Sunday, March 24, 2024

होळी रं होळी..*☘️ *उधाण निसर्गपुजक उत्सवाचे.

☘️ *..होळी रं होळी..*☘️ *उधाण निसर्गपुजक उत्सवाचे....* *होळी.....* 🖊️ *होळी र होळी पुरणाची पोळी...!!* *होळी आली घरी अन् गारठा गेला दारी...!!* *संपूर्ण जगभरात होळी सण साजरा करण्यात येतो, भारतामध्येही सगळ्याच ठिकाणी होळी साजरी केली जाते, सण म्हटल की प्रत्येकाची साजरा कण्याची पद्धत वेगवेगळी असते.* *भारतात होळी हा सण सर्वत्र साजरा केला जातो. तसेच आदिवासी जमातीत सुध्दा होळीला विशेष महत्त्व प्राप्त आहे.मराठी फाल्गुन महिना हा वर्षाचा शेवटचा महिना या संपणा-या व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रंगाची उधळण करीत गोडधोड खाऊन आणि गोडधोड वाटुन एकमेकांनाच्या सहवासात पाच दिवस गायन , नृत्य वेशभूषा परंपरागत उत्सव उत्सहापूर्वक साजरा करतात, आदिवासी बहुल भागात सर्वत्र साजरा होणारा हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. याच दिवसांत शेतातील पिके काढणी आणि घर धनधान्याने भरणे, धान्य विकल्यामुळे गाठीशी चार पैसे जमा होतात,रानातील पानगळ होऊन नवी पालवी फुटण्यास सुरुवात होते,पशुपक्षी आनंदाने नाचत बागडत सारा निसर्ग अगदी सौंदर्याची बरसात करत असताना आदिवासी मानवी मन प्रसन्न होऊन ह्या निसर्गाच्या सहवासात राहिल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्रित येऊन गीत संगीत व नृत्य करुन आनंद साजरा करतात.* *सायंकाळ पासून रात्रभर अगदी सकाळ पर्यंत तारपा,ढोल,मांदल यांच्या गजरात नाचून गाऊन निसर्गाला सुखी जीवनाची विनंती विनंती करण्यात येते.* *महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात सह्याद्री,सातपुड्यातील आदिवासी निसर्गसंस्कृती, परंपरा, नृत्य,गायन,वादन, चालीरीती, वेशभूषा, वाद्य, स्री- पुरुष समानता आणि सण साजरा करण्याची पद्धत काही वेगळीच, होळीचा सण आदिवासी मधील अनमोल आणि महत्वाचा सण मानला जातो, सण साजरा करतानाचा उत्साह, आनंद,सांस्कृतिक मूल्य, नैसर्गिक मूल्य, ऐतिहासिक परंपरा आणि आदिवासी महानता, जीवनमूल्ये जपणारा उत्साह पूर्ण, एकोपा, स्नेह आणि नव चैतन्य रूपी सण साजरा करण्याची पद्धत आदिम संस्कृती मध्ये दिसून येते.* *कोरोना काळा नंतर आदिवासींच्या जीवनात नवचैतन्य,उत्साह घेऊन येणारी ही होळी आत्मीयता आणि निसर्ग संस्कृतीला साद घालणारी असेल.* *सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गाच्या मुशीत,पर्यावरणाशी समरस होऊन आपली जीवनमूल्य सोबतची नाळ,एकोपा, घट्ट करून आदिवासी पाडे,वस्ती,गाव आणि वाड्यांन मध्ये आदिवासी वाद्य,लोकनृत्य, बोलिगीते व गायनावर नैसर्गिक वातावरणात पोर- सोर, स्री_पुरुष, अबाल वृद्ध धुंद होऊन होळी उत्सव संपन्न होत असतो. यातून आदिवासी जगण्याचं आदिमपणा दिसून येत असतो. त्याच बरोबर निसर्गावर आधारित जीवन पद्धती,संस्कृती, प्रथा परंपरा,रिती रिवाज, देव देवता, बोलिगिते,पोशाख, समूह गायन,नृत्य, दाग दागिने,पारंपरिक वाद्य या ना अनेक गोष्टींमुळे आदिवासी जमातींच्या समूहाचा वेगवेगळे पणा, सांस्कृतिक एकतेतून उत्साहाचे समीकरण,अस्तित्व आणि निसर्गाचे प्रतीक यांची जिवंत अनुभूती आल्या शिवाय राहत नाही.* *वसंत ऋतूचे आगमन होताच निसर्ग सौंदर्य, सगळ्याच सजीव सृष्टीला नवीन साज, वृक्षांना सुंदर बहर, नवीन साज चढलेला दिसून येतो, हे सर्व निसर्गरम्य वातावरणात बघून मन प्रसन्न व्हायला लागले, हे निसर्गरम्य वातावरण बघून बाल्यअवस्था डोळ्यासमोर एखाद चलचित्रपटा प्रमाणे डोळ्या समोर पुढे पुढे सरकत सोनेरी क्षण मानला आनंद देऊन जातात.* *होळी शहरापेक्षा खेडोपाडी,पाड्यावर,वस्तीवर खूप आनंदाने साजरी होते,होळी म्हटल की मुलांचा आनंद, धम्माल मस्ती, आठवडा भर चालणारा आनंद उत्सव आणि त्याला निसर्गाची साद अन् होळी उत्साहाला आलेले उधाण काही वेगळेच...* *जशी वसंताची चैत्र पालवी नव्याने येण्यास सुरुवात होते, तसाच उत्साह मनात आनंदाने उधळायला लागतो.मनसोक्त नृत्य, गायन आणि होळीचा आनंद दुःखावर पांघरूण घालून, नवनिर्मितीची प्रेरणा गरिबितही आनंदाचे चैतन्य फुलवत असते. होळीला पोरा सोरांना शाळेला सुट्टी असल्याने सगळेच घरी परततात, एकमेकांशी समरस,एकरूप आणि एकजुटीने होळीच्या तयारीला लागतात.* *पूर्वी पासून ते आज तागायत ज्या ज्या ठिकाणी होळी करायची आहे त्या त्या ठिकाणी अगोदरच काही दिवस होळीचा माळ, होळीला ठिकाण.. जागा स्वच्छ प्रसस्थ बनवली जाते. जागा तयार करण्यासाठी पोरं पोरी,लहान मूल, ज्येष्ठ मंडळी, युवक युवतीं सगळेच हातभार लावतात आणि होळी साठी मोठी जागा तयार केली जाते. होळीच्या माळावर मध्यभागी एक खड्डा खोदून तयार केला जातो. आदिवासींमध्ये निसर्गाला देव मानण्याची प्रथा,परंपरा असल्याने झाडाची फांदी किंवा झाड तोडण्या आघोदर त्याची पूजा किवा त्या वुक्षाला वंदन केले जाते आणि मगच झाड किंवा फांदी तोडली जाते. पहिल्या लहान होळीला एरंडीचे आणि दुसऱ्या दिवसी मोठ्या होळीला उंबराची फांदीचा होळीला खांब तयार करतात. रानात फांदी तोडल्या नंतर ती होळीच्या माळावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळीचा माळावर आणली जाते.* *व्हळी आली आपल्या मंजरि व !!* *व्हळी मांगती तळीचा तोरण व !!* *व्हळी मांगती पुरणपोळी व.....!!* *एरंड किवा उंबराची फांदी खड्यात होळीचा खांब होळीच्या माळावर मध्यभागी खड्डा खोदून, खांब रोवण्या आघोदर त्याची पूजा केली जाते, त्या खड्यात एकरूपया किंवा ठोकळ्याचे पैसे टाकले जातात, त्या नंतर सगळेच हात लाऊन खांब उभा करतात. तो खांब घट्ट करून उभा झाल्या नंतर प्रत्येक घरातून आणलेली पुरणपोळी, खोबऱ्याची तळी (वाटी),पापड्या इत्यादी ह्या होळीच्या खांबाला अडकवली किंवा बांधली जातात.* *त्या नंतर प्रत्येक घरातून पाच पाच गौऱ्या, लाकड आणि पोरांनी, पुरुषांनी आणलेला विविध हंगामी पिकांचा काड, वाळलेली लकडे किंवा ओंडकी होळीच्या खांबाला उभे करत उंच रचले जाते. आपली होळी सर्वात प्रकाशमय, उंच झाली पाहिजे या अट्टाहास पोटी पोर-सोर गावभर, शेतात गमती जमतीन गाणे म्हणत किंवा एकमेकांना आवडीने आवाजाची साद घालत होळीत जळण्या योग्य वळेल काड,लाकड, गवत,ओंडकी इत्यादी होळीच्या माळावर आणून खांब भोवतीने रचले जाते. होळी निमित्त सर्व गावकरी एकत्र आलेले दिसतात. उपस्थित काही बुजुर्ग माणसांच्या हाताने होळी पेटवण्यात येते. जस जस होळी पेट घेईल तस तसा आगीचा मोठा प्रकाश तयार होतो सगळीकडे उजाडल्या सारखा भास तयार होतो. जमलेली सर्वच मंडेळी हुबय रे हुबय... असा आवाज करत मोठा मोठ्याने एकमेकांना साद घालू लागतात. त्यातच मुलांचा आनंद, पुरुषांचे गुंनगुणने, मध्येच स्रीयांच्या पारंपरिक गाण्याचा सुमधुर आवाज....* *व्हळीव देव देखला व्हता ग* *व्हळीव देव देखला व्हता ग* *दर खाणीत व्हता व महादेव तिथंच व्हता* *व्हळीव देव देखला व्हता ग* *व्हळीव देव देखला व्हता ग* *पापड्या बांधीत व्हता व महादेव तिथंच व्हता* *व्हळीव देव देखला व्हता ग* *व्हळीव देव देखला व्हता ग* *कवळ्या रचीत व्हता व महादेव तिथंच हेरित व्हता* *व्हळीव देव देखला व्हता ग* *व्हळीव देव देखला व्हता ग* *व्हळी चेटीत व्हता व महादेव तिथंच हेरीत व्हता.* *व्हळीव देव देखला व्हता ग* *व्हळीव देव देखला व्हता ग.....!!* *होळीला साद घालत होता. त्यालाच सांगत म्हणून गावातील पारंपरिक वाद्याची प्रतिसाद मिळत होता, हे सगळ निसर्गरम्य वातावरणात विलोभनीय दृश्य, आनंदमय वातावरण तयार होताना दिसते.* *होळीच्या जा डोम जस जसा कमी होईल तस असे तरुण पोर आणि पुरुष मंडळी होळीच्या जवळ जवळ येऊ लागतात, होळीचा खांब बाहेर लोटण्याचा, ओढण्याचा प्रयत्न करू लागतात. ज्याने होळीचा खांब बाहेर ओढला त्याला तेथे उपस्थित काही बुजुर्ग मंडळींकडून कौतुकाची थाप पाठीवरून फिरवतात.काही बुजुर्ग बाया चांगल्या आवाजात कौतुकाचा प्रतिसाद देतात.त्या नंतर खांबाला असणारे खोबरे,पापड्या, पोळ्या इत्यादी आनंदाने ओरबडून घेतात नंतर घरी गेल्यावर सगळेच वाटून खातात. खांब लोटल्या नंतर लगेचच मुली, स्रीया पारंपरिक गान म्हणत होळी भोवतीने पाण्याचा हेल घालायला सुरुवात करतात पाच हेलं घालून झाल्या नंतर होलिकाचे दर्शन घेउन होलिका जवळ कुटुंब, गुरे वासरे, शेत शिवार ई.सुरक्षा , चांगल्या भावनेने प्रार्थना करतात.* *त्या नंतर होळीचा अंगारा घरी घेऊन जातात आणि ते आपल्या कुलदैवत, गुरे वासरे, ई. लावतात. पुरण पोळीच जेवण करून झाल्यावर पुन्हा सगळे होळीच्या माळावर जमतात मग त्याच ठिकाणी कही वृद्ध महिला रात्रभर गाणे म्हणतात. काही पुरुष मंडळी राखणदार म्हणून त्याच ठिकाणी बाजूला बसतात.काही पोर सोरं, युवक युवती, पुरुष महिला रात्रभर टिकोर्या,आट्यापाट्या,लेझिम, फुगडी, चील्ही पाट्या, लपछापी, आबधोबी, बाहुला बावली इत्यादी खेळ रात्रभर उत्साहात खेळ खेळले जातात. यात कोणताही दूजाभाव किंवा मोठेपणाचा दर्प नसून सगळेच एकजुटीने,आनंदाने, समानतेच्या भावनेतून,बंधू भावाने होळी उत्सवाचा आनंद घेतात.* *होळीच्या माळावर रात्रभर पारंपरिक वाद्य ढोल वाद्य बरोबरच इतरही वाद्य वाजवत रात्र, उत्साह अधिकच आनंदमय वातावरण निर्माण होत असते,काही ठिकाणी होळी पाच, दहा दिवस पेटलेली असते.* *प्रत्येकाची कामे वेगवेगळी असली तरी या दिवासी मिळून मिसळून होळीचा आनंद घेतला जातो. सह्याद्री मध्ये अशा प्रकारे होळी सण, उत्सव आणि आदिम संस्कृती ही प्रगल्भ,आदर्श,एकोपा, समानता, नवंचेतना,समर्पण आणि स्री प्रधान संस्कृती आहे हे कळल्यावाचून राहत नाही.* *परंतु पारंपरिक गाणी, वाद्य,खेळ, परंपरा, पूजा विधी,चालीरीती काही ठिकाणी लुप्त होताना दिसत आहे. ह्या प्रथा परंपरा,चालीरीती आणि निसर्गाची जपणूक करणे काळाची गरज आहे.* *पारंपरिक वाद्याची साथ, गाणे त्यावर धरलेला नृत्याचा ठेका धरून रात्रभर उत्साहात साजरा करण्याची प्रथा परंपरा, चालीरीती परिधान केलेली वेशभूषा सगळ्यांच्याच आनंदाला उधाण आलेले असते. त्यात मित्र परिवाराची गळाभेट इत्यादी सर्व काही विलोभनीय असते.* *होळी नंतर पाच दिवस उत्साहाला उधाण, एकजुट आणि प्रत्येकाच्या मनात स्नेह, समर्पणाची भावनेतून नृत्य,वेशभूषा परिधान करून अनोखं वातावरण तयार झालेलं असत. तर काही ठिकाणी होळी नंतर पोर सोर लाकडाचे ओंडके रस्त्यात आडवे टाकून वाट अडवतात येणाऱ्या जाणाऱ्या आनंदाने रंग लावल्या शिवाय रस्ता मोकळा करत नाहीत.* *काळानुरूप बदलत्या युगात झालेल्या चुका, संकट,राग, द्वेष आणि दृष्ठ विचारांचा नाश,इत्यादी या होळीत जाळून नष्ट होतील.* *काळानुरुप बदला प्रमाणे निसर्गाच्या नवं पालवी प्रमाणे संस्कृतीची जपणूक होऊन सामाजिक एक्य निर्माण होईल हीच सदिच्छा....* *होळी तशी काहीही असो, दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. या वर्षीही होळी अशीच खास, स्नेह,प्रेम,सहकार्य,सेवा रुपी,प्रितीची,मायेची,एकजुटीची, समर्पणाची, माणुसकीची, परंपरागत मूल्यांची जोपासना करणारी, जल, जंगल,जमीन यांचे संवर्धन करणारी आणि आधुनिक विचासरणी, निसर्गाच्या सानिध्यात आदिवासीत्व शिकवणारी, आणि वर्षभर सलोखा,शांती, समाधान, ऊर्जा,उत्साह, इतिहासीक संस्कृती, मूल्य परंपरा जपणारी उत्साह आणि आनंदाचा क्षण होळी निमित्ताने सांगता येतो आणि अंधकाराला दूर सारण्यासाठी शिक्षण रुपी ज्ञान प्रकाशाची तेजस्वी, प्रकाशमय होळी पेटवली पाहिजे.* *तळपाडे भरत दशरथ* *(बिरसा ब्रिगेड, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष)* *मो.नं :- ९६६५४५१५३०/९५७९७५८९७४* 🌿☘️🍀🌹🍀☘️🌿

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...