Sunday, July 29, 2018
Friday, July 27, 2018
आदिवासी आश्रमशाळेतील मुलींसाठी प्रेरिका कार्यशाळेचा आरंभ महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागातर्फे सामाजिक आर्थिक दृष्ट्या वंचित आदिवासी समाजासाठी ज्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्यांचाच एक भाग म्हणून आदिवासी मुलामुलींसाठी निवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. या आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना वयात येतांना आरोग्य विषयीचे अनेक प्रश्न भेडसावत असतात. त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांना इतर अनेक नवीन विषयांची माहिती व्हावी, यासाठी आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे यांच्याकडून प्रेरिका प्रशिक्षणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज महाराष्ट्रात आदिवासी मुलींसाठी ११०० च्या वर अनुदानित व शासकीय आश्रम शाळा आहेत. या शाळांमध्ये मुलींना शालेय शिक्षणाबरोबर त्यांना जीवन शिक्षणही दिले जाते. परंतु मुलींच्या आरोग्याचे प्रश्न हे मुख्यतः वैयक्तिक स्वच्छता, वयात येतानाचे प्रश्न, सुरक्षितता इत्यादींशी संबधित असतात. त्याचे प्रशिक्षण मिळाल्यास या मुलींमध्ये शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी होईल व त्या सक्षम देखील होतील. या कार्यशाळेत आरोग्याशी निगडीत विषयांबरोबर सामाजिक कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास, नैसर्गिक सौंदर्य वर्धन, कला-हस्तकला इत्यादी विषयही समाविष्ट आहेत याचे मार्गदर्शन आश्रमशाळेतील मुलींशी रोजचा संपर्क असणाऱ्या समन्वयक विद्यार्थिनी दिल्यास ते अधिक परिणामकारक होईल याचा विचार करून आश्रमशाळेत शिकणारीच एक नेतृत्वगुण असलेली व सभाधीट मुलगी-प्रेरिका म्हणून तयार करण्याची संकल्पना डॉ. किरण कुलकर्णी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी सुचवली व ती प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणण्याचे काम आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे या संस्थेला देण्यात आले आहे. या कार्यशाळा महाराष्ट्रात सर्वत्र सर्व ठिकाणी राबविण्यासाठी संस्थेने तज्ञ प्रशिक्षक तयार केलेले असून हे तज्ञ शिक्षक शाळांमध्ये जाऊन प्रेरीकाचे प्रशिक्षण पूर्ण करतील असा विश्वास श्री. एस.जी.चव्हाण, कार्यकारी संचालक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आदिवासी शाळेतून एका मुलीची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची कार्यशाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर यांच्या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा सावरचोळ येथे दि. २४ जुलै ते २८ जुलै २०१८ रोजी घेण्यात आली. यावेळी सहाय्यक शिक्षण प्रकल्प अधिकारी श्री. आर.के.साबळे, श्री. झोपळे, श्री. पायीके, कनिष्ठ विस्तार अधिकारी व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सावरचोळ येथील मुख्यध्यापक श्री. झरेकर, कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते व आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने प्रकल्प समन्वयक प्रा.विद्या वैद्य, श्री. दत्तात्रय ठोसर, सागर कोचरेकर व पूजा भीसे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात डॉ. दिपाली पानसरे यांनी महिला सबलीकरण या विषयावर उपस्थित प्रशिक्षांणार्थींना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. श्रद्धा वाणी यांनी आरोग्य व स्वच्छता या विषयावर माहिती दिली आणि सीमा अत्रे यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती वसावे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, श्री. साहेबराव पथवे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री. सोमनाथ मेंगाळ, सरपंच सावरचोळ व शरद कानवडे उपसरपंच सावरचोळ यांनी कार्यक्रमास सदिच्छाभेट दिली. प्रशिक्षानंतर या प्रेरीकांना आपापल्या आश्रमशाळेत इतर मुलींना, सुट्टीच्या काळात स्वतःच्या घरी, शेजारीपाजारी, गावात याविषयावर मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे. आदिवासी समुदायासाठी या प्रशिक्षित प्रेरिका त्यांनी घेतलेले ज्ञान व सकारात्मक दृष्टीकोन यांच्या मदतीने आरोग्य व इतर बाबतीत मार्गदर्शकांचे काम करू शकते. अज्ञान व गरिबीच्या अंधकारात धडपडणाऱ्या आदिवासी समुदायांना या प्रेरिका नक्कीच प्रेरणादायी ठरतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. प्रशिक्षणानंतर ह्या प्रशिशिक्षित प्रेरिका इतरांमध्ये आरोग्य व इतर विषयांच्या बाबतीत जाणीव- जागृती निर्माण करण्यास सक्षम होतील ह्या प्रेरिका आश्रमशाळेतील इतर विद्यार्थिनींना आरोग्य व इतर विषयांच्या बाबतीत मार्गदर्शन करतील, त्यांना आरोग्य स्वच्छतेच्या चांगल्या व योग्य सवयी लावतील. इतर विद्यार्थिनींच्या-मासिक पाळीबद्दलच्या समस्यांविषयी चर्चा करून व आवश्यकतेनुसार त्यांच्या समस्या शिक्षकांपर्यंत पोहचवतील व विद्यार्थिनी व आश्रमशाळा व्यवस्थापन ह्यांच्यामधील दुवा बनून संवेदनशील वातावरण निर्माण करतील असा विश्वास आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याचे प्रकल्प समन्वयक श्री. योगेश चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
Thursday, July 26, 2018
जलराज भंडारदरा!
जलराज भंडारदरा!
भंडारदऱ्याची भटकंती आपल्याला नेहमीच ताजंतवानं करते.
भंडारदरा जसा भव्य आहे तसा त्याचा इतिहासही भव्य आहे.
निरेन आपटे
विलोभनीय
निसर्गसंपदा लाभलेल्या भंडारदऱ्याची भटकंती आपल्याला नेहमीच ताजंतवानं
करते. त्याहूनही लोभस आहेत ती इथली भोळीभाबडी, सरळ मनाची माणसं..
‘राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा,
फुलांच्याही देशा
अंजन कांचन करवंदीच्या
काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या
दळदारी देशा’
राम
गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांनी महाराष्ट्राचं वर्णन करणारं हे गीत
लिहिलं. ते प्रत्यक्ष अनुभवायचं तर कोकणापासून ते विदर्भापर्यंत,
नारळी-पोफळीपासून संत्र्यांच्या बागांपर्यंत फिरावं लागेल. लेण्याद्री,
सहय़ाद्रीमधून भटकंती करावी लागेल. साहजिकच, एक जन्म पुरा पडणार नाही. पण हे
वर्णन एकाच स्थानावर अनुभवायचं असेल तर या भंडारदरा येथे.
भंडारदरा
हे स्थान रतनगड, अलंग-कुलंग, हरिश्चंद्रगड, भरवगड, घाटघर आणि
महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखराने वेढलेले आहे. आसपास असलेल्या
अनेक पर्वतांवरून पाणी खाली येतं आणि प्रवरा नदीला मिळतं. हे पाणी अडवून सर
लेस्ली विल्सन या इंग्रज अधिकाऱ्याने १९१० साली इथे त्या वेळचं आशियातील
सर्वात मोठं धरण बांधलं. म्हणून या धरणाला विल्सन डॅम असं नाव देण्यात आलं.
पावसाळ्यात धरणाचं पाणी सोडतात तेव्हा धरणाच्या पायथ्याशी धबधबा तयार होतो
त्याला अम्ब्रेला फॉल म्हणतात. आणि इथे असलेला रंधा धबधबाही पाहण्यासारखा
आहे.
महाराष्ट्रात कुठेही
भटकंती करतो तेव्हा मी स्थानिक लोकांशी बोलतो. भंडारदऱ्याला मला गाइड संपत
महानोर भेटले. दोन दिवस ते माझ्यासोबत होते. त्यामुळे भंडारदऱ्याची खरी
माहिती मिळाली.
भंडारदरा जसा भव्य आहे तसा त्याचा इतिहासही भव्य आहे.
भंडारदऱ्यामध्ये
महर्षी वाल्मीकी आणि अगस्ती यांचं वास्तव्य होतं, असं मानलं जातं. प्रवरा
ही गंगेची एक धारा आहे असे मानून तिला ‘अमृतनदी’ म्हणण्यात आले आहे. रतनगड
जावजी यांच्या ताब्यात होता. पुढे कॅप्टन गोडार्डने हा किल्ला जिंकला.
किल्लेदार गोिवदराव यांनी तो पुन्हा ताब्यात आणला. राघोजी भांगरे या
क्रांतिकारकाने येथील डोंगराळ भागाच्या आधारे इंग्रजांविरुद्ध बंड केलं
होतं. विशेष उल्लेख करावा लागेल तो स्व. नामदेव जाधव यांचा. इंग्रजांच्या
कारकिर्दीत अकोले तालुक्यातील वीरगाव येथे जन्मलेल्या नामदेव जाधव यांनी
इंग्रजांच्या सन्यातर्फे दुसऱ्या महायुद्धात इटलीमध्ये पराक्रम गाजवला.
त्यांना व्हिक्टोरिया क्रॉसने गौरवण्यात आलं. ‘ऑस्ट्रेलियन वॉर
मेमोरियल’मध्ये त्यांची माहिती देण्यात आली आहे.
रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचं आहे, जे आजही स्थापत्यशास्त्रासाठी आदर्श ठरलं आहे.
भंडारदऱ्याची
निसर्गसंपन्नता इतकी विलोभनीय आहे की सिनेजगतालाही इथल्या दऱ्याखोऱ्यांचा
मोह होतो. ज्या सिनेमाला कथेसोबत भूगोल असतो ती कथा जास्त जिवंत बनते.
म्हणून भंडारदऱ्यामध्ये अनेक सिनेमांचं चित्रीकरण झालं. विशेष उल्लेख करावा
लागेल तो ‘जैत रे जैत’चा.
गो.
नि. दांडेकरांच्या या कथेला इथल्या डोंगरदऱ्यांची पाश्र्वभूमी लाभली आहे.
ठाकर वस्तीचं चित्रीकरण इथे झालं आहे. कवी ना. धों. महानोर यांनी लिहिलेलं
गीत आहे,
‘आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं
या जांभऱ्या गर्दीत मांडुन इवले घर’
भंडारदऱ्यात
राजूर, कोतुर, नवलेवाडी इत्यादी गावातून फिरताना महानोरांनी या सिनेमासाठी
लिहिलेली सर्व गाणी अनुभवता येतात. राज कपूर यांनाही या भागाचं खूप आकर्षण
होतं. म्हणून त्यांनी ‘राम तेरी गंगा मली’चं चित्रीकरण इथे केलं. ‘हिना’
सिनेमामध्ये भारत-पाकिस्तानची सीमारेषा दाखवताना भंडारदऱ्याचा उपयोग केला
आहे. ‘कटी पतंग’मधील ‘ये शाम मस्तानी, मदहोश किये जा’ या गाण्यात मागे
रंधा धबधबा दिसतो.
भंडारदऱ्यात
फिरताना आमच्या गाइडसह कांदाभजी, वडापाव विकणारे दुकानदार या सिनेमांची
नावे भराभर सांगतात. आम्ही कोकणकडय़ाच्या दिशेने निघालो तेव्हा वाटेत अनेक
गावकरी दिसत होते. अनेक वृद्ध स्त्रियासुद्धा शेतात राबत होत्या.
गाइड
महानोर सांगू लागले, ‘भंडारदऱ्यामध्ये हॉस्पिटल नाही. कारण इथे कुणालाही
शुगर, बीपीचा त्रास नाही. कोलेस्टेरॉल काय असतं ते कुणालाही माहीत नाही.
कारण आम्ही रोज कमीतकमी दहा किलोमीटर चालतो. दिवसभर शेतीत राबतो. भाजीभाकरी
खातो. माझा आजा आता ९३ वर्षांचा आहे. आजही तो कमरेला विळा लावतो आणि
लाकूडफाटा गोळा करायला रानात जातो. त्याने जन्मात कधीही इंजेक्शन घेतलेलं
नाही.’
शुद्ध हवा,
निसर्गाची साथ, दर ऋतूमध्ये फुलणारी रानफुले, पशुपक्ष्यांची सोबत आणि बारा
महिने टिकणारी हिरवाई यामुळे इथले गावकरी निरोगी जीवन जगतात. भंडारदऱ्याचे
लोक इतके साधेभोळे आहेत की जो मत मागायला येईल त्याला मत देतात. त्या
बदल्यात त्या नेत्याने विकास करायचा असतो हेसुद्धा त्यांना माहीत नाही.
इथल्या पाडय़ांवर फिरताना हांडे-कळशी भरून चालत निघालेल्या अनेक महिला
दिसतात.
इंग्रजांनी
दूरदृष्टीने इथं इतकं विशाल धरण बांधलं की त्यातील पाणी वर्षभर अनेक
शहरांची तहान भागवून उरतं. घाटघरमधून वीजनिर्मिती करतं. पण तेच पाणी
शेजारच्या गावात नळावाटे जात नाही.
तरीही इथे त्याची कोणी तक्रार करत नाही. इथल्या खेडय़ापाडय़ातील महिला, मुले प्रचंड कष्ट करून आपलं अस्तित्व टिकवून ठेवतात तेव्हा
‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दाच्या देशा’
या ओळी अगदी खऱ्या ठरतात. कोकणकडय़ाकडे किंवा अमृतेश्वर मंदिराकडे जाताना कळसूबाई शिखरावरील मंदिराचा भगवा रंग दिसत राहतो.
‘जरिपटक्यासह भगव्या
झेंडय़ाच्या एकचि देशा॥
प्रणाम घ्यावा माझा हा,
श्रीमहाराष्ट्र देशा ’
हे गडकरींचं गीत आपोआप ओठांवर येतं !!
सौजन्य – लोकप्रभा
भाताच्या शेताची लावनी....
भाताच्या शेताची लावनी....
आज रविवार होता,शेतात गेलो होतो. जिकडे तिकडे भाताच्या लावनीची लगिन घाई
सुरू होती.कोणी रोप काढत होते. कुठे यंत्रावर चिखल चालला होता .कुठे
भाताची लागन चालू होती .सारं कसं शांत होतं .बैलाला ओरडल्याचा आवाज
नाही.कूठं भलरी नाही, कुठं दुरडी नाही ,शेतात रोटर येत होता. शेत नांगरून
चिखल करून जात होता .वावरात दोन तीन माणसंच दिसत होती.
मला
माझा लहानपणीच्या भात लावनीची आठवन आली .उन्हाळ्यात पेर्ते व्हा ,पेर्ते
व्हा.अशी पावशी ओरडायला लागली की खऱ्या अर्थाने लावनीची सुगी सुरू
व्हायची. शेतात नांगरनी सुरु व्हायची .तरवे लोटायचे ,शेतातला काटा कुटा
वेचायचा. नंतर.बीयाचे भात स्वच्छ करायचे निवडायचे भुईमुगाच्या शेंगा
फोडायच्या. तो पर्यंत सुतार गावात हजर व्हायचा .नांगर ,कुळव, पाभार, भरायचा
पिढी तयार करायचा. तोपर्यंत मिरग यायचा. शेतात धुळ वाफ्यावर मग भात
पेरायचा. बाजारातून खतं आणायचा उडीद काळे घेवडे आणायचे वाळवायचे भाजायचे
भरडायचे कारण लावणीला उडदाचं गुठं आणि काळ्या घेवड्याची आमटी त्या काळी जीव
की प्राण असायची.पाऊस पडला की नाचनीला सुरवात व्हायची .वडपौर्णिमेला वड
पुजला, की नाचनी आवटायला सुरवात व्हायची .कधी कधी नाचनी लाऊन माझी आई
पोळ्या करायला घरी यायची.आणि तोपर्यंत झरं फुटलेले असायचे आणि भात लावनीला
सुरूवात व्हायची. मग घरातला, भावकीतला, शेता जवळ शेत ,असलेल्या.
बैलवाल्याच्या हंद्यात जायाचे .एक एका औताच्या मागे किमान दहा बारा माणसं.
बायका लावायला असायच्या सकाळी तरवा काढायचा. तोपर्यंत औत्या शेत
नांगरायचा.पाठाळं धरायचा . चिखल तयार व्हायचा, तरवा निघायचा. आम्हा लहान
मुलांकडे रोप बांधाव काढायचे . चिखल झाला की परत वावरात फेकायचे काम असायचे
.एवढ्या वेळात दुरडी यायची त्यात भात, हायब्रिडची भाकरी, उडदाचं गुठं
,कांदा असा बेत असायचा .कधी काळ्या घेवड्याची आमटी ,नाचन्याची भाकरी, सुकट
किंवा तळलेला बोंबिल असायचा. शिवाय बैलांना कणिकीचं गोळं, किंवा दोन दोन
भाकरी असायच्या .अंगावर खोळ, त्याखाली पोतं, आणि मस्त पैकी अंगावर,ताटावर
कालवनात पडणारा पाऊस .याखाली जेवायचं आणि झऱ्याचं किंवा व्हळचं गोड पाणी
प्यायचं .आणि चिखलात उतरायचं. कोपरं लाऊन झालं की औत सुटायचं औत्या बैल
धुवायला ओढ्यावर, नदीवर किंवा ओहळेवर जायाचा.मग इकडे भलरीला सुरवात व्हायची
.
रायबाय गं जायबाय गं
तुझा दुलरी वाडा।
तुझ्या वाड्याला,वाड्याला
तुझ्या खिडक्या चार।।
भलरी तालात याची कोरभर वावार लाऊन व्हयाचं. तेवढ्यात ननंद भावजयांची जुगलबंदी व्हायची वहिनीला घालून मग भलरी व्हायची.
वहीनी गं निजली जागी व्ह तरी गं।
लहु बाळाला लहु बाळाला वाळं आलं घे तरी गं ।।
मग वहीनीलाही राग यायचा आणि ती म्हणायची
आंब्याचं पान काय हिरवंगारं।
दादां वहीनी चिखल करं।
दादाजी बैल जाऊद्या घरीं
नांगर खांद्यावरी।।
एवढ्यात ढापल्याला हुकी यायची पावड्यानं ढापलत ढापलत तो कारभारनीला चिढवत गायाचा.
थड थड वाजतं। मठान शिजतं ।
हाडकानं दुखतय दाड गं सजने ।।
रस्सा रस्सा वाढ गं ।।
रस्सा रस्सा वाढ गं।।
अशी
भलरी गात गात वावार कधी लाऊन व्हायचं ते कळायचं नाही अंगात हुडहुडी भरलेली
असायची. अंग आवतारायचं ,घरी यायचं दादांच्या (वडीलांच्या) पुढ्यात अंघोळ
करायची. आणि भलरी गुणगुणत कधी झोप लागायची कळायचेच नाही.असं जवळ जवळ पंधरा
ते तीन आठवडं चालायचं त्यात रविवारचा मोडा यायचा जातीवंत शेतकरी रवीवारी
स्वतः औत ओढल पण बैल जुपायचा नाही. यातच बेंदुर यायचा बैल रंगवायचे
सजवायचे. मिरवनूक काढायची. किती आनंद वाटायचा. शिवाय ज्याचं शिबं पडल
त्याच्या घरी पुरण पोळ्या व्यायच्या सारा हंदा जेवायला यायचा किती आनंदी
आनंद असायचा.
पण आज हे सारं बदललय शेतकऱ्याची खरी
दौलत असलेला बैल आज नामशेष झाला. सर्ज्या ,राज्या ,पठान, वजीर ,परधान
,ढवळ्या, पवळ्या सारे शेतकऱ्यांचे मित्र सोडून गेले .तो हंदा ती एकी संपली.
ती भलरी, ती लोकगीतं नष्ट झाली. संध्याकाळी एखादा शेतकरी लावणीला मागे
राहिला तर बांधावरनं जाणारा माणुस ,बाई शेतात वाकत होती. कुणाच्या घरी वाईट
घडलं, तर सारा गाव त्याच्या शेतात जाऊन लावनी करून देत असायची. हे सारं
सारं संपलं. आज कोण कोणाच्या शेतात जाईना, मदत करेना, इतकंच काय पण जो भात
खातोय तो मुंबईला. आणि ज्याला चालाय येत नाही ते म्हातारे आईवडील शेतात
राबताना दिसत आहेत. जाऊद्या उद्या बेंदुर येईल. पण त्या दिवशी पुजायला
गावात बैल दिसनार नाही.पण त्या दिवशी कोणाला ना कोणाला तरी या लावनीची आणि
तिच्या साठी शेतकऱ्या साठी नि स्वार्थी पणे राबणाऱ्या ढवळ्या, पवळ्याची
आठवण मात्रं नक्की येईल एवढं मात्र नक्की.
बळवंत पाडळे
Subscribe to:
Posts (Atom)
बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.
*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...
-
दैनिक पुण्यनगरीच्या प्रवाह पुरवणीत *शिक्षणाची बेटं* सदरात *हरहुन्नरी आणि कार्यमग्न शिक्षक डॉ. सुधीर कुंभार* यांच्या कामाविषयी *भाऊसा...
-
म . टा . वृत्त सेवा , अकोले -"आली आली डोंगरची काळी मैना "दहा रुपयाला आठवा , घ्याल तर हसाल न घ्याल तर फसाल , अशी जोरदार आरो...