Sunday, October 2, 2016

नगर जिल्ह्य़ातला अकोले हा तालुका अगदी निसर्गसमृद्ध आहे. हरिश्चंद्रगड, कलाड, कुंजर, आड, औंढा, पट्टा, बितिंगा, रतनगड, अलंग-मदन-कुलंग हे बेलाग किल्ले, कळसूबाईसारखे महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर, भंडारदरा धरण, घनदाट झाडी, घाटमाथ्याला अगदी लागून असल्यामुळे भरपूर पाऊस आणि विविध सुंदर मंदिरे यांनी अकोलेचा सारा प्रदेश खरंच नटला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावामधले सिद्धेश्वर मंदिर असो. ही शिल्पजडित मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील कलाकुसर मुद्दाम पाहण्याजोगी आहे. याच देखण्या मंदिरांच्या पंक्तीमध्ये येते ते म्हणजे टाहाकारी इथले श्रीभवानी किंवा जगदंबा मंदिर.
टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे. रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामाच्या नावाने याच ठिकाणी टाहो फोडला. जिथे तिने टाहो फोडला ते ठिकाण टाहो करी, आणि मग टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले असे इथे सांगितले जाते. अकोल्याच्या वायव्येला १६ कि.मी. अंतरावर असलेले हे अत्यंत देखणे, शिल्पजडित यादवकालीन मंदिर आढळा किंवा आरदळा नदीच्या काठावर वसलेले आहे. तीन गाभारे असलेले हे काहीसे निराळे मंदिर आहे. तीनही गाभाऱ्यांना एक सामायिक सभामंडप आहे. मुख्य गाभाऱ्यात वाघावर आरूढ झालेल्या अठरा हातांच्या महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली दिसतात. मंदिराच्या उर्वरित दोन गाभाऱ्यांमध्ये पूर्वेला महालक्ष्मी आणि पश्चिमेला महाकालीच्या सुंदर मूर्ती दिसतात. छताला मध्यभागातून खाली लोंबणारे एक दगडी झुंबर अप्रतिम आहे.
मंदिराच्या बाह्य़ अंगावर अनेक अप्सरा ज्यांना सुरसुंदरी असे म्हणतात त्यांचे मोठय़ा प्रमाणावर अंकन केलेले दिसते. काही सुरसुंदरींच्या डोक्यावर छत्र दिसते तर एका सुंदरीच्या अंगामध्ये युरोपियन पद्धतीचा कोट घातलेला अगदी स्पष्टपणे दाखवलेला आहे. अत्यंत विलोभनीय अशा या सगळ्या प्रतिमा आहेत. जवळच एक पडकं देऊळ आहे. तिथे एक संस्कृत शिलालेख असून त्यामध्ये शके १०५० म्हणजेच इ.स. ११२८ असा उल्लेख सापडतो. चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते, तर नवरात्रीत एकूण बारा दिवस इथे मोठा उत्सव केला जातो, ज्यात वीणा भजन हा एक आगळावेगळा कार्यक्रम सादर केला जातो. इथे मिळणारे अस्सल खव्याचे फिके पेढे आवर्जून खावेत असे असतात.
राम सीतेच्या शोधात भटकत असताना पार्वती त्याची परीक्षा घेते ही आख्यायिका टाहाकारी गावाजवळ असलेल्या या जगदंबा मंदिराशी जोडलेली आहे. हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत अनेक छोटय़ा गावांत प्राचीन कलाकुसर केलेली मंदिरे आहेत. एके काळी त्याकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिरे आज आडबाजूला पडली आहेत. प्राचीन काळी घाटवाटांचे/ व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले तशीच त्याकाळच्या राज्यकर्त्यांनी या मार्गावर मंदिरांचीही निर्मिती केली. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यापारी तांडय़ांची, पांथस्थांची विश्रांतीची, राहण्याची सोय या मंदिरांत होत असे. व्यापाऱ्यांनी केलेल्या दानामुळे या मंदिरांचा दैनंदिन खर्च आणि डागडुजीची कामे होत अशी परस्परपूरक रचना होती. इसवी सनच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी.
सह्यद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिद्ध!!
या पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील, अकोले तालुक्यात येणाऱ्या टाहाकारी गावात ‘जगदंबेचे’ प्राचीन मंदिर आहे. मंदिर म्हटलं की दंतकथा आलीच. नाशिक परिसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडित आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याच वेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले आणि तिला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धान पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.
टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवले जातात. मंदिराचे मूळचे तीन कळस कोसळलेले असून त्याजागी सिमेंटचे अतिशय बेढब कळस बांधलेले आहेत. तसेच मंदिराच्या समोर सिमेंटचा सभामंडप बांधून मंदिराची शोभा घालवायचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. आपले नशीब म्हणजे दगडी बांधणीचे मंदिर अजूनही जसेच्या तसे ठेवलेले आहे.
टाहाकारीचे हेमाडपंथी मंदिर भूमीज पद्धतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला ‘अधिष्ठान’ म्हणतात) उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली काष्ठमूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनिीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत.
मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला बाह्य़भाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाडय़ांमध्ये सुरसुंदरींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारिका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गजाननाची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.
मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी तालवाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे.
मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.
मंदिर परिसरात भक्तांसाठी बांधलेला नवीन हॉल आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मंदिर परिसरातील झाडी, जवळून वाहणारी नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे. या रम्य परिसराला आणि ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करत गेली अनेक शतके उभे असलेले हे मंदिराचे दगडी शिल्प पाहण्यासाठी एकदा वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.
मुंबईकर, नाशिककर स्वत:चं वाहन असल्यास एका दिवसात ‘टाहाकारीचं जगदंबा मंदिर’, ‘टाकेदचं जटायू मंदिर’ पाहू शकतात. जर वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन झालेला पट्टा किल्ला ऊर्फ विश्रामगडही पाहता येईल आणि एका दिवसात त्रिस्थळी यात्रा घडेल.
जाण्यासाठी :
१) मुंबई-नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर – घोटी गाव आहे. घोटी गावातून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदऱ्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटीपासून टाकेदपर्यंत पोहोचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहून टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.
२) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :टाकेद गावाबाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायूने रावणाशी युद्ध करून इथेच प्राण सोडला, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायूचे मंदिरसुद्धा आहे. जवळच रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारून तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अध्र्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडीपासून ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे



No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...