे. सरकारने पर्यटन विकासातून निधी दिल्यास तसेच रस्ते काँक्रीटचे तयार झाले तर पर्यटकांचा ओघ अधिक वाढेल, असेही सरपंच सोनाबाईंनी सांगितले.
- सोनाबाई अस्वले, ९४२३१४९१६८
गावात सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, गॅबियन वनराई बंधारे आदी कामे झाल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गहू, भाजीपाला, उन्हाळ्यात भुईमूग, बाजरी त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आंबा, आवळा आदींचीही लागवड झाली आहे. एक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन बांबूपासून वस्तू तयार करून महिला त्यांची विक्री पर्यटक व बाजारात करतात. त्यातून त्यांचा आर्थिक स्थर उंचावण्यास मदत होत आहे.
बाळासाहेब मुसमाडे, ९४२२४३०४५१
उपविभागीय कृषी अधिकारी
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुमशेत परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. हा परिसर अतिशय निसर्गरम्य असून, पर्यटकांना मोहवून टाकणारा आहे. येथील ग्रामस्थांनी एकोप्याने राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व प्रगतीची वाटचाल सुरू ठेवावी.
भागवत डोईफोडे, प्रांत, संगमनेर



















वन्यजीवांचीही आबाळ

Swami Amazing Saturday, June 18, 2011 वन्यजीवांचीही आबाळ राजूर, १८ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिस...