Tuesday, September 3, 2024

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशेषतः भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणा वर साजरा केला जातो, पोळा हा श्रावणात येणार सण, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण, परंतु त्याच बरोबर.... महाराष्ट्रात सह्याद्री मधील आदिवासी भागातसुद्धा परंपरेने हा सण आदिवासी पाडे, वाडी वस्ती, गावांमध्ये एक अनोळख्या पद्धतीने, भव्य- दिव्य, निसर्ग संस्कृती जोपासत, धरणी आईला वंदन करत सर्वत्र साजरा होतो. भारत देशा मध्ये शेतकऱ्याला शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग असल्याने, बैल वर्षभर शेतात कष्ट करून आपल्याला अन्न मिळते, शेतकरी सगळ्यांनचा पोशिंदा असला तरी बैल शेतकऱ्याचा पोशिंदा आहे, त्याचा मान, सन्मान राखण्यासाठी हा सण साजरा करतात हा सण पाऊसावळ्यात असल्याने हवेत गारवा पसरल्याने, मानवी मन देखील ताज तवान झालेलं दिसून येत, सगळी सृष्टी आधीच हिरवाईचा शालू नेसून नवीकोरी,हिरवीगार,मंत्रमुग्ध करणार वातावरण तयार झालेलं असते. आदिवासी गावांमध्ये सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दोन दिवस आधी गावातील पंचांची बैठक होते, त्या मध्ये सन उत्सव कसा साजरा करायचा याची चर्चा होऊन बासिंगाचे बैल असतील तर त्या मध्ये मोर, वाघोबा, बहिरोबा, डोंगऱ्या देव किंवा ग्रामदैवत इत्यादी यांचे हुबे हुब चित्र रेखाटून आकर्षक मोठे बासिंग तयार केले जाते, प्रत्येक घरावर अशी जबाबदारी वाटून दिली जाते, परंतु बऱ्याच ठिकाणी अशा रुढी लुप्त होताना दिसत आहेत. पोळ्याच्या काही दिवस अगोदर उंबराच्या झाडाच्या मुळ्यापासून चवार तयार केले जाते. आदिवासी समाजात उंबराच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे, तोडलेली मुळी उभी हातात पकडून तिच्या एका टोकाला मोगरीच्या सहाय्याने मारले जाते, जेव्हा मोगरिने मारले जात असते तेव्हा मुळी हाताने गोल गोल फिरवली जाते जेणे करून चवार एकसारखी तयार होतात. सुताच्या धाग्या प्रमाणे ही बारीक,मुळी जेवढी लांब तेवढ्या लांबीचा चवार, चवार उन्हात वाळवल्या नंतर त्याला घायपाताच्या वाखापासून बनवलेल्या दोऱ्याने बांधून गोंडे बनवले जातात, परंतु आदिवासीं बांधव एक झाडाच्या फक्त एक दोन मुळ्या तोडतात. त्या चवराचे बैल,गाई, म्हसी, शेळ्या इ.साठी आकर्षक गोंडे बनवले जातात. गोंड्याना हवे तेवढ्या रंगात बुडवून रंगीत केले जातात, तेच बैलांना फार शोभून दिसते. काही दिवस अगोदर शेजारच्या किंवा गावच्या आठवडे बाजारातून बैलांसाठी खूप सारी खरेदी केली जाते, त्यात चावर,कासऱ्या, खुंगरू,गोंडे, बेगड, वेसन, पायाचे तोडे, रंगी बेरंगी वस्र, घुंगर माळा, झुली, गळ्यातले तोडे, साखळी, वेगवेगळे रंग इत्यादी अनेक साहित्य खरेदी केले जाते. सणाच्या अाधल्या दिवशी गावचा कोतवाल प्रत्येक वाडी वस्ती वर दवंडी देऊन सांगत असतो की उद्या सायंकाळी बैल सजून होळीच्या माळावर घेऊन या म्हणून, त्याच दिवशी बैलांची शेंगे विळीने घोळून त्याला हिंगुळ,तेल, तुपाने चोपडून काढली जातात, पोळ्याच्या दिवशी सकाळीच बैल शेजारी असलेल्या ओढ्यावर नेऊन स्वच्छ धूऊन काढतात, त्या नंतर राखलेले गायरान वर सर्वत्र चरायला सोडलं जातं किंवा भरपूर चारा बैलांना दिला जातो, शेतकऱ्याच्या सर्जा राज्याचा पोळ्याचा दिवस, मनाचा आनंदाचा असतो, पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, कोणतेच काम करून घेतले जात नाही तर त्याचे पुजन लाड केले जातात. या दिवशी बैलाच्या खांद्याला गोडे तेल, तुपाने आणि हळदीने मालिश केली जाते, सकाळी बुजुर्ग किवां जाणकार माणसं हातात चवार घेऊन प्रत्येक शेतातील उभ्या पिकाला,गावातील ग्राम देवतेला, वाघोबा, उंबऱ्या देव, कनसारा आई, घर, गाडी, गुरे, शेणकईला चवार बांधले जाते, पूर्वी पासून भात,नाचणी, ज्वारी, बाजरी, मका खुरास्नी, भुईमुग, नागली इत्यादी सर्व पिकांची चावर लाऊन पूजा केली जाते, आदिवासी ही निसर्गाला पुजनारी, देव माननारी संस्कृती आहे, या सणाच्या निमित्ताने पिकांचे, जनावरांचे, माणसांचे, गावाचे रक्षण करण्याची विनवणी निसर्ग देवतेकडे केली जाते, बैल चारून झाल्यावर रानातून बैलांना दुपार नंतर घरी आणले जाते, स्वच्छ कपड्याने त्यांना पुसून घेतले जाते, बैलांच्या शिंगणा नाचणीच्या पिठाच्या खळीने रंगी बेरंगी बेगड चीपकवली जातात, अंगावर घेरू किंवा रंगीत रंगांच्या साहाय्याने नक्षी किंवा रंगाने सजवले जाते,नवीन वेसण, नवीन कासऱ्या, गळ्यात तोढे घुंगर माळा, चवार बांधले जाते, कपाळावर मळवट बांधली जाते, शिंगणा चवार बांधले जाते, पाठीवर विविध नक्षीकाम केले जाते, गेरू चे अंगावर ठिपके दिले जातात, अंगावर झुली घातल्या जातात, गळ्यात छुम छुम करणार्‍या घुंगरांच्या माळा घातल्या जातात. सगळं काही नवीन, पायात चांदीचे किंवा तोरड्याचे तोडे घातले जातात. हे सगळ बैलांना खूपच सुंदर दिसू लागते, बसिंगाच्या बैलांना बसिंग बांधली जातात, बघता बघता होळीच्या माळावर पारंपरिक वाद्यांचा गजर होऊ लागतो, तस तसे आपापली बैल घेऊन त्या ठिकाणी सर्वांची गर्दी होऊ लागते, सगळ्यांची बैल आल्यावर चावडी किंवा ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी हळू हळू वाद्या मागे बैल गेऊन वाजत गाजत मिरवणूक काढत घेऊन जातात, बासिंगाचे बैल मागे असतात, ग्रामदैवत असलेल्या मंदिराला पाच प्रदिक्षणा घालतात, बैल फिरवले जातात, त्या नंतर बासिंगाचे बैल प्रदक्षिणा घातली जाते, पाच प्रदक्षिणा झाल्यावर ग्रामदैवतेला वंदन केले जाते, नारळ चढवला जातो, पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर गावकरी सुद्धा या पवित्र उत्सवा मध्ये नृत्याचा ठेका धरत नाचू लागतात, महिला ही पारंपरिक गाण्याची साद घालत असतात, नंतर बैल घरी आणले जातात, बैल घरी येण्या आघोदर घरी महिलांनी घराबाहेर बैलांच्या स्वागतासाठी रांगोळी काढलेली असते, बैलांना ओवाळून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला दिला जातो, बळी राजाची अतिथी देवो भव प्रमाणे पूजा केली जाते, त्याच प्रमाणे महिला बैलान पुढे गहु, ज्वारी चे दान मांडतात, ज्यांच्या घरी बैल नसतील ते अगजोदरच मातीचे बैल कुंभरांकडून घेतले जातात, त्याची विधिवत पूजन केले जाते, या दिवशी सगळ्याच शेतकरी बांधवांचा आनंद द्वगुणित होत असतो, सर्जा राजाचेही खूप लाड केले जातात, अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साह पूर्ण, आनंदात शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा सण महाराष्ट्र सह्याद्री आदिवासी पाडे, वस्ती मध्ये पूर्वी पासून साजरा होत असतो, या सणामुळे धान्याची,पिकांची, गो धनाची समृध्दी होते असे म्हणतात, सर्व निसर्ग संस्कृती जोपासण्यासाठी आदिवासी समाजाची मूल्य, संस्कृती मानली जाते, आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करत असल्याने सर्वस्वी बैलांवर अवलंबून असतो, त्या मुळे बैलांन प्रती कृतज्ञता,प्रेम, जिव्हाळा, व्यक्त व्यक्त करण्यासाठी बैलं पोळा सण साजरा केला जातो. हा सण सह्याद्री, महारष्ट्र राज्यात सर्वच ठिकाणी आदिवासीं भागात साजरा केला जातो, तसेच अकोले तालुक्यात मोठ्या उत्साह, आनंदमय वातावरणात बळीराजाची पूजा करतं साजरा करतात. आज आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे बैलांचा वापर कमी झाला असला, तरी मानवी जीवनातील त्यांचे महत्त्व कमी होणार नाही. म्हणून आपण हा सण साजरा करणे, ते पण पारंपरिक रीतिरिवाजाने अगत्याचे आहे."बैलपोळा सण "निसर्ग पुजक अदिवासीं संस्कृती व प्राणीमात्रावर जिव्हाळा दाखवीनारा सण आहे. *:- तळपाडे भरत दशरथ* *(बिरसा ब्रिगेड, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष)* ९६६५४५१५३०

Monday, September 2, 2024

वनवाश्या ( वनाश्या )"

"वनवाश्या ( वनाश्या )" दरवर्षी बैल पोळा आला की घरातल्या सर्वांना एकच बैल आठवतो तो म्हणजे "वनाश्या". अजूनही बैलपोळ्याला त्याला बांधत असलेली घुंगर माळ तशीच जपून ठेवली आहे. घुंगरमाळीला आता मात्र गळा वेगळा दिसत असतो. जशी वनाश्याच्या गळ्याला ती घुंगरमाळ शोभायची ना तेव्हढी अजून एकही बैलाला ती शोभली नाही. वाट पाहतोय मी त्या गळ्याची अन त्या वनवाश्याची ही. त्याच्या नावाला कारण ही तसच होतं. तो ज्या परिस्थितीत वाढला त्यानुसारच त्याच नाव "वनवाश्या" ठेवलं होतं आजोबांनी. आजोबांच्या काळात आमच्या घरी खूप गावरान गाया असायच्या. मला आठवतंय तेव्हा पासून तरी कमीतकमी आठ ते दहा गावरान गाया हमखास असायच्या घरी. पण वडील गेल्यापासून त्यांना सांभाळायला कोण नव्हतं म्हणून कमी झाल्या. आत्ता फक्त एकच गावरान गाय राहिली आहे गोठ्यातल्या दावणीला. वनाश्या हा घरच्याच गावरान गाईच्या पोटी जन्माला आलेला. पण दुर्दैवाने काही दिवसातच ज्या गाईनं वनवाश्याला जन्म दिला होता ती वारली. अगदी चार पाच दिवसातच तिचा मृत्यू झाला होता. जसं एखाद्या आईचं लेकरू तिला कमीतकमी सहा महिने तरी पीत असतं. तसंच गाईचं वासरू ही गाईला कमीतकमी दहा ते पंधरा दिवस तरी पेत असतं. त्यानंतर हळूहळू गवत वैगरे खायला सुरु करत असतं. पण आजोबांना मोठा प्रश्न पडला होता आता या वासराला जगवायच कसं. बाकीच्या एक दोन गाया ही वेलेल्या( बाळंतीण झालेल्या) होत्या. पण त्या काय वनवाश्याला पिऊ देत नव्हत्या. बाबाला खूप वाईट वाटत होतं. आता या वासराला जगवायच तरी कसं. ना याला बाकीच्या गाया पिऊन देत आहे ना याला गवत खाता येतंय. अन बाबाच तर काम असं होतं की ज्या गाईला गोऱ्हा होईल त्या गाईचं बाबा कधीच दूध नव्हता काढत. म्हणायचा पहिलवान झाला पाहिजे गोऱ्हा पहिलवान. कचाकच औत ओढलं पाहिजे त्यानी. पेऊदे सैल ( सवतं) त्याला म्हणायचा. कितीतरी वेळा त्यावरून आज्जीची न बाबाची भांडण होताना पाहिली होती मी. एखादी गाई गाभण राहिली की आज्जीला मनापासून वाटायचं की गाईला कारव्हडच ( कालव्हड) होयला पाहिजे. कारण घरात खायला दूध ही होयचं आणि अजून एक गाय वाढायची गोठ्यातल्या दावणीला. आजीला इतका आनंद होयचा की जणू काही स्वतः लाच लेक (मुलगी) झाली की काय ईतकी खुश दिसायची आज्जी. आता मात्र परिस्थिती वेगळी होती जेव्हढं दुःख बाबाला झालं होतं तेव्हढंच दुःख आज्जीला ही झालं होतं. यावर मग आज्जीनेच एक उपाय शोधून काढला होता. आज्जी बोलली बाकीच्या ही गाया येल्या आहेत तर त्यांचं थोडं थोडं दूध काढून या वासराला पाजायचं म्हणून. बाबाला ही आज्जी बोललेलं पटत होतं. मग बाबा रोज सकाळ संध्याकाळ त्या दोन येलेल्या गायांच दूध काढायचा न त्या वासराला पाजायचा. वासराला दूध पाजल्याशिवाय बाबा जेवण पण करत नसत. जीवापाड जपायचा बाबा त्या वासराला. रात्र झालं की त्याला गोठयात न ठेवता बाकीच्या गाया त्याला मारतील या भीतीनं बाबा त्याला घरात घेऊन झोपायचा. स्वतः च्या मुलाला ही बाबा एव्हढा जपला नसल एव्हढी काळजी घायचा बाबा त्या वासराची. कधी कधी तर असही म्हणायचा बिना आईचं लेकरू आहे त्याला आपण नाही जिव लावायचा तर कोण लावील मग. लई वनवास सोसावा लागतो बिना आईच्या लेकराला अस म्हणायचा बाबा. म्हणून त्याचं नाव बाबांनीच "वनवाश्या" ठेवलं होतं. असाच बाबांनी त्याला लहानाचा मोठा केला. पण गावाकडं एखादं लहान पोरगं असू नाहीतर गाईचं वासरू असू त्याचं नाव बदलावलंच जाणार समजा. सोमाचा सोम्याच होणार न बैलाच नाव रतन असल तर त्याचा रतण्याचं होणार. म्हणून त्या वनवाश्या चा ही वनाश्या झाला होता. त्याच्या सोबत भारत नावाचा बैल ही बाबांनी तयार केला होता. त्याला ही आम्ही भारत्या म्हणायचो. शेती करण्यासाठी आता बाबांनी वनाश्या आणि भारत्या ची जोडी तयार केली होती. भारत्याला आईचं दूध भेटल्यामुळं वनाश्या पेक्षा जास्त तयार दिसत होता. अगदी बाबाच्या भाषेत बोलायचं म्हंटल तर पहिलवानच दिसत होता भारत्या आणि खूप गरीब पण होता. मारत नव्हता काय नव्हता. कोणीही त्याला धरायचं सोडायचं. वनाश्या ही चांगलाच होता तब्बेतीन पण शिंगात जरा फसला होता. पाठमोरी शिंग झाली होती त्याची. बाशिंगा जवळ जाऊन दोन्ही शिंगाची टोकं एकमेकांना भेटत होती त्याची. भारत्या पेक्षा उंची नि ही कमीच होता दिसायला. पण बैलगाडी किंवा औताला जुंपला तर भारत्या बरोबरीनच चालायचा. कधीच माघ हटत नव्हता. दोघांचा चांगलाच जोड जमला होता. काही वर्षानंतर घरातील काही कारणास्तव वडील व चुलते यांनी वाईलं ( वेगळं) घेण्याचा निर्णय घेतला. हा तर आम्हा सर्वांसाठी एक आश्चर्याचा धक्काच होता. वडिल आणि एक चुलता दोघंच भाऊ असल्यामुळे जमिनिसगट वाटणी समान होणार हे ठरलेलं होतं. सर्व घरदाराची व शेतीवाडी समान वाटून घेतली. सगळ्याची वाटणी झाल्यानंतर प्रश्न राहिला होता जनावरांचा. दोन बैल व गावरान गायांचा. गायांच मला जास्त काही आठवत नाही पण बैलांची वाटणी केलेलं चांगलंच आठवतंय. भारत्या चुलत्यांच्या वाटणीला गेलता तर वनाश्या आमच्या वाटणीला आला होता. आता भारत्या आणि वनाश्या दोघही जणू वाईलच निघाले होते. त्या दिवसापासून दोघांचे साथीदार बदलले होते. दोघांच्या दावणी बदलल्या होत्या व उठायची बसायची जागा ही बदलली होती. बदलली होती त्यांची खांद्यावरली शिवळाटी व अगदी गळयातली घुंगरमाळ ही. भारत्याला जोडीदार घरच्याच गाईचा एक सुरत( सुरत्या) नावाचा नवा जोडीदार भेटला होता तर वनाश्याला मामाच्या इथुन आणलेला मथुऱ्या नावाचा जोडीदार भेटला होता. वाईलं झाल्यानंतर आमची सर्व शेतीची जबाबदारी मोठ्या भावावर ( महादूवर) व आजोबांवर आली होती. मला वाटत त्या वेळेस त्याला सहवीतूनच शाळा सोडावी लागली होती. ज्या वयात हातात पाटी पेन्सिल घेऊन खूप शिकायचं होतं लिहायचं होतं त्या वयात भावावर हातात नांगर व पाभार धरण्याची वेळ आली होती. त्यानं केलेल्या कष्टाला व मेहनतीला माझा कायम सलाम राहील. मला वाटतं आज जो काही आमचा संसार उभा राहिला आहे त्यात भावाचा व आईचा खूप मोठा वाटा आहे. काही दिवसातच अचानक भारत्याच दुखायला लागलं. अन ज्या भारत्यानं कधीही कोणाकडे साधं फूस करून सुद्धा पाहिलं नव्हतं की कधी कोणाच्या अंगाला धक्का ही लावला नव्हता. तो अचानक जो जवळ जाईल त्याच्या अंगावर धावून जायचा. पिसाळल्या गत करायला लागला होता अचानक. डॉक्टर ला ही दाखवलं पण कळतच नव्हतं नेमकी काय झालं ते. अन दुर्दैवाने एक दिवस भारत्याने या जगाचा व आम्हां सर्वांचा कायमचा निरोप घेतला. भारत्या जरी अमच्यातून वाईला झाला होता तरी आमच्या हृदयातून कधीच वाईला झाला नाही. त्या दिवशी भारत्या साठी घरातल्या सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहत होते. अगदी घरातला माणूस गेल्यासारख दुःख सगळ्यांना झालं होतं. कारण भारत्या म्हणजे सर्वांचा लाडका होता. कोणीही यावं त्याच्याशी खेळावं इतका गरीब होता . भारत्याला शेतातल्याच बांधावर खड्डा खांदुन शेतातच पुरलं व त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजूनही त्या बांधावर गेलं की भरत्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही. भारत्या गेल्या पासून वनाश्याला मात्र एक घाण सवय लागली होती ती म्हणजे तो आता बाबा आणि भाऊ सोडून कोणावरही धावून जात होता. बाबा अन भाऊ सोडून त्याला कोणी खायला टाकत नव्हतं की पाणी ही पाजत नव्हतं. त्याची एक खोड अशी होती की त्याला खायला टाकेपर्यंत किंवा पाणी पाजेपर्यंत तो काहीच करत नव्हता. जस त्याच्या समोरची बदली उचलून पाठ फिरवली रे फिरवली की लगेच माघून धडकी द्यायचा. त्यामुळे त्याला खायला टाकायचं ही भ्याव वाटायचं. एकदा तर आई गोठ्यातला शेणकुर करत असताना आईला गोठ्यातच लोळवल होतं त्यानं. एक दिवस तर गड्याने कहरच केला ज्या बाबांनी त्याला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं. लहानच मोठं केलं होतं त्यालाच आता तो मारायला लागला होता. एक दिवस औत सोडलं न बाबा त्यांना जवळच्या बांधावर चरण्यासाठी घेऊन जात होता तर जाताजाता वनाश्याला काय हुकी आली काय माहीत बाबालाच बांधावर उचलून टाकलं होतं. भाऊ जवळ होता म्हणून थोडक्यात निभावल त्या दिवशी. आणि अजून एक गोष्ट अशी होती की त्याची शिंग पाठमोरी होती न गोल आकाराची झाली होती . त्यामुळं जरी मारलं तर फक्त मुका मार लागायचा. असं करता करता त्यानं भाऊ सोडून सगळ्यांनाच शिंगाव घेतलं होतं. अगदी मला ही नाही सोडलं त्यानं. माझ्या बाबतीत काय झालं तर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग सुट्टीमध्ये मी नेहमी भावा सोबत जायचो औतावर बसायला. कारण कुठं वावरात जास्त गबाळ( गवत) झालं असलं की कुळाची किंवा फरटाची पाळी घालावा लागायची. मग गवत निघण्यासाठी औतावर वजन म्हणून एक छोटासा दगड ठेवायला लागायचा. पण मी सोबत असलो की भावाचा दगड ठेवायचा ताण( त्रास) वाचायचा न दगडाची जागा मी घ्यायचो. खूप मज्जा यायची न जेंव्हा वेळ भेटेल तेव्हा मी एखादं औताच मोडान( चक्कर) आणायचो. असं औतावर बसून बसूनच मी औत हाकायला ही शिकलो होतो. औत हाकून झालं की भाऊ वनाश्याला न मथुऱ्याला चाराया नेण्याचं काम माझ्याकड सोपवायचा. असं रोज त्यांच्या सोबत जाऊन जाऊन मला जरा अति आत्मविश्वास आला होता की वनाश्या आता मला चांगला ओळखायला लागलाय न मला मारनार ही नाही. पण तोच अति आत्मविश्वास एक दिवस माझ्या चांगलाच अंगलट आला. झालं काय की बांधाला चरता चरता कासरा वनाश्याच्या पायात गुतला होता न तो मी अति आत्मविश्वासाने काढायला गेलो. पार अगदी त्याच्या गळ्याला मिठी मारायचाच राहिलो होतो. जसं मी कासरा काढायला गेलो तसं वनाश्यानं मला जवळच्या गव्हात उचलून टाकलं. मी आयोव.... आयोव करत तिथून पळत बोंबलत सुटलो थेट भावाला जाऊन गाठलं. अन त्याला मोठ्याने भोकाड वासवतच घडलेला प्रकार सांगून टाकला. त्यानंतर मी वनाश्याला कधीच चारायला घेऊन एकटा गेलो नाही. वनाश्यानी त्या दिवशी मला उचलून टाकून भाऊ सोडून सगळ्यांना मारल्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर बैल पोळा आला की आम्ही दोन भाऊ ( संदिप अन मी) बैलांन पेक्षा गाईच्या गोऱ्यांना जास्त सजवायचो. नवी घुंगर माळ नवी मोरखी असं सारं काही नवं नवं आम्ही गोऱ्यांना सजवायलाच जास्त वापरायचो. गावात मिरवणुकीला ही मस्त सजवून न्यायचो. वनाश्याकड थोडं दुर्लक्ष च करायचो आम्ही. त्याला चिडवत बोलायचो आम्हांला लई मारितो ना तुला सजवणारच नाही जा. गोणीतून काढलेलं आमच्या हातचं काय उरलं सुरल गोंड कांडकी भाऊ त्यांना बांधायचा न छान सजवायचा. वनश्याला हिंगोळ लावायचं काम भावकडच असायचं. त्याला दुसरं कोणी हिंगळ लावलेलं आवडतच नव्हतं. पोळा झाला की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सगळ्या घुंगरमाळा व ईतर सामान सोडून ऐका गोणपाटात बांधून ठेवायचं. परत दुसऱ्या वर्षी तेच सामान काढून त्यांना सजवायचं. काही खराब झालं तरच नवीन आणायचं नाहीतर तेच वापरायचं. असं दरवर्षीच असायचं. पण मज्जा यायची पोळ्याला. मला वाटतं अजूनही त्या घुंगर माळा तश्याच आहेत त्यांना बंधायचो त्या. तेव्हढीच एक काय आठवण उरली आहे त्यांची. आता राहिला होता फक्त भावाचा नंबर. तर एक प्रसंग असा आला की ज्वारीची कनसं काटणीचा सिजन चालू होता. रानात काटलेली कणसं बैलगाडीची साटी भरून घरी आणायची व घराच्या माळदावर उन्हाला तापायला घालायची. त्या दिवशी ही अशीच कनसांची साटी भरून घरी आणली होती ती गाडीतून घराच्या ओट्यावर खाली करत होतो. आणि ओट्याच्या जवळच लगेच बैलांची दावन होती. गाडी खाली होई पर्यंत त्यांना भावाने तिथंच बांधलं होतं. गाडीच्या धुऱ्या खाली करताना चाकांना उटी लावली नसल्यामुळे उतार असल्यामुळे गाडी काय भावाला झेपवता आली नाही. भाऊ गाडी सोबत नेमकी वनश्या च्या समोर आला न तसच वनाश्यानं भावाला माघून जोरदार धडक दिली. वनाश्याने दिलेल्या धडकेमुळे भावाचं तोंड जाऊन नेमकी धुऱ्यांना आदळलं व भावाचे समोरचे दोन दात जाग्यावरच गळून पडले. घडीभर तर कोणाला काहीच कळले नाही की नेमकी काय झालं ते. नशिब भावाला दुसरी काही जास्त ईजा झाली नव्हती मात्र भावला त्याचे दोन दात कायमचे गमवावा लागले. आता घरात एकच चर्चा चालू झाली की वनाश्याला विकून टाकायचा म्हणून. आज दात पाडलेत उद्या कोणाचा जिव घेईल म्हणून. पण भावाला त्याचीच चूक लक्षात आली व म्हंटला वनाश्यानी मला मारलचं नाही तर मी गाडी घेऊन तो बसला असताना त्याच्या शिंगावर जाऊन बसलो. जेव्हा तो घाबरून उठला तेव्हा माझं तोंड धुऱ्यांना आदळल म्हणून. काहीजण बोलत होते घरचा बैल आहे काय वाया जाईल का ? परत दुसरा कसा निघतोय कसा नाही. अश्या अनेक उलट सुलट चर्चा नंतर वनाश्याला विकायचं रद्द करण्यात आलं. हा भावाने तरी त्याचा राग काढलाच त्याच्यावर थोडा. राग काढला म्हणजे चांगला चोपला होता वनाश्याला. आता मात्र वनाश्या आणि मथुऱ्या दोघही थकले होते. नांगराला चालताना त्याची चाहूल लागत होती भावाला. आता चाव्हरीला चालायची त्यांची ताकद संपली होती. अन त्यातच दुष्काळ ही पडला होता. पुढील वर्षीची नांगरट काशी करायची हा भावाला मोठा प्रश्न पडला होता. आता परत एकदा दोघांनाही विकायचा विषय घरात हळूहळू येऊ लागला होता. वाटत होतं यांना नाही विकावा खूप सेवा केली त्यांनी. दावणीलाच मारून द्यावं यांना असं सगळ्यांना वाटायचं पण दुष्काळ पडल्यामुळे चार चार बैलं सांभाळणं अवघड होतं. शेती केल्या शिवाय तर काही पर्याय नव्हता. आईनं व भावानं काळजाव दगड ठेऊन एक दिवस दोघांनाही विकून टाकलं. आमच्या आयुष्यतला वनवाश्या आम्हांला कायमचा सोडून गेला होता. त्या दिवशी घरात चूल सुद्धा पेटवली नव्हती. घरच्या दावणीला बैलं येत राहतील जात राहतील पण वनवाश्या सारखा बैल कधीच दावणीला दिसणार नाही हे ही तेव्हढंच खरं. मी सुरवातीला जसं म्हंटल ना की आमचा संसार उभा करण्यात भावाचा न आईचा जेव्हढा वाटा आहे तितकाच वाटा मला वनवाश्या चा ही वाटतो. जो पर्यंत घरात पोळा साजरा होत राहील तोपर्यंत वनवाश्या ही आमच्या मनात साजरा होत राहील कायमचाच.... सोमनाथ कोंडीभाऊ चौधरी मु. पो. करंदी, ता. पारनेर जि. अहमदनगर 9421778013

Friday, August 30, 2024

सुंदर!!👍 आणि धारेबाबांना विनम्र अभिवादन!!

छान! सुंदर!!👍 आणि धारेबाबांना विनम्र अभिवादन!!🙏 राघोजी भांगरे नंतर आता एक एक आदिवासी क्रांतिकारक समोर येत आहे! याला कारण मोबाईल! मोबाईलमुळे अगदी छोटीशी गोष्ट जगभर क्षणात पोहचते. धारेबाबा प्रमाणेच आमच्या खिरविरे गावचे " रामा डगळे " नावाचे बंडकरी 1920 ते 1945 दरम्यान होऊन गेले. अगदी 1980 सालापर्यंत ते हयात होते. पण रामा डगळे यांचे बंड इंग्रज सरकार विरुद्ध नव्हते तर राजूर येथील जे वाणी, गुजराती आदिवासीना त्रास देत असत, त्यांच्या जमिनी कर्जपायी गहाण घेऊन आपल्या नावावर करून घेत असत, अशा गुजराती सावकरांविरुद्ध रामा डगळे यांनी बंड पुकारले होते. रामा बंडकरी म्हणून ते नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. वेळ मिळाल्यास रामा डगळे बंडकरी यांच्या विषयी मला जे माहित आहे, ते मी आपणास विस्तृतपणे लिहून पाठविण. कारण रामा बंडकरी यांच्या तोंडून मी त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या आहेत! धन्यवाद!🙏 शुभ रात्री!🙏🙏 ....... पराड सर. ( खिरविरे )

श्री क्षेत्र धारेराव मंदिर कुमशेत

श्री क्षेत्र धारेराव मंदिर कुमशेत 🙏 महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आदिवासी, डोंगराळ व दूर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. अशा या अकोले तालुक्यात ज्या वीरांच्या रक्तातून इतिहास धावला, ज्यांच्या मनगटात रग आणि छातीत धग होती असे राघोजी भांगरा, बापू भांगरा, रामा किरवा, धरमा मुंढा, खंडू साबळा, बुधा पेढेकर व धारेराव असवला या आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्याच्या खूप जुन्या इतिहासाची पार्श्वभूमी या तालुक्याला लाभलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात(सन – १८०० ते १८५० च्या दरम्यान) ‘आदिवासी ४० गाव डांगाण’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुळा व प्रवरा नदी खोर्‍यातील भागात ‘राजूर’ ही खूपच जुनी व एकमेव मोठी मानाची बाजारपेठ होती. याच परिसरात डोंगरदर्‍यातील आदिवासी भागात सावकारशाही व इंग्रज राजवटीतील अधिकार्‍यांनी दुही माजवली होती. रानावनांत राहाणार्‍या, गोरगरीब आदिवासींच्या कुटुंबात जाऊन धान्य, कोंबड्या व बकरं मागणे; आणि नाही दिले तर धाक दाखवणे, हाणामारी करणे अशा प्रकारचा छळ व त्रास इंग्रज सरकारने नेमलेले अधिकारी करत असत. सावकार अल्प मुदतीचे कर्ज देऊन आदिवासी बांधवांच्या जमिनी ताब्यात घेत असत. पोटाला चिमटा घेऊन जगणार्‍या कोंडारोंडा, रानभाज्या, जंगली कंदमुळे खाऊन पोट भरणार्‍या आदिवासींची लेकरं मात्र भाकरीच्या तुकड्यासाठी टाहो फोडायची. परंतु सावकारशाहीला कधीच या दीनदुबळ्या आदिवासींची दया आली नाही. अशा या जाचक, जुलमी इंग्रज राजवट व सावकारशाहीला लगाम घालण्यासाठी सह्याद्रीची वादळं क्रांतिकारकांच्या रूपानं पेटून उठली. अशा या वादळांनी अकोले तालुका व राजूर पंचक्रोशीत १८ व्या शतकात अनेक चळवळी व बंड पुकारले. या आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रज राजवट व सावकारशाहीला ‘सळो की, पळो’ करून सोडले; आणि माझ्या आदिवासी समाज्यावर होणार्‍या अन्यायाला व अत्याचाराला वाचा फोडली. याच कालखंडात क्रांतिकारी चळवळीत व बंडात उडी घेऊन आदिवासी समाज्यासाठी जीवाची बाजी लावणार्‍या वीर धारेराव या खास आदिवासी रत्नाची पारख आपण या कथेच्या माध्यमातून करून घेणार आहोत. सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं, सह्याद्रीची शान आणि सह्याद्रीचा मान म्हणून नावाजलेलं कुमशेत हे एक आदिवासी गाव. या गावाला निमकोकण असे मी म्हणेल; कारण अकोले तालुक्यात जून महिण्यात कुठेही पावसाची चाहूल नसतांना सुद्धा अगदी कोकण परिसराप्रमाणेच कुमशेत गाव परिसरात जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाच्या हलक्या तर काही अंशी जोरदार सरी बरसू लागतात. त्यामुळे येथील बळीराजा मात्र लवकरच सज्ज होऊन आपल्या भातशेतीची जमीन कसण्यास तयार असतो. अशा या अतिदूर्गम, डोंगराळ भागात १८ व्या शतकात कुमशेत गावी वीर धारेराव यांचा जन्म एका सामान्य व गरीब शेतकरी कुटुंबात झाला. धारेराव लहानपणापासूनच गुरे राखण्याचे व चारण्याचे काम करत. त्यामुळे निसर्गाशी, झाडाझुडपांशी, डोंगरदर्‍यांशी नाळ जोडलेल्या या माणसाला परिसराची खडान् खडा माहिती होती. एकदा रानात गुरे चारत असतांना धारेरावांना कोकतर (रान कोंबडी) दिसली. दगडी गोट्याचा नेम धरून धारेरावांनी त्या रानकोंबडीची शिकार केली. शिकार केलेली रानकोंबडी धारेराव एका वनस्पतीच्या पानांत गुंडाळून सायंकाळच्या वेळी आपली जनावरे घेऊन घरी आले. जनावरे गोठ्यात जाऊ लागली. त्यावेळी धारेरावांनी शिकार करून आणलेली रानकोंबडी हार्‍या(बांबूपासून बनवलेले कोंबड्या डालण्याचे साधन) खाली डालून ठेवली; आणि धारेराव जनावरे दावणीला बांधण्यासाठी गोठ्यात गेले. जनावरे बांधून बाहेर आल्यानंतर शिकार करून आणलेल्या रानकोंबडीची सागोती(चिकन) करण्यासाठी त्यांनी हारा उचकला. तर काय..? त्या वनस्पतीच्या पानांत गुंडाळून आणलेली रानकोंबडी पुन्हा जिवंत झाली होती. धारेरावांना जरा आश्चर्यच वाटले. मग त्यांच्या डोक्यात विचार आला की, या वनस्पतीचाच काहीतरी चमत्कार घडला असावा. क्षणाचाही विलंब न लावता धारेराव आल्या मार्गे पुन्हा जंगलात गेले. त्या ठिकाणी पोहचल्यानंतर धारेरावांनी त्या वनस्पतीच्या काही मुळ्या, पाने आपल्या जवळ असणार्‍या कापडी बटव्यात घेतल्या व घरी आले. रात्री जेवण झाल्यावर बर्‍याच उशीराने धारेरावांनी बटव्यातील मुळ्या व पाने बाहेर काढली. त्या मुळ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या व एका खडबडीत दगडावर उगाळून एक ग्लासभर रस तयार करून स्वत:पिऊन घेतला. त्या आणलेल्या पानांतील एक दीड पाने खाल्ली. त्यानंतर धारेराव निवांतपणे झोपी गेले. मध्यरात्रीच्या वेळी झोपेत असतांना एक अद्भूत संवेदना धारेरावांच्या देहाला जाणवली. धारेराव अचानक झोपेतून ताडकण उठले. तेंव्हा त्यांना शरीर व डोके जड झाल्याचे जाणवू लागले. तेंव्हा आपल्या देहात नक्कीच काहीतरी एक दैवी शक्ती संचारल्याची जाणीव झाली. याच काळात राजूर पंचक्रोशीत आदिवासी समाज्यावर होणार्‍या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी क्रांतिकारी चळवळींना वेग येऊन रौद्ररूप धारण केले होते. राघोजी भांगरे, कोंड्या नवला अशा आदिवासी क्रांतिकारकांनी या चळवळीत उडी घेऊन बंडाची ठिणगी पेटविली होती. त्याच्या पडसादांनी सह्याद्री पूर्णपणे दुमदुमली होती. त्याचवेळी सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या दीनदुबळ्या आदिवासी बांधवांवर होणार्‍या अन्याय व अत्याचाराचा सूड घेण्यासाठी कुमशेत गावचे सुपुत्र वीर धारेराव हे एक आदिवासी वादळ अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेले शेवटचे गाव कुमशेत, ठाकरवाडी पंचक्रोशीत पेटून उठले होते. आदिवासी गोरगरीबांना धान्य, कपडे, थोडेफार पैसे अशी मदत पुरवत होते. धारेराव ठाणे जिल्ह्यातील सावरणा, बांडशेत, वालिवरे अशा आदिवासी गावातील जनतेला देखील मदत करायचे. अगदी जव्हार, माळशेजच नाही, तर.., भीमाशंकर पर्यंत आपल्या मदतीचा हात जनसामान्यांसाठी पुढे करत होते. धारेरावांचे हे कार्य इंग्रज राजवटीच्या व सावकारशाहीच्या डोळ्यात सलू लागले. धारेरावांच्या मदतकार्याला चाप लावून धारेरावांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ‘पाथरे’ घाटातील पोलिस चौकीत इंग्रज पोलिस तैनात केले होते. परंतु संजीवनीच्या स्वरूपातील वनस्पती सेवन केलेल्या धारेरावांच्या अंगी काहीतरी दैवी शक्ती संचारत असल्याने इंग्रज पोलिसांना धारेरावांना पकडण्यात यश आले नाही. पोलिस त्यांना पकडायला आल्यानंतर धारेराव १००० फुटाचा कडा(कोकणकडा) सहज उतरून खाली जायचे व पुन्हा सहज वरती चढूण यायचे. वार्‍यासारखे धावायचे, पळायचे, कधी – कधी कोकणकड्यावरून सहज खाली उडी टाकायचे, तरीही कसलीच जखम, ईजा धारेरावांना होत नव्हती. धारेराव बाबा बहुरूप्या सारखी वेगवेगळी रूपं धारण करायचे. कधी गुराखी… तर कधी मध काढणाराचे रूप घ्यायचे. कधी – कधी वाटसरू होऊन पोलिसांत देखील मिसळायचे. गप्पा मारायचे. त्यांच्यातच राहून पोलिसांच्या हालचालींची टेहळणी करायचे. पोलिस त्यांनाच विचारायचे धार्‍या दिसला काय कुठे? तेंव्हा हा बहुरूपी धार्‍याच उत्तर द्यायचा की, तो बंडकरी..? असेल कुठेतरी..?घनदाट जंगलात, कडेकपारी. परंतु बहुरूपी स्वत: धार्‍या असल्याची भणक देखील कधी इंग्रज पोलिसांना लागू दिली नाही. धार्‍याला पकडून देणार्‍या ईसमाला इंग्रज पोलिसांनी ईनाम सुध्दा घोषित केले होते. इंग्रज सरकारने धार्‍याला पकडण्यासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल, प्रत्येक योजना अयशस्वी होत होती. १५-२० दिवस दबा धरून बसलेल्या पोलिसांना धार्‍या सापडत नव्हता. धार्‍याला पकडायला इंग्रज पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. त्यामुळे पोलिसही चवताळले होते. रानावनांत दिसणार्‍या आदिवासींना दम भरत होते. मारझोड करत होते. त्यामुळे धार्‍या कनवळला होता. अखेर त्याने स्वत: इंग्रज पोलिसांच्या स्वाधीन होऊन शरणागती पत्कारायचे ठरवले होते. एके दिवशी धार्‍याने पोलिसांची भेट घेऊन आदिवासींवर होणारा अन्याय व अत्याचार थांबविण्याबाबत विनंती केली. आणि म्हणाला की, तुम्ही मला शरण या. मी सुध्दा तुम्हाला शरण येतो. मग तुम्ही मला ज्या ठिकाणी न्याल त्या ठिकाणी मी तुमच्याबरोबर येण्यास तयार आहे. परंतु माझी एक अट आहे, ती म्हणजे माझे फक्त शीर(मुंडके/डोके) कापून न्या. माझे धड मात्र माझ्या जन्मभूमीत राहू द्या. मग मात्र इंग्रज पोलिस तयार झाले. धार्‍याला पकडून त्याचे शीर कापले गेले. आणि त्वरित पुणे या ठिकाणी सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी त्या काळात जेलमध्ये इंग्रज जेलर जो कोणी होता, त्याच्या समोर वीर धारेरावांचे शीर ठेवण्यात आले. त्या जेलरने धार्‍याचे शीर पाहिल्या बरोबर धार्‍याच्या शीराला व आदिवासी समाज्याला ‘शिवीगाळ’ केल्याचा प्रकार घडला असावा. (असा अंदाज वर्तवला जातो) त्याच क्षणी धार्‍याचे शीर जिवंत होऊन त्या जेलरच्या नरड्यावर उडून बसले व जोराने चावा घेतला. तसाच जेलर घाबरला व जोरात विव्हळला. आपल्या दोन्ही हातांनी जोराने धार्‍याच्या शीराला पकडून बाजूला झटकले. तेंव्हा माझ्या या शीराला माझ्या जन्मभूमीत घेऊन चला असे धार्‍याच्या शीराने इंग्रज पोलिसांना बजावले. धार्‍याच्या शीराचा असा रौद्र व राक्षसी अवतार पाहून इंग्रज पोलिसही घाबरले होते. त्यामुळे विलंब न लावता पोलिस धार्‍याचे शीर घेऊन कुमशेतला आले, आणि ज्या ठिकाणी धार्‍याचे धड पडले होते, त्या ठिकाणी या लढवय्य क्रांतिकारकाचा अंत्यविधी करण्यात आला. अशी आख्यायिका/वीर धारेरावांची कर्मकथा कुमशेत येथील काही वृद्ध जाणकार लोक, सरपंच सय्याजी असवले, सराजी असवले, बुधा बांडे इ. ग्रामस्थ मंडळी सांगतात. इतिहासात कुठेही या वीर धारेरावांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद झाली नाही, म्हणून ही आख्यायिका मागे पडली असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. असा हा गोरगरीबांचा कैवारी धार्‍या.. आदिवासी जनतेच्या गळ्यातील जणू काही ताईत बनला होता. आदिवासी समाज वीर धारेराव बाबांना देव मानतो, आजही मानत आहे. काही वर्षानंतर धारेराव बाबांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी धारेराव बाबा आदिवासी जनतेच्या सदैव स्मरणात रहावेत म्हणून कुमशेत गावच्या ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून एक धारेरावांचे समाधीस्थळ म्हणून एक मंदीर बांधले. स्मशान म्हटलं की, प्रत्येकाच्या मनात अगोदरच एक प्रकारचं भय निर्माण झालेलं असतं. परंतु या धारेराव बाबांचे अंत्यसंस्कार केंद्र/समाधी या आधुनिक युगात अकोले तालुक्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र बनले आहे. जणू काही स्वर्गातील इंद्राची बाग ‘नंदनवन’ या कुमशेत व ठाकरवाडी परिसरात अवतरले आहे. अगदी तिनही मौसमात निसर्गाची खरी नवलाई पाहून मन भरून जाते. त्यामुळे पर्यटकांच्या चेहर्‍यावरील आनंद हा अगदी ओसांडून वाहत असतो. म्हणून दरवर्षी हजारो पर्यटक या निसर्गरम्य परिसरात धारेराव बाबांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. पर्यटकांचे खास आकर्षण म्हणजे वीर धारेरावांचे मंदिर, अहमदनगर व ठाणे जिल्ह्यांची सीमारेषा ठरलेला अवाढव्य असा कोकणकडा, आजोबा पर्वत, नाफ्ता डोंगर, घोडी शेप, जुडी कलाडगड, कोंबडा डोंगर, गवळी देव, घनचक्कर डोंगर, मुडा डोंगर, घोड पाऊल, शिपाई बुडी ओढा आणि पाथर्‍या घाट अशी विविध नयनरम्य पर्यटनस्थळे व धारेराव बाबांचे गुरू सदोबा महाराज यांचे समाधीस्थळ पर्यटकांचे लक्ष वेधल्या शिवाय राहात नाही. कळसुबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्यातील जैवसृष्टीचा खजिना या धारेराव बाबांच्या पावनभूमीत कुमशेत परिसरात आपल्याला पाहावयास मिळतो. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट अरण्य, महाराष्ट्राचे मानचिन्ह शेकरू आपल्याला या अरण्यात पाहावयास मिळतो. तसेच वाघ, बिबट, रान डुक्कर, तरस असे अनेक प्रकारचे प्राणी व विविध प्रकारचे पक्ष्यांचे आपल्याला दर्शन घडते. खरी ग्रामीण जीवनशैली कशी असते याची जाणीव आपल्याला होते. रायभोग भाताचे जुने पारंपारिक वाण या गावाने टिकवून ठेवले आहे. आजही काही शेतकरी रायभोग भाताचे पिक घेतात. भोजनात रायभोगाच्या तांदळाचा भात सेवन करतात. या तीर्थक्षेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर पुढील परिसरात साधारणतः १०० कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचा शेंदूर फासलेला गोलगरगरीत दगड(गोटी) ठेवली आहे. भाविक भक्ताने वीर धारेराव बाबांचे नाव घेऊन एखादी इच्छा मनोमन व्यक्त करायची व ती दगडाची गोटी उचलण्याचा प्रयत्न करायचा, जर त्या भक्ताच्या मनातील ईच्छा/मनोकामना धारेराव बाबांच्या कृपेने पूर्ण होणारी असेल तर ती दगडाची गोटी उचलते. अन्यथा उचलत नाही. अशी एक या दगडाची(गोटीची) आख्यायिका वृद्ध व जाणकार लोक सांगतात. चैत्र महिन्यामध्ये कुमशेतकर मंडळी संपूर्ण महिनाभर आठवड्याचा एक दिवस असे धारेराव बाबांसाठी पाच रविवार पाळीक दिवस(मोडे) पाळतात. या मोड्याच्या दिवशी शेतात कोणत्याही प्रकारचे कुठलेच काम करत नाहीत.

Thursday, August 15, 2024

संदीप वाकचौरे

नमस्कार, आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार.. खरे तर वाढदिवस म्हणजे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस.. आजवरच्या झालेल्या प्रवासात आपण काय मिळवले आणि काय गमावले याचा हिशोब करण्याचा दिवस.. आजवरच्या प्रवासात शब्द आणि विचार सोबतीला होतेच .त्यांनी कधी धोका दिला नाही आणि त्यांच्या सोबतीने जगताना कधी निराशाही आली नाही. कदाचित माणसे सोबतीला होती.. ती दूरही गेली असतील.. मात्र शब्द, विचारांची सतत सोबत राहिली. त्या शब्द, विचारांच्या सोबतीने जगताना अनेक चांगली माणसे मिळत गेली .ही माणसे जीवनाची कायमची ठेव बनली. या माणसांनीच जगण्याचा आधार दिला.. या माणसांनी प्रेम ,स्नेह असं सारं भरभरून दिले. तुम्ही माझ्या आयुष्याचा प्रवासातील शक्ती प्रदान करणारे सशक्त हात आहात याची मला पूर्णत: जाणीव आहे.त्यामुळे आजचा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या शुभेच्छामुळे माझा आनंद द्विगुणित करणारा झाला आहे.तुमच्या शुभेच्छांच्या बळामुळे उद्याच्या जगण्याची उमेद उंचावत जाणार आहे.तुमच्या स्नेह असाच वृद्धिंगत होवो..ही अपेक्षा.. आपले पुनश्च मनःपूर्वक आभार. संदीप वाकचौरे

Friday, July 19, 2024

राही मावशी

बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे..... सौ . राहीबाई सोमा पोपेरे , राहणार कोंभाळणे तालुका- अकोले, जिल्हा अहमदनगर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला . वडिलांची गरिब परिस्थिती आणि घरी सात भावंडे असल्याने राहीबाईंना शाळेत घातलेच नाही . घरी आई वडिलांसोबत त्या शेतामध्ये मदत करु लागल्या . बालपणापासूनच शेतीची आवड असलेल्या राहीबाईंना वयाच्या बाराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी जावे लागले . त्यांचे माहेर आणि सासर कोंभाळने गावचेच आहे. सासरी आल्यानंतर पती सोमा यांचे सोबत त्या शेतात राबू लागल्या .सुरुवातीला रासायनिक शेतीकडे कल असल्याने त्यांनी या शेतीचा अनुभव घेऊन पााहिला . घरातील वाढते आजारपण व दवाखाण्यावर होणारा बेसुमार खर्च याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की संकरित वानांना उत्पादन जरी जास्त येते तरी उत्पादन खर्चही मोठा होतो .रासायनिक औषधे व कीटकनाशके मोठयाप्रमानात वापरल्याने त्यांचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो . त्यानंतर त्यांनी परस बागेत गावरान भाजीपाला उत्पादन घरी खण्यासाठी सुरू केले .त्यांना परसबाग उभारणी साठी जनरल मिल्स पुरस्कृत व बायफ संस्था संचलित आदिवासी विकास प्रकलपांतर्गत मदत करण्यात आली .त्यांना यासाठी विविध फळझाडे जसे की चिक्कू , आंबा , सीताफळ , पपई , लिंबू , कढीपत्ता , शेवगा , हादगा , अंजीर , या प्रकारची बहुवर्षायू फळझाडे लागवडीसाठी देण्यात आली . सोबतच तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले.पाणी नसल्याने ही झाडे कशी सांभाळणार हा प्रश्न त्यांना पडला .त्यावर त्यांना बायफच्या कृषी तज्ञांनी मार्गदर्शन करताना दगडांपासून आच्छादन झाडांच्या बुंध्या सभोवती करण्याचा सल्ला दिला. दगडांचे आच्छादन केल्यामुळे अत्यंत कमी पाण्यात झाडे तग धरू लागले . हवा , सोसाट्याचा वारा, वादळ व प्रखर ऊन यापासून बाष्पीभवनाने उडून जाणारे पाणी वाचून झाडांना त्याचा उपयोग होऊ लागला . हळूहळू परसबाग वाढू लागली आणि राहीबाईंचे मन परसबागेत रमू लागले . या परस बागेतच देशी गावरान बियांचा संग्रह पुन्हा जमू लागला. त्यांनी हाळू हाळू देशी बियांच्या वाणांचा संग्रह निर्माण करून शेती मधेही बदल घडवून आणला . रासायनिक शेतीकडे झुकलेला परिवार पुणे पुन्हा गावरान व अस्सल देशी पिकांकडे वळवला. दरम्यान बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेशी त्यांचा बचत गटांच्या माध्यामाने समंध आला .एके दिवशी बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे दिवसभराचे कामे आटोपून शेजारील मोठे असलेले गाव खिरविरे येथून परतीचा प्रवास करताना राहीबाई यांच्याकडे चहा पिण्यासाठी थांबले . रस्त्याच्या कडेलाच राहीबाई यांचे घर असल्याने व पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा कमालीचा वाढला होता त्यामुळे रस्त्यात विसावा म्हणून सहज ते राहीबाई यांच्या वस्तीवर वळले होते.. घरा समोरील ओट्यावर बसून त्यांनी राहीबाई सोबत गप्पा सुरू केल्या. चहा पिता - पिता त्यांचे लक्ष्य राहीबाई निवडत असलेल्या बियाण्यांकडे गेले. नुकताच पाऊस सुरू झाला म्हणून शेतावर लागवडीसाठी त्यांना ही बियाणे घेऊन जायचे होते . त्यांना विचारणा करून या बियांची माहिती त्यांनी घेतली . येवढे विविध प्रकारचे बियाणे बघताना त्यांना नवल वाटले. त्यांनी अधिक चौकशी केली असता गाडगे , मडके , कणग्या , बळद आणि शेणाने सारवलेल्या भिंती यातील अस्सल गावठी वणाचे बियाणे त्यांनी दाखविण्यासाठी काढून आनले . श्री.जितीन साठे यांनी ही सर्व बियाणे आणि त्यांचे प्रकार यांच्या नोंदी घेतल्या . सर्व प्रकार आणि काही भाज्या यांचे त्यांनी फोटोही घेतले . हेसर्व करत असताना त्यांच्या लक्षात आले की. श्रीमती राहिबाई यांच्याकडे सुमारे सतरा प्रकारचे पिके व 48 वाण एकाच वेळेस उपलब्ध आहेत . नुसतेच हे सांभाळलेले नव्हते तर या सर्व वाणांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होटी. विशेष म्हणजे त्या शाळा शिकलेल्याच नसताना हि सर्व माहिती ध्यानात ठेवणे ही खूप कठीण बाब आणि इतकीच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बियांची माहिती संकलित केल्यानंतर साठे यांनी ही माहिती वर्तमानपत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकार मित्रांना कळवली .या कामाची सर्वात पहिली दाखल सकाळ वृत्तपत्राने घेतली . नंतर जमा केलेली सर्व माहिती श्री. साठे यांनी विषय तज्ञ श्री. संजय पाटील यांना दिली व कोंभाळणे हे राहीबाई यांचे मूळ गाव जनुककोश प्रकल्पात जोडण्याची विनंती केली. हा कप्रकल्प या भागात नुकताच सुरू झाला होता . राहिबाईंचे पारंपरिक वाणांचे ज्ञान व बियाणे संग्रह याची नोंद घेऊन तिच्या राहत्या घरातील एक छोट्या खोलीत बियाणे बँक बायफ संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.गिरीशजी सोहनी यांचे मार्गदर्शनाने व हस्ते वर्ष 2016 मध्ये सुरू करण्यात आली . या बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रचार व प्रसार राहीबाई करू लागल्या. आज या बीज बँकेत 54 पिकांचे 116 विविध प्रकारचे आणि गुण वैशिष्ट्य असलेले वाण उपलब्ध आहेत . यातील वाल आणि पावटयाच्या सुमारे 20 वाणांचा संग्रह आहे .हे सर्व वाण प्रोटीन युक्त व कमी पाण्यावर येऊ शकणारे आहेत . यातील काही वाण तर हवेतील ओलाव्यावर येऊ शकणारे आहेत . या शिवाय भात , नागली , वरई , सुमारे 30 विविध प्रकारच्या भाज्या , तेल वर्गीय पिके , तृन व गळीत धान्य असे विविध प्रकारचे वाण त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत . निसर्गातील अमूल्य असा ठेवा पुढच्या पिढीसाठी ठेवला आहे. .बायफच्या मदतीने त्यांनी या वाणांचा प्रचार व प्रसार करतांना राज्य व देश पातळीवरील प्रदर्शनातून सहभाग नोंदवला आहे . या शिवाय शाळा , कॉलेज , बचत गट ,चर्चा सत्र ,शिबिरे , शेतकरी प्रशिक्षणे या माध्यमाने देशी वाणांचे जतन व प्रसार कार्य मोठया प्रमाणात केले आहे .अकोले तालुक्यातील आदिवासी भागात महिला बचत गटांच्या माध्यमाने स्थानिक वाणांचा प्रसार मोठया प्रमाणावर केला आहे .परसबागेत लागवडीयोग्य गावरान बियाणे राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहचवले आहे . कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची स्थापना करून त्या मार्फत स्थानिक वाणांचे संवर्धन व प्रसार कार्य बायफच्या मदतीने सुरू ठेवलेले आहे. .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोकमत वृत्तपत्र समूहाने सर्वप्रथम जिल्हा व नंतर विभाग पातळीवरील पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे .याशिवाय वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार ,बायफचा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार,आदिवासी विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार ,झी मिडियाचा अनन्य सन्मान ,कृषी विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय जिजामाता कृषिभूषण पुरस्कार , जिल्हा परिषद अहमदनगर कृषी विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शेतकरी जिल्हा स्तरीत पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत .बी.बी.सी. वर्ल्डने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 प्रतिभावान व प्रेरणादायी महिलांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे . त्यांना नुकताच IBN Lokmat News 18 या मराठी वृत्तवाहिनीचा आदर्श शेतकरी सन्मान श्री .चंद्रकांतदादा पाटील कृषी मंत्री यांचे हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला . दादांनी त्यांचे कार्याची खास दखल घेत बीज बँक तात्काळ बांधून देणार असल्याचे व्यासपीठावरूनच जाहीर केले .आणि अवघ्या 45 दिवसात भव्य बीज बँक आणि घर त्यांना बांधूनही दिले .त्याचा हस्तांतरण सोहळा तीन मार्च 2019 रोजी कोंभाळणे येथे माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .या प्रसंगी जिल्याचे पालकमंत्री श्री.राम शिंदेही हजर होते .राहीबाईंनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री .अचुतानंद द्विवेदी यांनी एक लघुपट त्यांच्या कार्यावर आधारित तयार केला . त्या लघुपटाला वर्ष 2019 मधील फ्रान्स येथे झालेल्या कांन्स चित्रपट महोत्सवात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक भेटले आहे .देशपातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारचा महिला व बाल कल्याण विभागाचा वर्ष 2018 चा नारी शक्ती पुरस्कार माननीय राष्ट्पती श्री . रामनाथ कोविंद यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. झी मीडियाचा उंचा माझा झोका या पुरस्कारनेही त्या नुकत्याच सन्मानित झाल्या आहेत .महाराष्ट्रातील तूफान गाजलेला विनोदी कार्यक्रम चला हवा येउद्यानेही त्यांना मंचावर निमंत्रित केले होते. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कारहि जाहीर झाला आहे.वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात राहीबाईचा संदर्भ आणि माहिती विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घेण्यात आली आहे.जगातील सर्वात सुंदर स्त्री होण्याचा मान मिळवलेल्या युक्ता मुखी यांनी राहीबाईंकडून आहार विषयी सखोल माहिती घेतली . रयत शिक्षण संस्थेचा देशपातळीवर दिला जाणारा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार( अडीच लाख रुपये) नुकताच त्यांना नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच पी. के .आण्णा पाटील फाउंडेशन तालुका - शहादा जिल्हा नंदुरबार येथे एक लाख रुपयाचा पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. ,नुकताच त्यांना 8 नोव्हेंबर 2021 रोजी मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा , भारत सरकार कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात झाला आहे . मसूरी , उत्तराखण्ड येथे असलेल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी भारत सरकार यांच्या माध्यमाने सुरू असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या फेस वन मधील प्रशिक्षणासाठी पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा कृषी क्षेत्रातील असलेला अनुभव नव्यानेच निवडण्यात आलेल्या व अमृत महोत्सवी बॅचचे 183 आयएएस अधिकाऱ्यांना माहिती करून देण्यासाठी किसान सामवेद अंतर्गत या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या यबीजमाता म्हणून ग्रामीम आणि आदिवासी भागात त्या प्रसिद्ध आहेत आणि हाजारो कष्टकरी ,गरीब लोकांना, शेतकरी कुटुंबाना त्या प्रेरणास्थान बनून राहिल्या आहेत .गावोगावी जशा पैशाच्या बँका आहेत तशाच गावरान बियाणे बँका तयार झाल्या पाहिजेत हे त्यांचे लक्ष आहे .गावरान बियाणे संवर्धन आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन प्रचार प्रसार व प्रत्यक्ष कार्यक्रम यावर भर दिला जाईल. शाळा , कॉलेजे , विद्यालये हे सुध्दा या कार्यक्रमाचा भाग असणार आहे.येत्या काही काळात शाळेतील मुलांना गावरान बियाणे संवर्धन आणि प्रसार व शेतीत त्यांना यशस्वी यावर परिपूर्ण माहिती देण्याचा एक कृती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.त्यासाठी बायफ संस्था , शासन , विविध विकास यंत्रणा व संशोधन केंद्र यांना सामावून घेत कार्यक्रम केला जाणार आहे. जास्तीत जास्त हा विषय शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे हा जीवनाचा भाग असेल असे त्या आवर्जून सांगतात .

Monday, July 15, 2024

भंडारदरा परिक्रमा म्हणजे पर्यटनाची उच्च अनुभूती

सकाळ विशेष शांताराम काळे अकोले, ता. १६ : सहाद्रीच्या कुशीत सुमारे साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराजीच्या खोबनीत वसवलेला सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा धरण) ब्रिटिशांनी १९९० मध्ये धरणाच्या बांधकामाला सुरवात केली आणि ते १९२६मध्ये पूर्ण झाले. ब्रिटिशांनी धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीमुळे परिसराला 'प्रतिकाश्मीर' म्हटले जाते. म्हणूनच या परिसरात पावसाळी सहलीसाठी पर्यटकांचों गर्दी होते. धरणाची परिक्रमा करणे म्हणजे पर्यटनानंदाची उच्च अनुभूतीच! भंडारदरा धरणाच्या परिसरात दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा म्हणजे बालाघाट. राकट कातळाच्या पिंगट करड्या रंगाची ही डोंगररांग ऋतुमानाप्रमाणेन तिचे सौंदर्यही बदलत जाते. कधी काळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटक इथे भ्रमंती करायचे, आता पावसाळी पर्यटनाचा आनंद येथे लुटला जातो. पावसाळ्यापूर्वी काजवा महोत्सव सरता ग्रीष्म आणि वर्षाऋतूंच्या आगमना अगोदरच्या संधिरुतूत या परिसरातील सादाडाची झाडे प्रकाशमान होतात. काजव्यांचे पुंजके इथल्या झाडांवर वास्तव्याला असतात, या काळात झाडांवर जनू चांदण्याचे संमेलन भरल्याचा भास होतो. त्याला काजवा महोत्सव म्हटले जाते. खरे तर लवकरच येणाऱ्या कृष्णजलदाच्या आगमनाची चाहूलच हे काजवे देतात. पावसाला सुरवात होताच त्यांचे जीवनचक्र संपते वर्षाकाला सुरवात झाली, की इथल्या काळ्या कातळाचा रंगही बदलू लागतो, संपूर्ण डोंगरावर हिरवाईची शाल पसरू लागते. जसजसे पावसाचे प्रमाण वाढते, तसतसे या पर्वतरांगांचे सौंदर्य खुलू लागते. डोंगरापलीकडून येणारे कृष्णमेघही या उतुंग शिखरांवर विसावतात. रेंगाळणाऱ्या मेघांमध्ये शिखरे, डोंगरवाटा लुप्त होतात. मेघदुलई बाजूला होताच डोंगरांच्या फटीतून कोसळणारे शुभ्र फेसाळनारे धबधबे नजरेस पडतात. लोभस 'अम्ब्रेला फॉल' भंडारदरा धरणाच्या अतोकडे १० किलोमीटरवर रंधा धबधब्याचे दर्शन पडायचे; मात्र आता कोदनी जलविद्युत३२मेगा वॅट प्रकल्पासाठी पाणी अडविल्यानेहा धबधबा अकसल्यासारखा कोसळतो असे वाटते, . त्यामुळे हल्ली धबधबा पाहायला मिळणे या भागातील पर्यटकाना अलभ्य लाभच। भंडारदरा जलाशय भरले, की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरुन सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकर धारण करत वहू लागतात. म्हणूनच त्याचे नाव 'अम्ब्रेला फॉल' ठेवण्यात आले. या धरणाखाली एक छोटेखानी पूल आहे. पर्यटकांना या पुलावर जाऊन तुषाररस्नान घेता येते. त्यामुळे 'अम्ब्रेला फॉल' लोभस झाला आहे. इथेही ब्रिटिशांच्या रसिकतेला दाद द्यावी तितकी थोडीच महाराष्ट्राची चेरापुंजी परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरवात करता येते. या भागातला प्रवास सुरू होतो, तसतसा निसर्ग आपल्याला त्याच्या कुशीत सामावून घेऊ लागतो. जलाशयाच्या बाजूने वळणे घेत घेत प्रवास करताना समोरच्या संततधार पाऊस, मेघांच्या दाट दुलईत अदृश्य होणारा रस्ता पार करताना आपसूकच ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा..' या ओळी ओठांवर येतात, रतनगडाच्या डोंगरमाथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदीचा उगम आहे .धरणापासून साधारण सात किलोमीटर आत गेल्यानंतर पांजरे नावाचे छोटेखानी गाव आहे. इथून कळसूबाई शिखराचे दर्शन घडते. 'महाराष्ट्राचे एव्हरेष्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाई येथून किंवा पलीकडच्या बारी गावातून चढाई सुरू करता येते. पांजरे गावातून पुढे घाटघरकडे जाता येते, पांजरे,घाटघर ,रतनवाडी ही गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात एकदा पाऊस सुरू झाला, की चार-सहा दिवस अविश्रांत कोसळने ठरलेलेच, घाटघरच्या कोकणकडावर उभे राहून खाली डोकावले, की खोल दरीतल्या उदंचन जलविद्युत प्रकल्प नजरेत भरतो. एका बाजूला छातीत धडकी भरविणारा कोकणकडा वेगाने रोरावणाऱ्या वाऱ्याचा नाद पर्यटकांना भुरळ घालतो. घटघरच्या घाटनदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. साम्रदची सांदण घाटघर कडून सांदण मार्गे रतनवाडीकडे जाताना साधारण एक किलोमीटर आडवाटेत सांदण आहे. पावसाचे तडाखे वर्षानुवर्षे झेलल्याने खडकावर आकाराला आलेल्या नानाविध रचना, कोकणकडाचे रौद्र रूप, कधी साहसला साद घालणारे सुळके तर कधी रांजणखळगे ..असा अनेक नैसर्गिक कला कृती येथे साकारल्या आहेत. . एक किलोमीटर लांबीच्या सांदणीची रुंदी साधारण५० फूट आहे. रतनगडाच्या पोटातून येणारा ओढा हा सांदणीतून वाहतो .त्यातील मोठमोठ्या शिळा साहसी पर्यटकांना साद घालतात अर्थात, पावसाळ्यात सांदणीत उतरणे धोक्याचे असते. अचानक पूर आला, तर आसरा घेण्यास सांदनीमध्ये जागा नाही. साम्रद पासून रतनवाडी येथे पोहचल्यावर इस इसन पूर्वीचे शिवकालीन हेमाडपंती शिवमंदिर पाहायला मिळते तर तेथूनच पुढे दक्षिणेला रतनगड आहे . रतनगड मार्गे भंडारदरा कडे निघताना काळ्या कातळावरून पांढरे शुभ्र ,नाणी फॉल,नेकलेस फॉल,कोलटेम्भे येथील बाहुबली फॉल पाहताना पर्यटक हरखून जातात धबधबे पाहत मुतखेलमार्गे धरणाचाजवळ पोचता येते. या ठिकाणी आपली संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते. या सर्व प्रत मुतखेलजवळच्यया डोंगरमाथ्यावरून पडणारे पायथ्याशों न पोचत वाऱ्यामुळे हवेतच विरतानाचे दृश्य पर्यटकांना थांबण्यास भाग पाडते काही ठिकाणी एकमेकांना बिलगुन उभी असलेलो कौलारू घरे इथल्या आदिवासी संस्कृतीचे येथे दर्शन घडवितात.

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...