Tuesday, September 3, 2024

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशेषतः भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणा वर साजरा केला जातो, पोळा हा श्रावणात येणार सण, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण, परंतु त्याच बरोबर.... महाराष्ट्रात सह्याद्री मधील आदिवासी भागातसुद्धा परंपरेने हा सण आदिवासी पाडे, वाडी वस्ती, गावांमध्ये एक अनोळख्या पद्धतीने, भव्य- दिव्य, निसर्ग संस्कृती जोपासत, धरणी आईला वंदन करत सर्वत्र साजरा होतो. भारत देशा मध्ये शेतकऱ्याला शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग असल्याने, बैल वर्षभर शेतात कष्ट करून आपल्याला अन्न मिळते, शेतकरी सगळ्यांनचा पोशिंदा असला तरी बैल शेतकऱ्याचा पोशिंदा आहे, त्याचा मान, सन्मान राखण्यासाठी हा सण साजरा करतात हा सण पाऊसावळ्यात असल्याने हवेत गारवा पसरल्याने, मानवी मन देखील ताज तवान झालेलं दिसून येत, सगळी सृष्टी आधीच हिरवाईचा शालू नेसून नवीकोरी,हिरवीगार,मंत्रमुग्ध करणार वातावरण तयार झालेलं असते. आदिवासी गावांमध्ये सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दोन दिवस आधी गावातील पंचांची बैठक होते, त्या मध्ये सन उत्सव कसा साजरा करायचा याची चर्चा होऊन बासिंगाचे बैल असतील तर त्या मध्ये मोर, वाघोबा, बहिरोबा, डोंगऱ्या देव किंवा ग्रामदैवत इत्यादी यांचे हुबे हुब चित्र रेखाटून आकर्षक मोठे बासिंग तयार केले जाते, प्रत्येक घरावर अशी जबाबदारी वाटून दिली जाते, परंतु बऱ्याच ठिकाणी अशा रुढी लुप्त होताना दिसत आहेत. पोळ्याच्या काही दिवस अगोदर उंबराच्या झाडाच्या मुळ्यापासून चवार तयार केले जाते. आदिवासी समाजात उंबराच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे, तोडलेली मुळी उभी हातात पकडून तिच्या एका टोकाला मोगरीच्या सहाय्याने मारले जाते, जेव्हा मोगरिने मारले जात असते तेव्हा मुळी हाताने गोल गोल फिरवली जाते जेणे करून चवार एकसारखी तयार होतात. सुताच्या धाग्या प्रमाणे ही बारीक,मुळी जेवढी लांब तेवढ्या लांबीचा चवार, चवार उन्हात वाळवल्या नंतर त्याला घायपाताच्या वाखापासून बनवलेल्या दोऱ्याने बांधून गोंडे बनवले जातात, परंतु आदिवासीं बांधव एक झाडाच्या फक्त एक दोन मुळ्या तोडतात. त्या चवराचे बैल,गाई, म्हसी, शेळ्या इ.साठी आकर्षक गोंडे बनवले जातात. गोंड्याना हवे तेवढ्या रंगात बुडवून रंगीत केले जातात, तेच बैलांना फार शोभून दिसते. काही दिवस अगोदर शेजारच्या किंवा गावच्या आठवडे बाजारातून बैलांसाठी खूप सारी खरेदी केली जाते, त्यात चावर,कासऱ्या, खुंगरू,गोंडे, बेगड, वेसन, पायाचे तोडे, रंगी बेरंगी वस्र, घुंगर माळा, झुली, गळ्यातले तोडे, साखळी, वेगवेगळे रंग इत्यादी अनेक साहित्य खरेदी केले जाते. सणाच्या अाधल्या दिवशी गावचा कोतवाल प्रत्येक वाडी वस्ती वर दवंडी देऊन सांगत असतो की उद्या सायंकाळी बैल सजून होळीच्या माळावर घेऊन या म्हणून, त्याच दिवशी बैलांची शेंगे विळीने घोळून त्याला हिंगुळ,तेल, तुपाने चोपडून काढली जातात, पोळ्याच्या दिवशी सकाळीच बैल शेजारी असलेल्या ओढ्यावर नेऊन स्वच्छ धूऊन काढतात, त्या नंतर राखलेले गायरान वर सर्वत्र चरायला सोडलं जातं किंवा भरपूर चारा बैलांना दिला जातो, शेतकऱ्याच्या सर्जा राज्याचा पोळ्याचा दिवस, मनाचा आनंदाचा असतो, पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, कोणतेच काम करून घेतले जात नाही तर त्याचे पुजन लाड केले जातात. या दिवशी बैलाच्या खांद्याला गोडे तेल, तुपाने आणि हळदीने मालिश केली जाते, सकाळी बुजुर्ग किवां जाणकार माणसं हातात चवार घेऊन प्रत्येक शेतातील उभ्या पिकाला,गावातील ग्राम देवतेला, वाघोबा, उंबऱ्या देव, कनसारा आई, घर, गाडी, गुरे, शेणकईला चवार बांधले जाते, पूर्वी पासून भात,नाचणी, ज्वारी, बाजरी, मका खुरास्नी, भुईमुग, नागली इत्यादी सर्व पिकांची चावर लाऊन पूजा केली जाते, आदिवासी ही निसर्गाला पुजनारी, देव माननारी संस्कृती आहे, या सणाच्या निमित्ताने पिकांचे, जनावरांचे, माणसांचे, गावाचे रक्षण करण्याची विनवणी निसर्ग देवतेकडे केली जाते, बैल चारून झाल्यावर रानातून बैलांना दुपार नंतर घरी आणले जाते, स्वच्छ कपड्याने त्यांना पुसून घेतले जाते, बैलांच्या शिंगणा नाचणीच्या पिठाच्या खळीने रंगी बेरंगी बेगड चीपकवली जातात, अंगावर घेरू किंवा रंगीत रंगांच्या साहाय्याने नक्षी किंवा रंगाने सजवले जाते,नवीन वेसण, नवीन कासऱ्या, गळ्यात तोढे घुंगर माळा, चवार बांधले जाते, कपाळावर मळवट बांधली जाते, शिंगणा चवार बांधले जाते, पाठीवर विविध नक्षीकाम केले जाते, गेरू चे अंगावर ठिपके दिले जातात, अंगावर झुली घातल्या जातात, गळ्यात छुम छुम करणार्‍या घुंगरांच्या माळा घातल्या जातात. सगळं काही नवीन, पायात चांदीचे किंवा तोरड्याचे तोडे घातले जातात. हे सगळ बैलांना खूपच सुंदर दिसू लागते, बसिंगाच्या बैलांना बसिंग बांधली जातात, बघता बघता होळीच्या माळावर पारंपरिक वाद्यांचा गजर होऊ लागतो, तस तसे आपापली बैल घेऊन त्या ठिकाणी सर्वांची गर्दी होऊ लागते, सगळ्यांची बैल आल्यावर चावडी किंवा ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी हळू हळू वाद्या मागे बैल गेऊन वाजत गाजत मिरवणूक काढत घेऊन जातात, बासिंगाचे बैल मागे असतात, ग्रामदैवत असलेल्या मंदिराला पाच प्रदिक्षणा घालतात, बैल फिरवले जातात, त्या नंतर बासिंगाचे बैल प्रदक्षिणा घातली जाते, पाच प्रदक्षिणा झाल्यावर ग्रामदैवतेला वंदन केले जाते, नारळ चढवला जातो, पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर गावकरी सुद्धा या पवित्र उत्सवा मध्ये नृत्याचा ठेका धरत नाचू लागतात, महिला ही पारंपरिक गाण्याची साद घालत असतात, नंतर बैल घरी आणले जातात, बैल घरी येण्या आघोदर घरी महिलांनी घराबाहेर बैलांच्या स्वागतासाठी रांगोळी काढलेली असते, बैलांना ओवाळून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला दिला जातो, बळी राजाची अतिथी देवो भव प्रमाणे पूजा केली जाते, त्याच प्रमाणे महिला बैलान पुढे गहु, ज्वारी चे दान मांडतात, ज्यांच्या घरी बैल नसतील ते अगजोदरच मातीचे बैल कुंभरांकडून घेतले जातात, त्याची विधिवत पूजन केले जाते, या दिवशी सगळ्याच शेतकरी बांधवांचा आनंद द्वगुणित होत असतो, सर्जा राजाचेही खूप लाड केले जातात, अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साह पूर्ण, आनंदात शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा सण महाराष्ट्र सह्याद्री आदिवासी पाडे, वस्ती मध्ये पूर्वी पासून साजरा होत असतो, या सणामुळे धान्याची,पिकांची, गो धनाची समृध्दी होते असे म्हणतात, सर्व निसर्ग संस्कृती जोपासण्यासाठी आदिवासी समाजाची मूल्य, संस्कृती मानली जाते, आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करत असल्याने सर्वस्वी बैलांवर अवलंबून असतो, त्या मुळे बैलांन प्रती कृतज्ञता,प्रेम, जिव्हाळा, व्यक्त व्यक्त करण्यासाठी बैलं पोळा सण साजरा केला जातो. हा सण सह्याद्री, महारष्ट्र राज्यात सर्वच ठिकाणी आदिवासीं भागात साजरा केला जातो, तसेच अकोले तालुक्यात मोठ्या उत्साह, आनंदमय वातावरणात बळीराजाची पूजा करतं साजरा करतात. आज आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे बैलांचा वापर कमी झाला असला, तरी मानवी जीवनातील त्यांचे महत्त्व कमी होणार नाही. म्हणून आपण हा सण साजरा करणे, ते पण पारंपरिक रीतिरिवाजाने अगत्याचे आहे."बैलपोळा सण "निसर्ग पुजक अदिवासीं संस्कृती व प्राणीमात्रावर जिव्हाळा दाखवीनारा सण आहे. *:- तळपाडे भरत दशरथ* *(बिरसा ब्रिगेड, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष)* ९६६५४५१५३०

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...