सह्याद्रीत
भटक्यांसाठी अनेक थरारक ठिकाणे आहेत. सुरुवातीला ही ठिकाणे फक्त भटक्या
लोकांनाच माहिती होती. परंतु नंतरच्या काळात भटक्यांचा ओघ वाढला,
गावकऱ्यांनी सुध्दा त्या जागेचे महत्त्व ओळखले आणि खऱ्या अर्थाने इतके दिवस
अज्ञात असलेली ठिकाणे सर्वसामान्य लोकांना माहिती पडली. असेच एक ठिकाण
म्हणजे सांदन दरी.
साम्रद
गावाजवळ असलेली आणि रतनगड, कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन या किल्ल्यांचा शेजार
अनुभवणारी सांदन दरी अनेक वर्ष उपेक्षित होती. पण ज्यावेळी ही दरी लोकांना
माहिती पडली आणि ज्यांनी ह्या दरीची थरारकता अनुभवली आहे, ते लोक वारंवार
भेट देऊ लागले आणि अशा तऱ्हेने अज्ञात असलेली दरी लोकांना ज्ञात झाली.
साम्रद या
आदिवासा पाड्यापासून साधारणपणे १०-१५ मिनिटांमध्ये रुळलेल्या पायवाटेने
आपण घळीच्या तोंडापाशी येतो. सांदण दरी जमीन पातळीच्या खाली असल्यामुळे
दरीत शिरण्यासाठी थोडेसे खाली उतरायला लागते. सांदण दरी हा निसर्गाचा
चमत्कार आहे. हजारो वर्षांच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही दरी निर्माण झाली
आहे. त्यामुळे सांदण दरी म्हणजे जमिनीला पडलेली भेग वाटते.
दरीच्या
सुरुवातीला जिवंत पाण्याचा झरा आहे. झरा दगडांनी बंदिस्त केलेला असल्यामुळे
झऱ्याला वर्षभर पाणी असते. पुढे कुठेही पाणी नसल्यामुळे पाण्याच्या
बाटल्यांमधील पाणी संपायला आले असेल तर येथेच भरून घेणे. झऱ्याचे
पाणी दगडांमधून वाहत असल्यामुळे थंडगार असते. ह्या झऱ्याच्या पुढे असलेला
सोप्पा कातळटप्पा उतरून गेल्यानंतर आपण नाळेच्या घळीत प्रवेश करतो. ह्या
ठिकाणावरून दरीचे अक्राळविक्राळ रुप समोर येते. नाळ काही ठिकाणी १५-२० फूट
आहे, तर काही ठिकाणी अगदीच २-३ फूट आहे. दरी जमिनीच्या खाली असल्यामुळे
दोन्ही बाजूला कातळाची उंचच उंच भिंत आहे.
पहिला
कातळटप्पा पार केल्यानंतर १२-१३ फूट लांब आणि १-२ फूट खोल पाण्याचे
नैसर्गिक कुंड आहे. कुंडात असलेले दगड पाण्यात असल्यामुळे त्यांच्यावर
शेवाळ जमले आहे त्यामुळे सांभाळून पाय ठेवत हे कुंड पार करावे लागते. हे
कुंड ओलांडल्यानंतर तीव्र उतार सुरु होऊन नाळ अरुंद होण्यास सुरुवात होते.
दरीमध्ये लहानमोठे दगड, मोठमोठ्या दरडी यांचा खच पडलेला असल्यामुळे सपाटी
कुठेच नाही आहे. ह्या दगडांमधूनच वाटचाल करीत आपण पाण्याच्या दुसऱ्या
नैसर्गिक कुंडाजवळ पोचतो. ह्या कुंड साधारणपणे ४-४.५ फूट खोल आणि १७-१८ फूट
लांब आहे. ह्या कुंडापर्यंत सूर्यप्रकाश पोचत नसल्यामुळे कुंडात वर्षभर
थंडगार पाणी असते. हे कुंड पार करताना उडणारी तारांबळ आणि थरार ज्यांनी
अनुभवला आहे ते सर्वजण ह्या दरीच्या प्रेमात पडले आहेत.
नाळ १.५
किमी लांब आहे. पण वाटेवर पडलेल्या दगडांचा खचामुळे दरीच्या टोकापर्यंत
जाण्यासाठी ४५-५० मिनिटे लागतात. हे अंतर पार करीत असताना मोठमोठ्या दरडी,
दोन्ही बाजुला असलेल्या कातळभिंती आणि मधूनच दिसणारे आभाळ ह्यांच्या पलिकडे
दुसरे काहीही नजरेला पडत नाही. नळीच्या टोकाला पोचल्यानंतर सह्याद्रीचे
घडणारे दर्शन म्हणजे सोने पे सुहागा. हजारो फूट खोल सरळ तुटलेले कडे
पाहिल्यानंतर थरार म्हणजे काय ह्याची अनुभूती येते. इथूनच खाली जाणारी वाट
करोली घाटातून डेहणे गांवात जाते.
पुन्हा
साम्रद गांवात पोचण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे दगडांच्या
खाचखळग्यातून मार्गक्रमण, दोन्ही थंड पाण्याची कुंड पार करणे आणि
सुरुवातीला लागलेला कातळटप्पा चढणे ह्याच्याशिवाय पर्याय नाही.
प्रस्तरारोहणाची साधनसामुग्री असेल तरच करोली घाट उतरून डेहणे गांवात जाणे,
नाहीतर करोली घाट उतरण्याच्या प्रयत्न करू नये. सांदण दरीच्या तळापर्यंत
सूर्यप्रकाश पोचत नसल्यामुळे दरीत कायम थंडावा असतो.
सांदण
दरीकडे पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या,
दारूच्या बाटल्या, प्रातविर्धी इ. अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे ह्या गोष्टी कशा कमी होतील ह्याच्याकडे पर्यटकांबरोबर, गावकरी व
वनाधिकारी यांनी सुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे.
सूचना:- सुरक्षित भटकंती करा.
- एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नका.
- ट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा.
- ट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरात सांगून ठेवा.
- वाट माहिती नसल्यास गांवातून वाटाड्या बरोबर घ्या.
- मळलेल्या वाटेवरूनच जा, अनोळखी वाटेने जाण्याचे धाडस करू नका.
No comments:
Post a Comment