Wednesday, December 4, 2024
वन्यजीवांचीही आबाळ
Swami Amazing
Saturday, June 18, 2011
वन्यजीवांचीही आबाळ
राजूर, १८ जून/वार्ताहर
अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिसरातील वनक्षेत्राचा निधी रखडल्याने अभयारण्यामधील वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वन विभागातील अनेक पदेही रिक्त असल्याने त्याचाही विपरित परिणाम होत आहे.
सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये ३६१ चौरस किलोमीटर वनक्षेत्रात अभयारण्य आहे. हा पूर्णपणे आदिवासी भाग आहे. साधारणपणे दहा वर्षांपूर्वी या भागात बिबटय़ा व अन्य वन्य प्राणी, तसेच पक्षांचे वास्तव्य होते. एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २८ टक्के क्षेत्र वन विभाग व डोंगरांनी व्यापला आहे. म्हणूनच १९८६ मध्ये येथे अभयारण्य घोषित झाले. वन व वन्यजीवांचे संरक्षण व्हावे या हेतूनेच हा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. पहिली सात वर्षे अभयारण्याचा कारभार अहमदनगर जिल्हा उपवन विभागामार्फत सुरू होता. या काळात वृक्ष लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यामुळे वन्यजीवांना संरक्षण मिळाले. बिबटय़ा, वाघ, कोल्हा, सांबर, नीलगाय, घोरपड, वानर, जंगली मांजर, उदमांजर, घुबडे, मोर, भोकर व पाण्यातील अनेक प्रकारचे मासे, कासव असे वन्यजीव येथे मोठय़ा प्रमाणावर वस्ती करून होते. नंतरच्या काळात मात्र या वनक्षेत्राची आबाळ सुरू झाली.
हे क्षेत्र १९९४ पासून नाशिक उपवन कार्यालयाच्या अखत्यारीत गेले. याच काळात जागतिक बँकेचे अर्थसहाय्य लाभले. तेव्हापासून येथे दोन वनसंरक्षक व कर्मचारी नियुक्त आहेत. या विभागाची शेंडी (भंडारदरा) व राजूर अशी दोन कार्यालये आहेत. सुरूवातीला फारशा अडचणी नव्हत्या. मात्र ९६ नंतर वनक्षेत्राचा निधी बंद झाला आणि वनक्षेत्राची आबाळ सुरू झाली. त्यानंतरच या क्षेत्राला उतरती कळा आली. त्यानंतरही राज्य सरकारने कोणतीच ठोस पाऊले उचलली नाहीत.
येथील वन्यजीवांनी अलिकडच्या काळात इतरत्र स्थलांतर केल्याचे उघड झाले. त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध न झाल्याने ही स्थिती ओढवली. नवीन वृक्षारोपण तर थांबलेच, मात्र वृक्षतोडीवरही कुणाचे नियंत्रण राहिले नाही. भंडारदरा कार्यालयातील वनक्षेत्र अधिकारी, गार्डची चार पदे, वनपाल तर राजूर कार्यालयातील चार गार्ड, वनपाल, वनमजुरांची दोन पदे रिक्त आहेत. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी इतर गोष्टींनाही मर्यादा आल्या आहेत. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलतानाच राज्य सरकारने या अभयारण्यात वन्य जीवांसाठी पिण्याचे पाणी, वृक्षतोडीला बंदी आदी गोष्टींचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
Swami Amazing at 7:01 PM
Share
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.
Tuesday, October 8, 2024
" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड "
" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड "
हरिश्चंद्रगड…..
निसर्गाला पडलेलं एक अप्रतिम स्वप्न! अवाढव्य , अजस्र , रौद्र तितकाच मनोहारी , निसर्गरम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण ! आपल्या रौद्र कड्यांनी ट्रेकर्सना सदैव आव्हान देणारा , निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ घालणारा , अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला , नटलेला हरिश्चंद्रगड !! ठाणे , पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेला आणि सर्वात मोठा घेर असलेला महाराष्ट्रातील एकमेव गड म्हणजे " हरिश्चंद्रगड !!!
सुंदर कोरीव कलाकृतींनी नटलेलं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर , बाजूलाच नितळ पाण्याची टाके आणि दगडात खोदलेली मोठ्ठी गुहा , विठ्ठल रखुमाईचं/विष्णूचं मंदिर , शेंदूर लावलेली गणपतीची मनमोहक मूर्ती , मंदिराच्या खालच्या बाजूस केदारलिंगेश्वराची प्रचंड गुहा आणि त्यातील शंकराची भव्य पिंड, मंदिराच्या वरच्या भागातील पुष्करणी , जमिनीत खोदलेल्या गुंफा, तारामतीचं उंच शिखर आणि त्याच्या पोटात गणपतीची भव्य मूर्ती असलेली मोठी गुंफा तसेच तिच्या आजूबाजूच्या अनेक गुंफा, उंचावलेला बालेकिल्ला , बालेकिल्ल्या जवळील हत्तीमहाल , अवाढव्य आणि रौद्र कोकणकडा , गडाच्या विविध भागातील आजही सुस्थितीत असलेली मजबूत तटबंदी आणि बुरुज , कातळात खोदलेल्या पायऱ्या व खोबण्या, कोरलेली शिल्पे व देवतांच्या प्रतिमा…. असे नानाविध अलंकार आपल्या अंगावर घेऊन मिरवतोय हा हरिश्चंद्रगड…. एखाद्या नववधू प्रमाणे! प्रत्येक अलंकाराची नजाकत काही औरच!
हरिश्चंद्रगडाची ही श्रीमंती डोळ्यात साठवतांना आश्चर्यचकित व्हायला होतं. दगडी प्रवेशद्वारे, दगडी स्मारकं , देवतांच्या मूर्ती, आदिवासी बांधवांची श्रद्धास्थाने पाहून तर प्राचीन काळापासून या गडावर चहुबाजूने वावर असणार यात शंका राहत नाही. हरिश्चंद्रगडाच्या परिसरातील जंगलात सांबर, रानडुकरे,बिबटे तसेच त्यांच्या पायाचे ठसे आणि विष्ठा, सांबरांची तुटलेली शिंगे, विविध जातीचे सर्प दृष्टीस पडतात .लहान-मोठे ओढे, नाले, धबधबे, विविध प्रकारच्या वेली, वनस्पती व वृक्षांचं समृद्ध जंगल असा जैवविविधतेने समृद्ध असलेला हा गड अभ्यासकांना मात्र मेजवानीच.
याचं आणखी एक आणि अनोखं वैशिष्ट्यं म्हणजे चहुबाजूंनी गडावर जाणाऱ्या सोळा (१६) गडवाटा आणि पायथ्याशी येणाऱ्या नऊ (९) घाटवाटा अशा एकूण पंचवीस (२५) वाटा. इतक्या वाटा असणारा गड तसा दुर्मिळच…या वाटा म्हणजे निसर्गाने हरिश्चंद्रगडाला बांधलेलं एक ' देखणं तोरणच '.
प्रत्येक वाटेचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य. त्यामुळेच या सर्व वाटांनी गडावर जाणं, याचं ट्रेकर्सना मोठं आकर्षण आणि आव्हानही.
. गेल्या ८/१० वर्षात हरिश्चंद्रगडावर जसजशी गर्दी वाढू लागली, तसतशी त्याच्या संदर्भात अधिकाधिक माहिती सोशल मिडीयाद्वारे समोर येऊ लागली. अर्थात अनेक जाणकारांनी / अभ्यासकांनी / जुन्या पिढीतल्या ट्रेकर्सनी हरिश्चंद्रगडाविषयी बरीचशी माहिती यापूर्वीच करून दिली होती. पण गेल्या ४/५ वर्षात हरिश्चंद्रगडाच्या वाटांविषयीची माहिती सोशल मिडीयात यायला लागली. गडाच्या नेमक्या किती वाटा आहेत? याच्या याद्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. या दरम्यान माझ्या ट्रेकिंगच्या विश्वातले गुरु संगमनेरचे श्री. भरतजी रूपवाल, हे मला एकदा हरिश्चंद्रगडावर घेऊन गेले, वेगळ्या वाटेने…..' वेताळ धारेने ' ! आणि ' गणपतीच्या वाटे ' ने खाली घेऊन आले, लव्हाळीत. या ट्रेक मध्ये मला ' दरवाजाची वाट ' दाखवायलाही ते विसरले नाहीत. एकाच दिवशी तीन वाटा ?? त्याही फारशा माहिती नसलेल्या. माझ्यासाठी ही पर्वणीच होती. त्या दिवसापासून मी पेटून उठलो. स्थानिक बांधवांना हाताशी धरून ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यातून गडावर जाणाऱ्या गडवाटा आणि पायथ्याशी येणाऱ्या घाटवाटा मनसोक्त भटकून आलो.
हरिश्चंद्रगड आणि त्याच्या वाटा
. सर्वप्रथम गडवाट आणि घाटवाट म्हणजे काय? हे समजून घेऊया. गडवाट म्हणजे गडाच्या पायथ्यापासून सुरू होऊन थेट गडावर घेऊन जाणारी वाट आणि घाटवाट म्हणजे कोकणातून सुरू होऊन गडाच्या फक्त पायथ्याशी येऊन पोहोचणारी वाट.
▪️ वरील परिभाषेनुसार हरिश्चंद्र गडाला सोळा (१६) गडवाटा आणि नऊ (९) घाटवाटा अशा एकूण पंचवीस (२५) वाटा आहेत.
▪️ या सोळा (१६) गडवाटांपैकी गडावरील एक वाट ही दोन गडवाटांना जोडणारी आहे, तिचा सामावेश गडवाटांमध्ये केला आहे. या वाटेचं नांव आहे ' थनंरगडी ' ची वाट.
▪️ या सोळा (१६) गडवाटांपैकी बारा (१२) गडवाटा एकट्या नगर जिल्ह्यामध्ये आहेत, तर तीन (३) गडवाटा पुणे जिल्ह्यात व एक (१) गडवाट ठाणे जिल्ह्यात आहे.
▪️ राहिलेल्या नऊ (९) घाटवाटा या ठाणे जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडाच्या परिसरात वर आलेल्या आहेत.
सोळा (१६) गडवाटा :-
अ) अहमदनगर जिल्हा
१) टोलार खिंड (कोथळा मार्गे)
२) गणपतीची वाट
३) दरवाजाची वाट
४) पाईरीची वाट
५) गवळ्याची नळी
६) वेताळ धार
७) देवाची वाट (कपारीची वाट)
८) थनंरगडीची वाट
९) गायवाट
१०) बैलघाट
११) वाघरान टेप
१२) बेटाची नळी
ब) पुणे जिल्हा
१३) टोलार खिंड (खिरेश्वर मार्गे)
१४) जुन्नर दरवाजा
१५) ठमारगडी (तारामतीची घळ)
क) ठाणे जिल्हा
१६) नळीची वाट
नऊ (९) घाटवाटा:-
ठाणे जिल्हा
१) सादडे घाट
२) करपदरा
३) जवारीची वाट
४) माकड नाळ
५) रोहिदास घळ
६) तवलीची नळी
७) खुर्द्याची धार
८) गणपतीची वाट
९) चोरदरा
अशा एकूण पंचवीस (२५) वाटा
(भविष्यात आणखी वाटांची यात भर पडू शकते.)
सर्वप्रथम मी एक गोष्ट अगदी प्रांजलपणे आणि स्पष्टपणे सांगू इच्छितो की, या वाटांपैकी एकही वाट मी " शोधलेली " नाही. यापूर्वी " ठमारगडी च्या निमित्ताने " या माझ्या लेखात मी तसं सांगितलंही आहे. स्थानिक आदिवासी बांधवांच्या बरोबर या सर्व वाटा मी प्रत्यक्ष चढून / उतरून आलोय. या वाटांचा मी कोणत्याही दृष्टिकोनातून अभ्यासही केला नाही. त्यामुळे या वाटा प्राचीन/ ऐतिहासिक की राजमार्ग ? याबद्दल या क्षेत्रातील जाणकारांनीच ते ठरवावं. मी फक्त ट्रेकर या नात्याने या सर्व वाटांनी हरिश्चंद्रगड पिंजून काढला. त्याच्या निसर्गसौंदर्याचा आणि रौद्रपणाचाही मनमुराद आनंद लुटला.
या वाटांनीच माझ्या मनाला भुरळ घातली आणि अचानक मनात एक विचार चमकला …. या पैकी चौदा (१४ ) वाटा सलग सहा (६) दिवसांत केल्या तर ???..... त्याप्रमाणे मोहीम आखली. ह्या मोहिमेला नांवही सुचलं, " टोलारखिंड ते टोलारखिंड ". सुरूवात टोलारखिंडीतून अन् शेवटही टोलारखिंडीतच, अशी ही अनोखी मोहीम. नासिकचा डॉ. अतुल साठे आणि अरूण डावरे(CA) हे दोघेजण या मोहिमेत सामील झाले.
जय्यत तयारीला लागलो. मोहीम यशस्वी करण्यासाठी Time management अतिशय महत्वाचं, त्यानुसार आखणी केली. या मोहिमेत लागणाऱ्या खाद्यपदार्थांचे संपूर्ण नियोजन आणि तयारी माझी पत्नी सौ. संगिता हिने अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने करून दिली. ज्यांच्या शिवाय अशा मोहिमा करणं केवळ अशक्य असे दऱ्या-डोंगरात राहणारे माझे जिवाभावाचे साथीदार म्हणजे पाचनईचा भास्कर बादड, लव्हाळीचा बाळू बांबळे, बेलपाड्याचे कमा /कमळू /काशिनाथ आणि खिरेश्वरचा मारूती मेमाणे यांच्या बरोबर अनेक वेळा फोनाफोनी झाली. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी हे सर्वजण आम्हाला जीवापाड जपत होते आणि जीवाची पर्वा न करता झटत होते… सोबतीला कोणकोण येणार? मुक्काम कुठे कुठे करायचा? टेक्निकल सपोर्ट कोण, कसा, कुठे करणार? पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्व साहित्य कसे पोहोचवायचं? इमर्जन्सी कशी हाताळायची? अशा असंख्य प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून उत्तरं शोधली. अंथरुणावर पडलो की डोळे मिटून असंख्य वेळा ह्या वाटा चढून / उतरून यायचो. फक्त एकच ध्यास…. " टोलारखिंड ते टोलारखिंड ".
मोहिमेच्या आदल्या दिवशी लव्हाळीच्या बाळू बांबळेच्या झापावर मुक्काम केला. मोहिमेचा दिवस उजाडला…. दिनांक २५ ऑक्टोबर २०२१. पहाटे ५ वाजता निघालो अन तासाभरात टोलारखिंडीत पोहचलो. आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या खिंडीतल्या " वाघोबा " ला नारळ फोडला, छत्रपती शिवरायांचा मोठ्याने जयघोष झाला आणि मोहिमेला सुरुवात झाली.. आणि हा हा म्हणता पहिल्याच दिवशी चार वाटा पूर्ण करून संध्याकाळी ५ च्या सुमारास बाळू बांबळेच्या झापावर पोहचलो सुद्धा. बाळूच्या बायकोने, लक्ष्मीने गरम गरम चहा दिला आणि फ्रेश झालो. आत्मविश्वास प्रचंड वाढला…मोहीम फत्ते होणारच हे चित्र स्पष्ट झालं, कारण दुसऱ्या दिवसापासून दररोज दोनच वाटा करणार होतो. अधून मधून येणाऱ्या अडचणींवर मात करीत पुढील ५ दिवसात १० वाटा पूर्ण केल्या आणि टोलारखिंडीत पोहोचलो.
या सहा दिवसांमध्ये हरिश्चंद्रगडाचं रौद्र पण तितकंच मनोहारी रूप बघायला मिळालं. त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्तपणे बागडलो , काही वेळा धडपडलो पण त्याने अलगदपणे उचलूनही घेतले. ओसंडून वाहणारं पाणी पोटभर प्यालो आणि मनसोक्त डुंबलोही. निसर्गात भटकण्याचा आनंद मनमुरादपणे घेताना हरिश्चंद्रगडाला केंव्हा कवेत घेतलं ? हे कळलंच नाही. सलग सहा (६) दिवसांत चौदा (१४) वाटा पूर्ण झाल्या… ह्या स्वप्नपूर्तीचा आनंद केवळ शब्दातीत. सहकाऱ्यांना मिठी मारून या आनंदाला डोळ्यांनी वाट मोकळी करून दिली. ज्यांच्या जीवावर ही मोहीम यशस्वी झाली त्या दऱ्या-डोंगरात राहणाऱ्या सोबत्यांचा निरोप घ्यायची वेळ आली…. अक्षरशः ढसढसा रडलो सर्वजण.
हरिश्चंद्रगडावर विविध वाटांनी जाण्याचा आनंद सर्वांना मिळावा आणि स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा, हा या मोहिमेचा उद्देश. भावी काळात या मोहिमेमुळे अनेक ट्रेकर्स या वाटांकडे आकर्षित होतील, यात शंकाच नाही. .
या पहिल्या मोहिमेनंतर मी
अक्षरशः झपाटलो गेलो. माझ्या मनावर हरिश्चंद्रगडाने गारुड केलं. गडाचा काना कोपरा धुंडाळून त्याचं सौंदर्य डोळ्याने भरभरून पहायचं ठरवलं. त्याच्या पोटातली गुपितं उलगडण्यासाठी छोट्या छोट्या मोहिमा आखल्या…
२) दुसरी मोहीम- गायवाट :
(१३/१४ नोव्हेंबर २०२१)
गायवाट ही तशी अवघड आणि धोकादायक वाट. ती सोपी करण्यासाठी स्थानिक आदिवासी बांधव ज्ञानेश्वर बादड, रामनाथ बादड , बाळू बांबळे या तिघांना सोबत घेतलं आणि गाय वाटेवरचा * तो अवघड भाग * रुंद करून , पर्यटकांसाठी ही वाट खुली केली. या तिघांनी प्रचंड मेहनत घेतली.. सोबत नेलेल्या छिन्नी, हातोडा आणि पहारीने काळा कातळ फोडण्याचं दिव्य त्यांनी मोठ्या कष्टाने आणि कौशल्याने पार पाडलं.. आणि महिनाभरातच स्थानिक आदिवासी बांधव पर्यटकांचे ३/४ ग्रुप गडावर घेऊनही गेले... त्यामुळे त्यांना रोजगारही मिळाला आणि पर्यटकांना वेगळ्या वाटेने गडावर गेल्याचा आनंदही..
३) तिसरी मोहीम - कोकणकडा ते कोकणकडा : (जानेवारी २०२२)
ही अशीच एक अनोखी मोहीम. * कोकणकड्यापासून * डाव्या बाजूने सुरूवात करून उजव्या बाजूने पुन्हा *कोकणकड्यावर* यायचं , अशी अंदाजे वीस किलोमीटरची ही गडावरील गड प्रदक्षिणा ... गडावर येणाऱ्या सर्व वाटांना स्पर्श करीत , दाट जंगलातून , छोट्या-मोठ्या टेकड्या चढून उतरून , कड्यावरील अरुंद वाटेने , घसाऱ्या वरून , काळ्या कातळातून , दगड धोंड्यातून , प्रचंड वाढलेल्या गवतातून , पाण्यातून , उन्हातान्हात अडखळत - ठेचकाळत ही प्रदक्षिणा पूर्ण केली.. यावेळी कालभैरवनाथा ची पिंड आणि परचितरायाची मूर्ती ही ठिकाणं नव्याने पहायला मिळाली... अवघा हरिश्चंद्रगड सर्वार्थाने पाहायला मिळाल्याचा आनंद काही वेगळाच.. माझा वर्गमित्र लक्ष्मण दराडे (परिवहन उपायुक्त, महाराष्ट्र राज्य) हा खास या मोहिमेसाठी पुण्याहून आला होता. सोबत दत्ता जगदाळेही होता… भास्कर बादड आणि बाळू बांबळे हे सावलीसारखे मागेपुढे असायचे.
४) चौथी मोहीम - हत्तीमहाल : (६ फेब्रुवारी २०२२)
तारामती शिखर आणि बालेकिल्ला यांच्यामध्ये * हत्ती महाल * हा परिसर आहे . या ठिकाणी कातीव दगडामध्ये बांधलेले एक छोटेसे मंदिर आहे , ज्याची खूपच पडझड झालेली आहे . त्याच्या खालच्या भागामध्ये एक मानवनिर्मित खोदलेली गुहा आहे . ही गुहा पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहत येऊन पूर्णपणे बुजून गेलेली होती . या गुहेत प्रवेश करता येणं केवळ अशक्य होतं. म्हणून या गुहेच्या बाहेरील , प्रवेशद्वारातील आणि आतील माती बाहेर काढून या गुहेत प्रवेश करणं हे या मोहिमेचे स्वरूप होतं. दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सकाळी दहा वाजता सुरू केलेली ही मोहीम दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती . संगमनेरचे गोरख गाडे साहेब आणि रवी राऊत हे टिकाव फावडे घेऊन खोदकामात सहभागी झाले… भास्कर बादडने वेळोवेळी केलेल्या महत्वपूर्ण सूचनांमुळे हे खडतर काम सहजपणे पार पडलं. पाचनईचे विठ्ठल भारमल आणि संजय भारमल कंबर मोडेपर्यंत माती खोदत होते.
.
५) पाचवी मोहीम - पाचनई ते पाचनई अर्थात हरिश्चंद्रगड प्रदक्षिणा :(४,५ ,६ मार्च २०२२)
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचनई या गावातून सुरूवात करून, पायथ्या पायथ्या ने प्रवास करीत गडाला पूर्ण वळसा घालून पुन्हा पाचनई या गावात पोहचायचं, असं या मोहिमेचं स्वरूप. दिनांक ४,५ ,६ मार्च २०२२ या तीन दिवसांत ही प्रदक्षिणा सफल झाली.
नासिकचा राहुल सराफ गेल्या पंचवीस वर्षांपासून माझ्याबरोबर सातत्याने ट्रेकला असतो , या मोहिमेतही होता. पण विशेष म्हणजे त्याच्या १४ वर्षाच्या मुलाने, राघवनेही ही मोहीम पूर्ण केली.
प्रदक्षिणेचा मार्ग:
१ ला दिवस :- पाचनई ते खिरेश्वर
२ रा दिवस : - खिरेश्वर ते वाल्हीवरे (बेलपाडा)
३ रा दिवस : - वाल्हीवरे (बेलपाडा) ते पाचनई
६) सहावी मोहीम - (दिनांक २० नोव्हेंबर २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२२)
या मोहिमेत आदरणीय उष:प्रभा पागे मॅडम (वय ८० वर्षे) व श्री. शशिकांतजी हिरेमठ (वय ६५ वर्षे) यांच्या समवेत सलग ६ दिवसांमध्ये बारा (१२) वाटा केल्या. आदरणीय पागे मॅडम या ' गिरीप्रेमी 'संस्थेच्या संस्थापिका आहेत आणि त्यांचं नाव ट्रेकिंगच्या विश्वात अत्यंत आदराने घेतलं जातं. मा.श्री. शशिकांतजी हिरेमठ हेही गिरीप्रेमीचे संस्थापक सदस्य आहेत.
या मोहिमेनंतर पागे मॅडम यांच्यावर ' पागे मॅडम! तुम्हाला मनापासून सलाम ' हा लेख लिहिला, तो अवश्य वाचावा.
अशा मोहिमांमुळे कौशल्य पणाला तर लागतेच त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढतो आणि निसर्गाची प्रचंड ओढ लागते. यापुढे अनेक ट्रेकर्स अशा प्रकारच्या मोहिमा करत राहणार, ज्यामुळे स्थानिकांचाही रोजगार वाढण्यास मदत होईल.....
हरिश्चंद्रगडाच्या या मोहिमा यशस्वी पार पाडण्यात ट्रेकर्सच्या गळ्यातला ताईत असलेला आणि माझा जिवाभावाचा मित्र भास्कर बादड तसेच बेलपाड्याचे कमा /कमळू /काशिनाथ पोकळा हे तिघे बंधू आणि कमाची मुले रामदास व अशोक, लव्हाळीचा बाळू बांबळे, निलेश बांबळे, मंगेश , पाचनईचे ज्ञानेश्वर बादड, रामनाथ बादड , सखाराम भारमल , सुरेश भारमल , संतोष भारमल, पोपट बादड , विठ्ठल भारमल , संजय भारमल, बजरंग भारमल , खिरेश्वरचा मारूती मेमाणे, पाचनईच्या राजा हरिश्चंद्र युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, अशा अनेक स्थानिक आदिवासी बांधवांचं मोलाचं सहकार्य लाभलं. यांच्या ऋणातच कायमचे रहाणे पसंद करेन.
.
जाता जाता…..
हरिश्चंद्रगडा व त्याच्या आजूबाजूला असलेली ठिकाणं :
१) गणपतीच्या वाटेवरील मोठी गडद कातळातील खोदीव पायऱ्या आणि गणपतीची मूर्ती.
२) दरवाजाच्या वाटेवरील दोन दगडी प्रवेशद्वारे.
३) पाईरीच्या वाटेवरचं थडगं.
४) वेताळ धारेची तटबंदी, बुरुज वेताळबाबाचं ठाणं आणि पाण्याचं टाकं.
५) थनंरगडी च्या वाटेवरचा गार्यादेव.
६) देवाच्या वाटेवर आड बाजूला असलेली भूतगडद.
७) गायवाटेवरची तटबंदी आणि कातळातील खोदीव पायऱ्या.
८) बैलघाटातील बुरुज आणि तटबंदी.
९) बैलघाट चढून गेल्यावर मंदिराकडे जाताना लागणारी सात पायऱ्यांची वाट.
१०) वाघरान टेप या वाटेवरची परचितरायाची मूर्ती.
११) कोकणकड्यावरचा काळभैरवनाथ.
१२) तारामतीच्या पलीकडलं भानवस रायचं जंगल, त्याच्या खालोखाल खराटीचा पूड, आडराईचे जंगल आणि तवलीचं जंगल,.
१३) बालेकिल्ल्या जवळील हत्तीमहाल.
१४) जुन्नर दरवाजा व बालेकिल्ला या मधील खोदीव गुहा, पाण्याचं बंदिस्त टाकं, महादेवाची पिंड
१५) सरपंचाची गुहा, गणपती गडद, वरंजाचा धबधबा.
१६) पाचनई जवळील पाप पुण्याची कुंडे, कोड्याच्या राजाची गादी, घोडेमाळ.
१७) कलाडच्या भैरोबाच्या मागील हपाट्याचा कडा.
१८) लव्हाळीच्या माळरानावरील चिलमीचा खडा.
१९) कुमशेत जवळ परचितरायाचा भाऊ धारेराव यांचं मंदिर.
हरिश्चंद्रगडा जवळची उंच ठिकाणे : रोहिदासाचे शिखर , सीतेचा डोंगर, कलाडचा भैरोबा, नाप्ता, कोथळ्याचा भैरोबा, बुधलीची खिंड, कारकाईचा डोंगर.
अशा कित्येक अनमोल अलंकारांनी मढलेला हा हरिश्चंद्रगड पाहू तितका थोडा, भटकू तितका कमी. कितीही वेळा गेलो तरी मन भरत नाही. हरिश्चंद्रगडाच्या पोटात काही अनमोल रत्ने अजूनही दडलेली असतील…. सापडली तर जरूर सांगा.
विनायक वाडेकर
९३७२० १४६३२
Tuesday, September 3, 2024
बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.
*बैलपोळा....*
*आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️
बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशेषतः भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणा वर साजरा केला जातो,
पोळा हा श्रावणात येणार सण, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण, परंतु त्याच बरोबर....
महाराष्ट्रात सह्याद्री मधील आदिवासी भागातसुद्धा परंपरेने हा सण आदिवासी पाडे, वाडी वस्ती, गावांमध्ये एक अनोळख्या पद्धतीने, भव्य- दिव्य, निसर्ग संस्कृती जोपासत, धरणी आईला वंदन करत सर्वत्र साजरा होतो.
भारत देशा मध्ये शेतकऱ्याला शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग असल्याने, बैल वर्षभर शेतात कष्ट करून आपल्याला अन्न मिळते, शेतकरी सगळ्यांनचा पोशिंदा असला तरी बैल शेतकऱ्याचा पोशिंदा आहे, त्याचा मान, सन्मान राखण्यासाठी हा सण साजरा करतात
हा सण पाऊसावळ्यात असल्याने हवेत गारवा पसरल्याने, मानवी मन देखील ताज तवान झालेलं दिसून येत, सगळी सृष्टी आधीच हिरवाईचा शालू नेसून नवीकोरी,हिरवीगार,मंत्रमुग्ध करणार वातावरण तयार झालेलं असते.
आदिवासी गावांमध्ये सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दोन दिवस आधी गावातील पंचांची बैठक होते, त्या मध्ये सन उत्सव कसा साजरा करायचा याची चर्चा होऊन बासिंगाचे बैल असतील तर त्या मध्ये मोर, वाघोबा, बहिरोबा, डोंगऱ्या देव किंवा ग्रामदैवत इत्यादी यांचे हुबे हुब चित्र रेखाटून आकर्षक मोठे बासिंग तयार केले जाते, प्रत्येक घरावर अशी जबाबदारी वाटून दिली जाते, परंतु बऱ्याच ठिकाणी अशा रुढी लुप्त होताना दिसत आहेत.
पोळ्याच्या काही दिवस अगोदर उंबराच्या झाडाच्या मुळ्यापासून चवार तयार केले जाते. आदिवासी समाजात उंबराच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे, तोडलेली मुळी उभी हातात पकडून तिच्या एका टोकाला मोगरीच्या सहाय्याने मारले जाते, जेव्हा मोगरिने मारले जात असते तेव्हा मुळी हाताने गोल गोल फिरवली जाते जेणे करून चवार एकसारखी तयार होतात. सुताच्या धाग्या प्रमाणे ही बारीक,मुळी जेवढी लांब तेवढ्या लांबीचा चवार, चवार उन्हात वाळवल्या नंतर त्याला घायपाताच्या वाखापासून बनवलेल्या दोऱ्याने बांधून गोंडे बनवले जातात, परंतु आदिवासीं बांधव एक झाडाच्या फक्त एक दोन मुळ्या तोडतात. त्या चवराचे बैल,गाई, म्हसी, शेळ्या इ.साठी आकर्षक गोंडे बनवले जातात. गोंड्याना हवे तेवढ्या रंगात बुडवून रंगीत केले जातात, तेच बैलांना फार शोभून दिसते.
काही दिवस अगोदर शेजारच्या किंवा गावच्या आठवडे बाजारातून बैलांसाठी खूप सारी खरेदी केली जाते, त्यात चावर,कासऱ्या, खुंगरू,गोंडे, बेगड, वेसन, पायाचे तोडे, रंगी बेरंगी वस्र, घुंगर माळा, झुली, गळ्यातले तोडे, साखळी, वेगवेगळे रंग इत्यादी अनेक साहित्य खरेदी केले जाते.
सणाच्या अाधल्या दिवशी गावचा कोतवाल प्रत्येक वाडी वस्ती वर दवंडी देऊन सांगत असतो की उद्या सायंकाळी बैल सजून होळीच्या माळावर घेऊन या म्हणून, त्याच दिवशी बैलांची शेंगे विळीने घोळून त्याला हिंगुळ,तेल, तुपाने चोपडून काढली जातात, पोळ्याच्या दिवशी सकाळीच बैल शेजारी असलेल्या ओढ्यावर नेऊन स्वच्छ धूऊन काढतात, त्या नंतर राखलेले गायरान वर सर्वत्र चरायला सोडलं जातं किंवा भरपूर चारा बैलांना दिला जातो, शेतकऱ्याच्या सर्जा राज्याचा पोळ्याचा दिवस, मनाचा आनंदाचा असतो, पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, कोणतेच काम करून घेतले जात नाही तर त्याचे पुजन लाड केले जातात.
या दिवशी बैलाच्या खांद्याला गोडे तेल, तुपाने आणि हळदीने मालिश केली जाते,
सकाळी बुजुर्ग किवां जाणकार माणसं हातात चवार घेऊन प्रत्येक शेतातील उभ्या पिकाला,गावातील ग्राम देवतेला, वाघोबा, उंबऱ्या देव, कनसारा आई, घर, गाडी, गुरे, शेणकईला चवार बांधले जाते, पूर्वी पासून भात,नाचणी, ज्वारी, बाजरी, मका खुरास्नी, भुईमुग, नागली इत्यादी सर्व पिकांची चावर लाऊन पूजा केली जाते,
आदिवासी ही निसर्गाला पुजनारी, देव माननारी संस्कृती आहे, या सणाच्या निमित्ताने पिकांचे, जनावरांचे, माणसांचे, गावाचे रक्षण करण्याची विनवणी निसर्ग देवतेकडे केली जाते,
बैल चारून झाल्यावर रानातून बैलांना दुपार नंतर घरी आणले जाते, स्वच्छ कपड्याने त्यांना पुसून घेतले जाते,
बैलांच्या शिंगणा नाचणीच्या पिठाच्या खळीने रंगी बेरंगी बेगड चीपकवली जातात, अंगावर घेरू किंवा रंगीत रंगांच्या साहाय्याने नक्षी किंवा रंगाने सजवले जाते,नवीन वेसण, नवीन कासऱ्या, गळ्यात तोढे घुंगर माळा, चवार बांधले जाते, कपाळावर मळवट बांधली जाते, शिंगणा चवार बांधले जाते, पाठीवर विविध नक्षीकाम केले जाते, गेरू चे अंगावर ठिपके दिले जातात, अंगावर झुली घातल्या जातात, गळ्यात छुम छुम करणार्या घुंगरांच्या माळा घातल्या जातात.
सगळं काही नवीन, पायात चांदीचे किंवा तोरड्याचे तोडे घातले जातात. हे सगळ बैलांना खूपच सुंदर दिसू लागते,
बसिंगाच्या बैलांना बसिंग बांधली जातात,
बघता बघता होळीच्या माळावर पारंपरिक वाद्यांचा गजर होऊ लागतो, तस तसे आपापली बैल घेऊन त्या ठिकाणी सर्वांची गर्दी होऊ लागते, सगळ्यांची बैल आल्यावर चावडी किंवा ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी हळू हळू वाद्या मागे बैल गेऊन वाजत गाजत मिरवणूक काढत घेऊन जातात, बासिंगाचे बैल मागे असतात, ग्रामदैवत असलेल्या मंदिराला पाच प्रदिक्षणा घालतात, बैल फिरवले जातात, त्या नंतर बासिंगाचे बैल प्रदक्षिणा घातली जाते, पाच प्रदक्षिणा झाल्यावर ग्रामदैवतेला वंदन केले जाते, नारळ चढवला जातो, पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर गावकरी सुद्धा या पवित्र उत्सवा मध्ये नृत्याचा ठेका धरत नाचू लागतात, महिला ही पारंपरिक गाण्याची साद घालत असतात, नंतर बैल घरी आणले जातात, बैल घरी येण्या आघोदर घरी महिलांनी घराबाहेर बैलांच्या स्वागतासाठी रांगोळी काढलेली असते, बैलांना ओवाळून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला दिला जातो, बळी राजाची अतिथी देवो भव प्रमाणे पूजा केली जाते, त्याच प्रमाणे महिला बैलान पुढे गहु, ज्वारी चे दान मांडतात, ज्यांच्या घरी बैल नसतील ते अगजोदरच मातीचे बैल कुंभरांकडून घेतले जातात, त्याची विधिवत पूजन केले जाते, या दिवशी सगळ्याच शेतकरी बांधवांचा आनंद द्वगुणित होत असतो, सर्जा राजाचेही खूप लाड केले जातात,
अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साह पूर्ण, आनंदात शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा सण महाराष्ट्र सह्याद्री आदिवासी पाडे, वस्ती मध्ये पूर्वी पासून साजरा होत असतो,
या सणामुळे धान्याची,पिकांची, गो धनाची समृध्दी होते असे म्हणतात,
सर्व निसर्ग संस्कृती जोपासण्यासाठी आदिवासी समाजाची मूल्य, संस्कृती मानली जाते, आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करत असल्याने सर्वस्वी बैलांवर अवलंबून असतो, त्या मुळे बैलांन प्रती कृतज्ञता,प्रेम, जिव्हाळा, व्यक्त व्यक्त करण्यासाठी बैलं पोळा सण साजरा केला जातो.
हा सण सह्याद्री, महारष्ट्र राज्यात सर्वच ठिकाणी आदिवासीं भागात साजरा केला जातो, तसेच अकोले तालुक्यात मोठ्या उत्साह, आनंदमय वातावरणात बळीराजाची पूजा करतं साजरा करतात.
आज आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे बैलांचा वापर कमी झाला असला, तरी मानवी जीवनातील त्यांचे महत्त्व कमी होणार नाही. म्हणून आपण हा सण साजरा करणे, ते पण पारंपरिक रीतिरिवाजाने अगत्याचे आहे."बैलपोळा सण "निसर्ग पुजक अदिवासीं संस्कृती व प्राणीमात्रावर जिव्हाळा दाखवीनारा सण आहे.
*:- तळपाडे भरत दशरथ*
*(बिरसा ब्रिगेड, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष)*
९६६५४५१५३०
Monday, September 2, 2024
वनवाश्या ( वनाश्या )"
"वनवाश्या ( वनाश्या )"
दरवर्षी बैल पोळा आला की घरातल्या सर्वांना एकच बैल आठवतो तो म्हणजे "वनाश्या". अजूनही बैलपोळ्याला त्याला बांधत असलेली घुंगर माळ तशीच जपून ठेवली आहे. घुंगरमाळीला आता मात्र गळा वेगळा दिसत असतो. जशी वनाश्याच्या गळ्याला ती घुंगरमाळ शोभायची ना तेव्हढी अजून एकही बैलाला ती शोभली नाही. वाट पाहतोय मी त्या गळ्याची अन त्या वनवाश्याची ही.
त्याच्या नावाला कारण ही तसच होतं. तो ज्या परिस्थितीत वाढला त्यानुसारच त्याच नाव "वनवाश्या" ठेवलं होतं आजोबांनी. आजोबांच्या काळात आमच्या घरी खूप गावरान गाया असायच्या. मला आठवतंय तेव्हा पासून तरी कमीतकमी आठ ते दहा गावरान गाया हमखास असायच्या घरी. पण वडील गेल्यापासून त्यांना सांभाळायला कोण नव्हतं म्हणून कमी झाल्या. आत्ता फक्त एकच गावरान गाय राहिली आहे गोठ्यातल्या दावणीला.
वनाश्या हा घरच्याच गावरान गाईच्या पोटी जन्माला आलेला. पण दुर्दैवाने काही दिवसातच ज्या गाईनं वनवाश्याला जन्म दिला होता ती वारली. अगदी चार पाच दिवसातच तिचा मृत्यू झाला होता. जसं एखाद्या आईचं लेकरू तिला कमीतकमी सहा महिने तरी पीत असतं. तसंच गाईचं वासरू ही गाईला कमीतकमी दहा ते पंधरा दिवस तरी पेत असतं. त्यानंतर हळूहळू गवत वैगरे खायला सुरु करत असतं. पण आजोबांना मोठा प्रश्न पडला होता आता या वासराला जगवायच कसं. बाकीच्या एक दोन गाया ही वेलेल्या( बाळंतीण झालेल्या) होत्या. पण त्या काय वनवाश्याला पिऊ देत नव्हत्या. बाबाला खूप वाईट वाटत होतं. आता या वासराला जगवायच तरी कसं. ना याला बाकीच्या गाया पिऊन देत आहे ना याला गवत खाता येतंय. अन बाबाच तर काम असं होतं की ज्या गाईला गोऱ्हा होईल त्या गाईचं बाबा कधीच दूध नव्हता काढत. म्हणायचा पहिलवान झाला पाहिजे गोऱ्हा पहिलवान. कचाकच औत ओढलं पाहिजे त्यानी. पेऊदे सैल ( सवतं) त्याला म्हणायचा. कितीतरी वेळा त्यावरून आज्जीची न बाबाची भांडण होताना पाहिली होती मी. एखादी गाई गाभण राहिली की आज्जीला मनापासून वाटायचं की गाईला कारव्हडच ( कालव्हड) होयला पाहिजे. कारण घरात खायला दूध ही होयचं आणि अजून एक गाय वाढायची गोठ्यातल्या दावणीला. आजीला इतका आनंद होयचा की जणू काही स्वतः लाच लेक (मुलगी) झाली की काय ईतकी खुश दिसायची आज्जी. आता मात्र परिस्थिती वेगळी होती जेव्हढं दुःख बाबाला झालं होतं तेव्हढंच दुःख आज्जीला ही झालं होतं.
यावर मग आज्जीनेच एक उपाय शोधून काढला होता. आज्जी बोलली बाकीच्या ही गाया येल्या आहेत तर त्यांचं थोडं थोडं दूध काढून या वासराला पाजायचं म्हणून. बाबाला ही आज्जी बोललेलं पटत होतं. मग बाबा रोज सकाळ संध्याकाळ त्या दोन येलेल्या गायांच दूध काढायचा न त्या वासराला पाजायचा. वासराला दूध पाजल्याशिवाय बाबा जेवण पण करत नसत. जीवापाड जपायचा बाबा त्या वासराला. रात्र झालं की त्याला गोठयात न ठेवता बाकीच्या गाया त्याला मारतील या भीतीनं बाबा त्याला घरात घेऊन झोपायचा. स्वतः च्या मुलाला ही बाबा एव्हढा जपला नसल एव्हढी काळजी घायचा बाबा त्या वासराची. कधी कधी तर असही म्हणायचा बिना आईचं लेकरू आहे त्याला आपण नाही जिव लावायचा तर कोण लावील मग. लई वनवास सोसावा लागतो बिना आईच्या लेकराला अस म्हणायचा बाबा. म्हणून त्याचं नाव बाबांनीच "वनवाश्या" ठेवलं होतं. असाच बाबांनी त्याला लहानाचा मोठा केला. पण गावाकडं एखादं लहान पोरगं असू नाहीतर गाईचं वासरू असू त्याचं नाव बदलावलंच जाणार समजा. सोमाचा सोम्याच होणार न बैलाच नाव रतन असल तर त्याचा रतण्याचं होणार. म्हणून त्या वनवाश्या चा ही वनाश्या झाला होता.
त्याच्या सोबत भारत नावाचा बैल ही बाबांनी तयार केला होता. त्याला ही आम्ही भारत्या म्हणायचो. शेती करण्यासाठी आता बाबांनी वनाश्या आणि भारत्या ची जोडी तयार केली होती. भारत्याला आईचं दूध भेटल्यामुळं वनाश्या पेक्षा जास्त तयार दिसत होता. अगदी बाबाच्या भाषेत बोलायचं म्हंटल तर पहिलवानच दिसत होता भारत्या आणि खूप गरीब पण होता. मारत नव्हता काय नव्हता. कोणीही त्याला धरायचं सोडायचं. वनाश्या ही चांगलाच होता तब्बेतीन पण शिंगात जरा फसला होता. पाठमोरी शिंग झाली होती त्याची. बाशिंगा जवळ जाऊन दोन्ही शिंगाची टोकं एकमेकांना भेटत होती त्याची. भारत्या पेक्षा उंची नि ही कमीच होता दिसायला. पण बैलगाडी किंवा औताला जुंपला तर भारत्या बरोबरीनच चालायचा. कधीच माघ हटत नव्हता. दोघांचा चांगलाच जोड जमला होता.
काही वर्षानंतर घरातील काही कारणास्तव वडील व चुलते यांनी वाईलं ( वेगळं) घेण्याचा निर्णय घेतला. हा तर आम्हा सर्वांसाठी एक आश्चर्याचा धक्काच होता. वडिल आणि एक चुलता दोघंच भाऊ असल्यामुळे जमिनिसगट वाटणी समान होणार हे ठरलेलं होतं. सर्व घरदाराची व शेतीवाडी समान वाटून घेतली. सगळ्याची वाटणी झाल्यानंतर प्रश्न राहिला होता जनावरांचा. दोन बैल व गावरान गायांचा. गायांच मला जास्त काही आठवत नाही पण बैलांची वाटणी केलेलं चांगलंच आठवतंय. भारत्या चुलत्यांच्या वाटणीला गेलता तर वनाश्या आमच्या वाटणीला आला होता.
आता भारत्या आणि वनाश्या दोघही जणू वाईलच निघाले होते. त्या दिवसापासून दोघांचे साथीदार बदलले होते. दोघांच्या दावणी बदलल्या होत्या व उठायची बसायची जागा ही बदलली होती. बदलली होती त्यांची खांद्यावरली शिवळाटी व अगदी गळयातली घुंगरमाळ ही. भारत्याला जोडीदार घरच्याच गाईचा एक सुरत( सुरत्या) नावाचा नवा जोडीदार भेटला होता तर वनाश्याला मामाच्या इथुन आणलेला मथुऱ्या नावाचा जोडीदार भेटला होता. वाईलं झाल्यानंतर आमची सर्व शेतीची जबाबदारी मोठ्या भावावर ( महादूवर) व आजोबांवर आली होती. मला वाटत त्या वेळेस त्याला सहवीतूनच शाळा सोडावी लागली होती. ज्या वयात हातात पाटी पेन्सिल घेऊन खूप शिकायचं होतं लिहायचं होतं त्या वयात भावावर हातात नांगर व पाभार धरण्याची वेळ आली होती. त्यानं केलेल्या कष्टाला व मेहनतीला माझा कायम सलाम राहील. मला वाटतं आज जो काही आमचा संसार उभा राहिला आहे त्यात भावाचा व आईचा खूप मोठा वाटा आहे.
काही दिवसातच अचानक भारत्याच दुखायला लागलं. अन ज्या भारत्यानं कधीही कोणाकडे साधं फूस करून सुद्धा पाहिलं नव्हतं की कधी कोणाच्या अंगाला धक्का ही लावला नव्हता. तो अचानक जो जवळ जाईल त्याच्या अंगावर धावून जायचा. पिसाळल्या गत करायला लागला होता अचानक. डॉक्टर ला ही दाखवलं पण कळतच नव्हतं नेमकी काय झालं ते. अन दुर्दैवाने एक दिवस भारत्याने या जगाचा व आम्हां सर्वांचा कायमचा निरोप घेतला. भारत्या जरी अमच्यातून वाईला झाला होता तरी आमच्या हृदयातून कधीच वाईला झाला नाही. त्या दिवशी भारत्या साठी घरातल्या सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहत होते. अगदी घरातला माणूस गेल्यासारख दुःख सगळ्यांना झालं होतं. कारण भारत्या म्हणजे सर्वांचा लाडका होता. कोणीही यावं त्याच्याशी खेळावं इतका गरीब होता . भारत्याला शेतातल्याच बांधावर खड्डा खांदुन शेतातच पुरलं व त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजूनही त्या बांधावर गेलं की भरत्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही.
भारत्या गेल्या पासून वनाश्याला मात्र एक घाण सवय लागली होती ती म्हणजे तो आता बाबा आणि भाऊ सोडून कोणावरही धावून जात होता. बाबा अन भाऊ सोडून त्याला कोणी खायला टाकत नव्हतं की पाणी ही पाजत नव्हतं. त्याची एक खोड अशी होती की त्याला खायला टाकेपर्यंत किंवा पाणी पाजेपर्यंत तो काहीच करत नव्हता. जस त्याच्या समोरची बदली उचलून पाठ फिरवली रे फिरवली की लगेच माघून धडकी द्यायचा. त्यामुळे त्याला खायला टाकायचं ही भ्याव वाटायचं. एकदा तर आई गोठ्यातला शेणकुर करत असताना आईला गोठ्यातच लोळवल होतं त्यानं.
एक दिवस तर गड्याने कहरच केला ज्या बाबांनी त्याला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं. लहानच मोठं केलं होतं त्यालाच आता तो मारायला लागला होता. एक दिवस औत सोडलं न बाबा त्यांना जवळच्या बांधावर चरण्यासाठी घेऊन जात होता तर जाताजाता वनाश्याला काय हुकी आली काय माहीत बाबालाच बांधावर उचलून टाकलं होतं. भाऊ जवळ होता म्हणून थोडक्यात निभावल त्या दिवशी. आणि अजून एक गोष्ट अशी होती की त्याची शिंग पाठमोरी होती न गोल आकाराची झाली होती . त्यामुळं जरी मारलं तर फक्त मुका मार लागायचा. असं करता करता त्यानं भाऊ सोडून सगळ्यांनाच शिंगाव घेतलं होतं. अगदी मला ही नाही सोडलं त्यानं. माझ्या बाबतीत काय झालं तर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग सुट्टीमध्ये मी नेहमी भावा सोबत जायचो औतावर बसायला. कारण कुठं वावरात जास्त गबाळ( गवत) झालं असलं की कुळाची किंवा फरटाची पाळी घालावा लागायची. मग गवत निघण्यासाठी औतावर वजन म्हणून एक छोटासा दगड ठेवायला लागायचा. पण मी सोबत असलो की भावाचा दगड ठेवायचा ताण( त्रास) वाचायचा न दगडाची जागा मी घ्यायचो. खूप मज्जा यायची न जेंव्हा वेळ भेटेल तेव्हा मी एखादं औताच मोडान( चक्कर) आणायचो. असं औतावर बसून बसूनच मी औत हाकायला ही शिकलो होतो. औत हाकून झालं की भाऊ वनाश्याला न मथुऱ्याला चाराया नेण्याचं काम माझ्याकड सोपवायचा. असं रोज त्यांच्या सोबत जाऊन जाऊन मला जरा अति आत्मविश्वास आला होता की वनाश्या आता मला चांगला ओळखायला लागलाय न मला मारनार ही नाही. पण तोच अति आत्मविश्वास एक दिवस माझ्या चांगलाच अंगलट आला. झालं काय की बांधाला चरता चरता कासरा वनाश्याच्या पायात गुतला होता न तो मी अति आत्मविश्वासाने काढायला गेलो. पार अगदी त्याच्या गळ्याला मिठी मारायचाच राहिलो होतो. जसं मी कासरा काढायला गेलो तसं वनाश्यानं मला जवळच्या गव्हात उचलून टाकलं. मी आयोव.... आयोव करत तिथून पळत बोंबलत सुटलो थेट भावाला जाऊन गाठलं. अन त्याला मोठ्याने भोकाड वासवतच घडलेला प्रकार सांगून टाकला. त्यानंतर मी वनाश्याला कधीच चारायला घेऊन एकटा गेलो नाही.
वनाश्यानी त्या दिवशी मला उचलून टाकून भाऊ सोडून सगळ्यांना मारल्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर बैल पोळा आला की आम्ही दोन भाऊ ( संदिप अन मी) बैलांन पेक्षा गाईच्या गोऱ्यांना जास्त सजवायचो. नवी घुंगर माळ नवी मोरखी असं सारं काही नवं नवं आम्ही गोऱ्यांना सजवायलाच जास्त वापरायचो. गावात मिरवणुकीला ही मस्त सजवून न्यायचो. वनाश्याकड थोडं दुर्लक्ष च करायचो आम्ही. त्याला चिडवत बोलायचो आम्हांला लई मारितो ना तुला सजवणारच नाही जा. गोणीतून काढलेलं आमच्या हातचं काय उरलं सुरल गोंड कांडकी भाऊ त्यांना बांधायचा न छान सजवायचा. वनश्याला हिंगोळ लावायचं काम भावकडच असायचं. त्याला दुसरं कोणी हिंगळ लावलेलं आवडतच नव्हतं. पोळा झाला की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सगळ्या घुंगरमाळा व ईतर सामान सोडून ऐका गोणपाटात बांधून ठेवायचं. परत दुसऱ्या वर्षी तेच सामान काढून त्यांना सजवायचं. काही खराब झालं तरच नवीन आणायचं नाहीतर तेच वापरायचं. असं दरवर्षीच असायचं. पण मज्जा यायची पोळ्याला. मला वाटतं अजूनही त्या घुंगर माळा तश्याच आहेत त्यांना बंधायचो त्या. तेव्हढीच एक काय आठवण उरली आहे त्यांची.
आता राहिला होता फक्त भावाचा नंबर. तर एक प्रसंग असा आला की ज्वारीची कनसं काटणीचा सिजन चालू होता. रानात काटलेली कणसं बैलगाडीची साटी भरून घरी आणायची व घराच्या माळदावर उन्हाला तापायला घालायची. त्या दिवशी ही अशीच कनसांची साटी भरून घरी आणली होती ती गाडीतून घराच्या ओट्यावर खाली करत होतो. आणि ओट्याच्या जवळच लगेच बैलांची दावन होती. गाडी खाली होई पर्यंत त्यांना भावाने तिथंच बांधलं होतं. गाडीच्या धुऱ्या खाली करताना चाकांना उटी लावली नसल्यामुळे उतार असल्यामुळे गाडी काय भावाला झेपवता आली नाही. भाऊ गाडी सोबत नेमकी वनश्या च्या समोर आला न तसच वनाश्यानं भावाला माघून जोरदार धडक दिली. वनाश्याने दिलेल्या धडकेमुळे भावाचं तोंड जाऊन नेमकी धुऱ्यांना आदळलं व भावाचे समोरचे दोन दात जाग्यावरच गळून पडले. घडीभर तर कोणाला काहीच कळले नाही की नेमकी काय झालं ते. नशिब भावाला दुसरी काही जास्त ईजा झाली नव्हती मात्र भावला त्याचे दोन दात कायमचे गमवावा लागले.
आता घरात एकच चर्चा चालू झाली की वनाश्याला विकून टाकायचा म्हणून. आज दात पाडलेत उद्या कोणाचा जिव घेईल म्हणून. पण भावाला त्याचीच चूक लक्षात आली व म्हंटला वनाश्यानी मला मारलचं नाही तर मी गाडी घेऊन तो बसला असताना त्याच्या शिंगावर जाऊन बसलो. जेव्हा तो घाबरून उठला तेव्हा माझं तोंड धुऱ्यांना आदळल म्हणून. काहीजण बोलत होते घरचा बैल आहे काय वाया जाईल का ? परत दुसरा कसा निघतोय कसा नाही. अश्या अनेक उलट सुलट चर्चा नंतर वनाश्याला विकायचं रद्द करण्यात आलं. हा भावाने तरी त्याचा राग काढलाच त्याच्यावर थोडा. राग काढला म्हणजे चांगला चोपला होता वनाश्याला.
आता मात्र वनाश्या आणि मथुऱ्या दोघही थकले होते. नांगराला चालताना त्याची चाहूल लागत होती भावाला. आता चाव्हरीला चालायची त्यांची ताकद संपली होती. अन त्यातच दुष्काळ ही पडला होता. पुढील वर्षीची नांगरट काशी करायची हा भावाला मोठा प्रश्न पडला होता. आता परत एकदा दोघांनाही विकायचा विषय घरात हळूहळू येऊ लागला होता. वाटत होतं यांना नाही विकावा खूप सेवा केली त्यांनी. दावणीलाच मारून द्यावं यांना असं सगळ्यांना वाटायचं पण दुष्काळ पडल्यामुळे चार चार बैलं सांभाळणं अवघड होतं. शेती केल्या शिवाय तर काही पर्याय नव्हता. आईनं व भावानं काळजाव दगड ठेऊन एक दिवस दोघांनाही विकून टाकलं. आमच्या आयुष्यतला वनवाश्या आम्हांला कायमचा सोडून गेला होता. त्या दिवशी घरात चूल सुद्धा पेटवली नव्हती.
घरच्या दावणीला बैलं येत राहतील जात राहतील पण वनवाश्या सारखा बैल कधीच दावणीला दिसणार नाही हे ही तेव्हढंच खरं. मी सुरवातीला जसं म्हंटल ना की आमचा संसार उभा करण्यात भावाचा न आईचा जेव्हढा वाटा आहे तितकाच वाटा मला वनवाश्या चा ही वाटतो. जो पर्यंत घरात पोळा साजरा होत राहील तोपर्यंत वनवाश्या ही आमच्या मनात साजरा होत राहील कायमचाच....
सोमनाथ कोंडीभाऊ चौधरी
मु. पो. करंदी, ता. पारनेर
जि. अहमदनगर
9421778013
Friday, August 30, 2024
सुंदर!!👍 आणि धारेबाबांना विनम्र अभिवादन!!
छान! सुंदर!!👍
आणि धारेबाबांना विनम्र अभिवादन!!🙏
राघोजी भांगरे नंतर आता एक एक आदिवासी क्रांतिकारक समोर येत आहे! याला कारण मोबाईल! मोबाईलमुळे अगदी छोटीशी गोष्ट जगभर क्षणात पोहचते.
धारेबाबा प्रमाणेच आमच्या खिरविरे गावचे " रामा डगळे " नावाचे बंडकरी 1920 ते 1945 दरम्यान होऊन गेले. अगदी 1980 सालापर्यंत ते हयात होते.
पण रामा डगळे यांचे बंड इंग्रज सरकार विरुद्ध नव्हते तर राजूर येथील जे वाणी, गुजराती आदिवासीना त्रास देत असत, त्यांच्या जमिनी कर्जपायी गहाण घेऊन आपल्या नावावर करून घेत असत, अशा गुजराती सावकरांविरुद्ध रामा डगळे यांनी बंड पुकारले होते.
रामा बंडकरी म्हणून ते नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.
वेळ मिळाल्यास रामा डगळे बंडकरी यांच्या विषयी मला जे माहित आहे, ते मी आपणास विस्तृतपणे लिहून पाठविण. कारण रामा बंडकरी यांच्या तोंडून मी त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या आहेत!
धन्यवाद!🙏
शुभ रात्री!🙏🙏
....... पराड सर.
( खिरविरे )
श्री क्षेत्र धारेराव मंदिर कुमशेत
श्री क्षेत्र धारेराव मंदिर कुमशेत 🙏
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आदिवासी, डोंगराळ व दूर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. अशा या अकोले तालुक्यात ज्या वीरांच्या रक्तातून इतिहास धावला, ज्यांच्या मनगटात रग आणि छातीत धग होती असे राघोजी भांगरा, बापू भांगरा, रामा किरवा, धरमा मुंढा, खंडू साबळा, बुधा पेढेकर व धारेराव असवला या आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्याच्या खूप जुन्या इतिहासाची पार्श्वभूमी या तालुक्याला लाभलेली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात(सन – १८०० ते १८५० च्या दरम्यान) ‘आदिवासी ४० गाव डांगाण’ म्हणून ओळखल्या जाणार्या मुळा व प्रवरा नदी खोर्यातील भागात ‘राजूर’ ही खूपच जुनी व एकमेव मोठी मानाची बाजारपेठ होती. याच परिसरात डोंगरदर्यातील आदिवासी भागात सावकारशाही व इंग्रज राजवटीतील अधिकार्यांनी दुही माजवली होती. रानावनांत राहाणार्या, गोरगरीब आदिवासींच्या कुटुंबात जाऊन धान्य, कोंबड्या व बकरं मागणे; आणि नाही दिले तर धाक दाखवणे, हाणामारी करणे अशा प्रकारचा छळ व त्रास इंग्रज सरकारने नेमलेले अधिकारी करत असत. सावकार अल्प मुदतीचे कर्ज देऊन आदिवासी बांधवांच्या जमिनी ताब्यात घेत असत. पोटाला चिमटा घेऊन जगणार्या कोंडारोंडा, रानभाज्या, जंगली कंदमुळे खाऊन पोट भरणार्या आदिवासींची लेकरं मात्र भाकरीच्या तुकड्यासाठी टाहो फोडायची. परंतु सावकारशाहीला कधीच या दीनदुबळ्या आदिवासींची दया आली नाही. अशा या जाचक, जुलमी इंग्रज राजवट व सावकारशाहीला लगाम घालण्यासाठी सह्याद्रीची वादळं क्रांतिकारकांच्या रूपानं पेटून उठली. अशा या वादळांनी अकोले तालुका व राजूर पंचक्रोशीत १८ व्या शतकात अनेक चळवळी व बंड पुकारले. या आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रज राजवट व सावकारशाहीला ‘सळो की, पळो’ करून सोडले; आणि माझ्या आदिवासी समाज्यावर होणार्या अन्यायाला व अत्याचाराला वाचा फोडली. याच कालखंडात क्रांतिकारी चळवळीत व बंडात उडी घेऊन आदिवासी समाज्यासाठी जीवाची बाजी लावणार्या वीर धारेराव या खास आदिवासी रत्नाची पारख आपण या कथेच्या माध्यमातून करून घेणार आहोत.
सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं, सह्याद्रीची शान आणि सह्याद्रीचा मान म्हणून नावाजलेलं कुमशेत हे एक आदिवासी गाव. या गावाला निमकोकण असे मी म्हणेल; कारण अकोले तालुक्यात जून महिण्यात कुठेही पावसाची चाहूल नसतांना सुद्धा अगदी कोकण परिसराप्रमाणेच कुमशेत गाव परिसरात जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाच्या हलक्या तर काही अंशी जोरदार सरी बरसू लागतात. त्यामुळे येथील बळीराजा मात्र लवकरच सज्ज होऊन आपल्या भातशेतीची जमीन कसण्यास तयार असतो.
अशा या अतिदूर्गम, डोंगराळ भागात १८ व्या शतकात कुमशेत गावी वीर धारेराव यांचा जन्म एका सामान्य व गरीब शेतकरी कुटुंबात झाला. धारेराव लहानपणापासूनच गुरे राखण्याचे व चारण्याचे काम करत. त्यामुळे निसर्गाशी, झाडाझुडपांशी, डोंगरदर्यांशी नाळ जोडलेल्या या माणसाला परिसराची खडान् खडा माहिती होती.
एकदा रानात गुरे चारत असतांना धारेरावांना कोकतर (रान कोंबडी) दिसली. दगडी गोट्याचा नेम धरून धारेरावांनी त्या रानकोंबडीची शिकार केली. शिकार केलेली रानकोंबडी धारेराव एका वनस्पतीच्या पानांत गुंडाळून सायंकाळच्या वेळी आपली जनावरे घेऊन घरी आले. जनावरे गोठ्यात जाऊ लागली. त्यावेळी धारेरावांनी शिकार करून आणलेली रानकोंबडी हार्या(बांबूपासून बनवलेले कोंबड्या डालण्याचे साधन) खाली डालून ठेवली; आणि धारेराव जनावरे दावणीला बांधण्यासाठी गोठ्यात गेले. जनावरे बांधून बाहेर आल्यानंतर शिकार करून आणलेल्या रानकोंबडीची सागोती(चिकन) करण्यासाठी त्यांनी हारा उचकला. तर काय..? त्या वनस्पतीच्या पानांत गुंडाळून आणलेली रानकोंबडी पुन्हा जिवंत झाली होती. धारेरावांना जरा आश्चर्यच वाटले. मग त्यांच्या डोक्यात विचार आला की, या वनस्पतीचाच काहीतरी चमत्कार घडला असावा. क्षणाचाही विलंब न लावता धारेराव आल्या मार्गे पुन्हा जंगलात गेले. त्या ठिकाणी पोहचल्यानंतर धारेरावांनी त्या वनस्पतीच्या काही मुळ्या, पाने आपल्या जवळ असणार्या कापडी बटव्यात घेतल्या व घरी आले. रात्री जेवण झाल्यावर बर्याच उशीराने धारेरावांनी बटव्यातील मुळ्या व पाने बाहेर काढली. त्या मुळ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या व एका खडबडीत दगडावर उगाळून एक ग्लासभर रस तयार करून स्वत:पिऊन घेतला. त्या आणलेल्या पानांतील एक दीड पाने खाल्ली. त्यानंतर धारेराव निवांतपणे झोपी गेले. मध्यरात्रीच्या वेळी झोपेत असतांना एक अद्भूत संवेदना धारेरावांच्या देहाला जाणवली. धारेराव अचानक झोपेतून ताडकण उठले. तेंव्हा त्यांना शरीर व डोके जड झाल्याचे जाणवू लागले. तेंव्हा आपल्या देहात नक्कीच काहीतरी एक दैवी शक्ती संचारल्याची जाणीव झाली.
याच काळात राजूर पंचक्रोशीत आदिवासी समाज्यावर होणार्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी क्रांतिकारी चळवळींना वेग येऊन रौद्ररूप धारण केले होते. राघोजी भांगरे, कोंड्या नवला अशा आदिवासी क्रांतिकारकांनी या चळवळीत उडी घेऊन बंडाची ठिणगी पेटविली होती. त्याच्या पडसादांनी सह्याद्री पूर्णपणे दुमदुमली होती. त्याचवेळी सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या दीनदुबळ्या आदिवासी बांधवांवर होणार्या अन्याय व अत्याचाराचा सूड घेण्यासाठी कुमशेत गावचे सुपुत्र वीर धारेराव हे एक आदिवासी वादळ अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेले शेवटचे गाव कुमशेत, ठाकरवाडी पंचक्रोशीत पेटून उठले होते. आदिवासी गोरगरीबांना धान्य, कपडे, थोडेफार पैसे अशी मदत पुरवत होते. धारेराव ठाणे जिल्ह्यातील सावरणा, बांडशेत, वालिवरे अशा आदिवासी गावातील जनतेला देखील मदत करायचे. अगदी जव्हार, माळशेजच नाही, तर.., भीमाशंकर पर्यंत आपल्या मदतीचा हात जनसामान्यांसाठी पुढे करत होते. धारेरावांचे हे कार्य इंग्रज राजवटीच्या व सावकारशाहीच्या डोळ्यात सलू लागले. धारेरावांच्या मदतकार्याला चाप लावून धारेरावांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ‘पाथरे’ घाटातील पोलिस चौकीत इंग्रज पोलिस तैनात केले होते. परंतु संजीवनीच्या स्वरूपातील वनस्पती सेवन केलेल्या धारेरावांच्या अंगी काहीतरी दैवी शक्ती संचारत असल्याने इंग्रज पोलिसांना धारेरावांना पकडण्यात यश आले नाही.
पोलिस त्यांना पकडायला आल्यानंतर धारेराव १००० फुटाचा कडा(कोकणकडा) सहज उतरून खाली जायचे व पुन्हा सहज वरती चढूण यायचे. वार्यासारखे धावायचे, पळायचे, कधी – कधी कोकणकड्यावरून सहज खाली उडी टाकायचे, तरीही कसलीच जखम, ईजा धारेरावांना होत नव्हती. धारेराव बाबा बहुरूप्या सारखी वेगवेगळी रूपं धारण करायचे. कधी गुराखी… तर कधी मध काढणाराचे रूप घ्यायचे. कधी – कधी वाटसरू होऊन पोलिसांत देखील मिसळायचे. गप्पा मारायचे. त्यांच्यातच राहून पोलिसांच्या हालचालींची टेहळणी करायचे. पोलिस त्यांनाच विचारायचे धार्या दिसला काय कुठे? तेंव्हा हा बहुरूपी धार्याच उत्तर द्यायचा की, तो बंडकरी..? असेल कुठेतरी..?घनदाट जंगलात, कडेकपारी. परंतु बहुरूपी स्वत: धार्या असल्याची भणक देखील कधी इंग्रज पोलिसांना लागू दिली नाही. धार्याला पकडून देणार्या ईसमाला इंग्रज पोलिसांनी ईनाम सुध्दा घोषित केले होते.
इंग्रज सरकारने धार्याला पकडण्यासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल, प्रत्येक योजना अयशस्वी होत होती. १५-२० दिवस दबा धरून बसलेल्या पोलिसांना धार्या सापडत नव्हता. धार्याला पकडायला इंग्रज पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. त्यामुळे पोलिसही चवताळले होते. रानावनांत दिसणार्या आदिवासींना दम भरत होते. मारझोड करत होते. त्यामुळे धार्या कनवळला होता. अखेर त्याने स्वत: इंग्रज पोलिसांच्या स्वाधीन होऊन शरणागती पत्कारायचे ठरवले होते. एके दिवशी धार्याने पोलिसांची भेट घेऊन आदिवासींवर होणारा अन्याय व अत्याचार थांबविण्याबाबत विनंती केली. आणि म्हणाला की, तुम्ही मला शरण या. मी सुध्दा तुम्हाला शरण येतो. मग तुम्ही मला ज्या ठिकाणी न्याल त्या ठिकाणी मी तुमच्याबरोबर येण्यास तयार आहे. परंतु माझी एक अट आहे, ती म्हणजे माझे फक्त शीर(मुंडके/डोके) कापून न्या. माझे धड मात्र माझ्या जन्मभूमीत राहू द्या. मग मात्र इंग्रज पोलिस तयार झाले. धार्याला पकडून त्याचे शीर कापले गेले. आणि त्वरित पुणे या ठिकाणी सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी त्या काळात जेलमध्ये इंग्रज जेलर जो कोणी होता, त्याच्या समोर वीर धारेरावांचे शीर ठेवण्यात आले. त्या जेलरने धार्याचे शीर पाहिल्या बरोबर धार्याच्या शीराला व आदिवासी समाज्याला ‘शिवीगाळ’ केल्याचा प्रकार घडला असावा. (असा अंदाज वर्तवला जातो) त्याच क्षणी धार्याचे शीर जिवंत होऊन त्या जेलरच्या नरड्यावर उडून बसले व जोराने चावा घेतला. तसाच जेलर घाबरला व जोरात विव्हळला. आपल्या दोन्ही हातांनी जोराने धार्याच्या शीराला पकडून बाजूला झटकले. तेंव्हा माझ्या या शीराला माझ्या जन्मभूमीत घेऊन चला असे धार्याच्या शीराने इंग्रज पोलिसांना बजावले. धार्याच्या शीराचा असा रौद्र व राक्षसी अवतार पाहून इंग्रज पोलिसही घाबरले होते. त्यामुळे विलंब न लावता पोलिस धार्याचे शीर घेऊन कुमशेतला आले, आणि ज्या ठिकाणी धार्याचे धड पडले होते, त्या ठिकाणी या लढवय्य क्रांतिकारकाचा अंत्यविधी करण्यात आला. अशी आख्यायिका/वीर धारेरावांची कर्मकथा कुमशेत येथील काही वृद्ध जाणकार लोक, सरपंच सय्याजी असवले, सराजी असवले, बुधा बांडे इ. ग्रामस्थ मंडळी सांगतात. इतिहासात कुठेही या वीर धारेरावांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद झाली नाही, म्हणून ही आख्यायिका मागे पडली असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. असा हा गोरगरीबांचा कैवारी धार्या.. आदिवासी जनतेच्या गळ्यातील जणू काही ताईत बनला होता. आदिवासी समाज वीर धारेराव बाबांना देव मानतो, आजही मानत आहे.
काही वर्षानंतर धारेराव बाबांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी धारेराव बाबा आदिवासी जनतेच्या सदैव स्मरणात रहावेत म्हणून कुमशेत गावच्या ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून एक धारेरावांचे समाधीस्थळ म्हणून एक मंदीर बांधले.
स्मशान म्हटलं की, प्रत्येकाच्या मनात अगोदरच एक प्रकारचं भय निर्माण झालेलं असतं. परंतु या धारेराव बाबांचे अंत्यसंस्कार केंद्र/समाधी या आधुनिक युगात अकोले तालुक्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र बनले आहे. जणू काही स्वर्गातील इंद्राची बाग ‘नंदनवन’ या कुमशेत व ठाकरवाडी परिसरात अवतरले आहे. अगदी तिनही मौसमात निसर्गाची खरी नवलाई पाहून मन भरून जाते. त्यामुळे पर्यटकांच्या चेहर्यावरील आनंद हा अगदी ओसांडून वाहत असतो. म्हणून दरवर्षी हजारो पर्यटक या निसर्गरम्य परिसरात धारेराव बाबांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. पर्यटकांचे खास आकर्षण म्हणजे वीर धारेरावांचे मंदिर, अहमदनगर व ठाणे जिल्ह्यांची सीमारेषा ठरलेला अवाढव्य असा कोकणकडा, आजोबा पर्वत, नाफ्ता डोंगर, घोडी शेप, जुडी कलाडगड, कोंबडा डोंगर, गवळी देव, घनचक्कर डोंगर, मुडा डोंगर, घोड पाऊल, शिपाई बुडी ओढा आणि पाथर्या घाट अशी विविध नयनरम्य पर्यटनस्थळे व धारेराव बाबांचे गुरू सदोबा महाराज यांचे समाधीस्थळ पर्यटकांचे लक्ष वेधल्या शिवाय राहात नाही.
कळसुबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्यातील जैवसृष्टीचा खजिना या धारेराव बाबांच्या पावनभूमीत कुमशेत परिसरात आपल्याला पाहावयास मिळतो. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट अरण्य, महाराष्ट्राचे मानचिन्ह शेकरू आपल्याला या अरण्यात पाहावयास मिळतो. तसेच वाघ, बिबट, रान डुक्कर, तरस असे अनेक प्रकारचे प्राणी व विविध प्रकारचे पक्ष्यांचे आपल्याला दर्शन घडते. खरी ग्रामीण जीवनशैली कशी असते याची जाणीव आपल्याला होते. रायभोग भाताचे जुने पारंपारिक वाण या गावाने टिकवून ठेवले आहे. आजही काही शेतकरी रायभोग भाताचे पिक घेतात. भोजनात रायभोगाच्या तांदळाचा भात सेवन करतात.
या तीर्थक्षेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर पुढील परिसरात साधारणतः १०० कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचा शेंदूर फासलेला गोलगरगरीत दगड(गोटी) ठेवली आहे. भाविक भक्ताने वीर धारेराव बाबांचे नाव घेऊन एखादी इच्छा मनोमन व्यक्त करायची व ती दगडाची गोटी उचलण्याचा प्रयत्न करायचा, जर त्या भक्ताच्या मनातील ईच्छा/मनोकामना धारेराव बाबांच्या कृपेने पूर्ण होणारी असेल तर ती दगडाची गोटी उचलते. अन्यथा उचलत नाही. अशी एक या दगडाची(गोटीची) आख्यायिका वृद्ध व जाणकार लोक सांगतात.
चैत्र महिन्यामध्ये कुमशेतकर मंडळी संपूर्ण महिनाभर आठवड्याचा एक दिवस असे धारेराव बाबांसाठी पाच रविवार पाळीक दिवस(मोडे) पाळतात. या मोड्याच्या दिवशी शेतात कोणत्याही प्रकारचे कुठलेच काम करत नाहीत.
Thursday, August 15, 2024
संदीप वाकचौरे
नमस्कार, आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार.. खरे तर वाढदिवस म्हणजे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस.. आजवरच्या झालेल्या प्रवासात आपण काय मिळवले आणि काय गमावले याचा हिशोब करण्याचा दिवस.. आजवरच्या प्रवासात शब्द आणि विचार सोबतीला होतेच .त्यांनी कधी धोका दिला नाही आणि त्यांच्या सोबतीने जगताना कधी निराशाही आली नाही. कदाचित माणसे सोबतीला होती.. ती दूरही गेली असतील.. मात्र शब्द, विचारांची सतत सोबत राहिली. त्या शब्द, विचारांच्या सोबतीने जगताना अनेक चांगली माणसे मिळत गेली .ही माणसे जीवनाची कायमची ठेव बनली. या माणसांनीच जगण्याचा आधार दिला.. या माणसांनी प्रेम ,स्नेह असं सारं भरभरून दिले. तुम्ही माझ्या आयुष्याचा प्रवासातील शक्ती प्रदान करणारे सशक्त हात आहात याची मला पूर्णत: जाणीव आहे.त्यामुळे आजचा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या शुभेच्छामुळे माझा आनंद द्विगुणित करणारा झाला आहे.तुमच्या शुभेच्छांच्या बळामुळे उद्याच्या जगण्याची उमेद उंचावत जाणार आहे.तुमच्या स्नेह असाच वृद्धिंगत होवो..ही अपेक्षा.. आपले पुनश्च मनःपूर्वक आभार.
संदीप वाकचौरे
Friday, July 19, 2024
राही मावशी
बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे.....
सौ . राहीबाई सोमा पोपेरे , राहणार कोंभाळणे तालुका- अकोले, जिल्हा अहमदनगर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला . वडिलांची गरिब परिस्थिती आणि घरी सात भावंडे असल्याने राहीबाईंना शाळेत घातलेच नाही . घरी आई वडिलांसोबत त्या शेतामध्ये मदत करु लागल्या . बालपणापासूनच शेतीची आवड असलेल्या राहीबाईंना वयाच्या बाराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी जावे लागले . त्यांचे माहेर आणि सासर कोंभाळने गावचेच आहे. सासरी आल्यानंतर पती सोमा यांचे सोबत त्या शेतात राबू लागल्या .सुरुवातीला रासायनिक शेतीकडे कल असल्याने त्यांनी या शेतीचा अनुभव घेऊन पााहिला . घरातील वाढते आजारपण व दवाखाण्यावर होणारा बेसुमार खर्च याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की संकरित वानांना उत्पादन जरी जास्त येते तरी उत्पादन खर्चही मोठा होतो .रासायनिक औषधे व कीटकनाशके मोठयाप्रमानात वापरल्याने त्यांचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो . त्यानंतर त्यांनी परस बागेत गावरान भाजीपाला उत्पादन घरी खण्यासाठी सुरू केले .त्यांना परसबाग उभारणी साठी जनरल मिल्स पुरस्कृत व बायफ संस्था संचलित आदिवासी विकास प्रकलपांतर्गत मदत करण्यात आली .त्यांना यासाठी विविध फळझाडे जसे की चिक्कू , आंबा , सीताफळ , पपई , लिंबू , कढीपत्ता , शेवगा , हादगा , अंजीर , या प्रकारची बहुवर्षायू फळझाडे लागवडीसाठी देण्यात आली . सोबतच तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले.पाणी नसल्याने ही झाडे कशी सांभाळणार हा प्रश्न त्यांना पडला .त्यावर त्यांना बायफच्या कृषी तज्ञांनी मार्गदर्शन करताना दगडांपासून आच्छादन झाडांच्या बुंध्या सभोवती करण्याचा सल्ला दिला. दगडांचे आच्छादन केल्यामुळे अत्यंत कमी पाण्यात झाडे तग धरू लागले . हवा , सोसाट्याचा वारा, वादळ व प्रखर ऊन यापासून बाष्पीभवनाने उडून जाणारे पाणी वाचून झाडांना त्याचा उपयोग होऊ लागला . हळूहळू परसबाग वाढू लागली आणि राहीबाईंचे मन परसबागेत रमू लागले . या परस बागेतच देशी गावरान बियांचा संग्रह पुन्हा जमू लागला. त्यांनी हाळू हाळू देशी बियांच्या वाणांचा संग्रह निर्माण करून शेती मधेही बदल घडवून आणला . रासायनिक शेतीकडे झुकलेला परिवार पुणे पुन्हा गावरान व अस्सल देशी पिकांकडे वळवला. दरम्यान बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेशी त्यांचा बचत गटांच्या माध्यामाने समंध आला .एके दिवशी बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे दिवसभराचे कामे आटोपून शेजारील मोठे असलेले गाव खिरविरे येथून परतीचा प्रवास करताना राहीबाई यांच्याकडे चहा पिण्यासाठी थांबले . रस्त्याच्या कडेलाच राहीबाई यांचे घर असल्याने व पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा कमालीचा वाढला होता त्यामुळे रस्त्यात विसावा म्हणून सहज ते राहीबाई यांच्या वस्तीवर वळले होते.. घरा समोरील ओट्यावर बसून त्यांनी राहीबाई सोबत गप्पा सुरू केल्या. चहा पिता - पिता त्यांचे लक्ष्य राहीबाई निवडत असलेल्या बियाण्यांकडे गेले. नुकताच पाऊस सुरू झाला म्हणून शेतावर लागवडीसाठी त्यांना ही बियाणे घेऊन जायचे होते . त्यांना विचारणा करून या बियांची माहिती त्यांनी घेतली . येवढे विविध प्रकारचे बियाणे बघताना त्यांना नवल वाटले. त्यांनी अधिक चौकशी केली असता गाडगे , मडके , कणग्या , बळद आणि शेणाने सारवलेल्या भिंती यातील अस्सल गावठी वणाचे बियाणे त्यांनी दाखविण्यासाठी काढून आनले . श्री.जितीन साठे यांनी ही सर्व बियाणे आणि त्यांचे प्रकार यांच्या नोंदी घेतल्या . सर्व प्रकार आणि काही भाज्या यांचे त्यांनी फोटोही घेतले . हेसर्व करत असताना त्यांच्या लक्षात आले की. श्रीमती राहिबाई यांच्याकडे सुमारे सतरा प्रकारचे पिके व 48 वाण एकाच वेळेस उपलब्ध आहेत . नुसतेच हे सांभाळलेले नव्हते तर या सर्व वाणांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होटी. विशेष म्हणजे त्या शाळा शिकलेल्याच नसताना हि सर्व माहिती ध्यानात ठेवणे ही खूप कठीण बाब आणि इतकीच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बियांची माहिती संकलित केल्यानंतर साठे यांनी ही माहिती वर्तमानपत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकार मित्रांना कळवली .या कामाची सर्वात पहिली दाखल सकाळ वृत्तपत्राने घेतली . नंतर जमा केलेली सर्व माहिती श्री. साठे यांनी विषय तज्ञ श्री. संजय पाटील यांना दिली व कोंभाळणे हे राहीबाई यांचे मूळ गाव जनुककोश प्रकल्पात जोडण्याची विनंती केली. हा कप्रकल्प या भागात नुकताच सुरू झाला होता . राहिबाईंचे पारंपरिक वाणांचे ज्ञान व बियाणे संग्रह याची नोंद घेऊन तिच्या राहत्या घरातील एक छोट्या खोलीत बियाणे बँक बायफ संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.गिरीशजी सोहनी यांचे मार्गदर्शनाने व हस्ते वर्ष 2016 मध्ये सुरू करण्यात आली . या बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रचार व प्रसार राहीबाई करू लागल्या. आज या बीज बँकेत 54 पिकांचे 116 विविध प्रकारचे आणि गुण वैशिष्ट्य असलेले वाण उपलब्ध आहेत . यातील वाल आणि पावटयाच्या सुमारे 20 वाणांचा संग्रह आहे .हे सर्व वाण प्रोटीन युक्त व कमी पाण्यावर येऊ शकणारे आहेत . यातील काही वाण तर हवेतील ओलाव्यावर येऊ शकणारे आहेत . या शिवाय भात , नागली , वरई , सुमारे 30 विविध प्रकारच्या भाज्या , तेल वर्गीय पिके , तृन व गळीत धान्य असे विविध प्रकारचे वाण त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत . निसर्गातील अमूल्य असा ठेवा पुढच्या पिढीसाठी ठेवला आहे. .बायफच्या मदतीने त्यांनी या वाणांचा प्रचार व प्रसार करतांना राज्य व देश पातळीवरील प्रदर्शनातून सहभाग नोंदवला आहे . या शिवाय शाळा , कॉलेज , बचत गट ,चर्चा सत्र ,शिबिरे , शेतकरी प्रशिक्षणे या माध्यमाने देशी वाणांचे जतन व प्रसार कार्य मोठया प्रमाणात केले आहे .अकोले तालुक्यातील आदिवासी भागात महिला बचत गटांच्या माध्यमाने स्थानिक वाणांचा प्रसार मोठया प्रमाणावर केला आहे .परसबागेत लागवडीयोग्य गावरान बियाणे राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहचवले आहे . कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची स्थापना करून त्या मार्फत स्थानिक वाणांचे संवर्धन व प्रसार कार्य बायफच्या मदतीने सुरू ठेवलेले आहे. .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोकमत वृत्तपत्र समूहाने सर्वप्रथम जिल्हा व नंतर विभाग पातळीवरील पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे .याशिवाय वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार ,बायफचा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार,आदिवासी विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार ,झी मिडियाचा अनन्य सन्मान ,कृषी विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय जिजामाता कृषिभूषण पुरस्कार , जिल्हा परिषद अहमदनगर कृषी विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शेतकरी जिल्हा स्तरीत पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत .बी.बी.सी. वर्ल्डने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 प्रतिभावान व प्रेरणादायी महिलांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे .
त्यांना नुकताच IBN Lokmat News 18 या मराठी वृत्तवाहिनीचा आदर्श शेतकरी सन्मान श्री .चंद्रकांतदादा पाटील कृषी मंत्री यांचे हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला . दादांनी त्यांचे कार्याची खास दखल घेत बीज बँक तात्काळ बांधून देणार असल्याचे व्यासपीठावरूनच जाहीर केले .आणि अवघ्या 45 दिवसात भव्य बीज बँक आणि घर त्यांना बांधूनही दिले .त्याचा हस्तांतरण सोहळा तीन मार्च 2019 रोजी कोंभाळणे येथे माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .या प्रसंगी जिल्याचे पालकमंत्री श्री.राम शिंदेही हजर होते .राहीबाईंनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री .अचुतानंद द्विवेदी यांनी एक लघुपट त्यांच्या कार्यावर आधारित तयार केला . त्या लघुपटाला वर्ष 2019 मधील फ्रान्स येथे झालेल्या कांन्स चित्रपट महोत्सवात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक भेटले आहे .देशपातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारचा महिला व बाल कल्याण विभागाचा वर्ष 2018 चा नारी शक्ती पुरस्कार माननीय राष्ट्पती श्री . रामनाथ कोविंद यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. झी मीडियाचा उंचा माझा झोका या पुरस्कारनेही त्या नुकत्याच सन्मानित झाल्या आहेत .महाराष्ट्रातील तूफान गाजलेला विनोदी कार्यक्रम चला हवा येउद्यानेही त्यांना मंचावर निमंत्रित केले होते. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कारहि जाहीर झाला आहे.वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात राहीबाईचा संदर्भ आणि माहिती विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घेण्यात आली आहे.जगातील सर्वात सुंदर स्त्री होण्याचा मान मिळवलेल्या युक्ता मुखी यांनी राहीबाईंकडून आहार विषयी सखोल माहिती घेतली . रयत शिक्षण संस्थेचा देशपातळीवर दिला जाणारा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार( अडीच लाख रुपये) नुकताच त्यांना नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच पी. के .आण्णा पाटील फाउंडेशन तालुका - शहादा जिल्हा नंदुरबार येथे एक लाख रुपयाचा पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
,नुकताच त्यांना 8 नोव्हेंबर 2021 रोजी मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा , भारत सरकार कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात झाला आहे . मसूरी , उत्तराखण्ड येथे असलेल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी भारत सरकार यांच्या माध्यमाने सुरू असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या फेस वन मधील प्रशिक्षणासाठी पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा कृषी क्षेत्रातील असलेला अनुभव नव्यानेच निवडण्यात आलेल्या व अमृत महोत्सवी बॅचचे 183 आयएएस अधिकाऱ्यांना माहिती करून देण्यासाठी किसान सामवेद अंतर्गत या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या यबीजमाता म्हणून ग्रामीम आणि आदिवासी भागात त्या प्रसिद्ध आहेत आणि हाजारो कष्टकरी ,गरीब लोकांना, शेतकरी कुटुंबाना त्या प्रेरणास्थान बनून राहिल्या आहेत .गावोगावी जशा पैशाच्या बँका आहेत तशाच गावरान बियाणे बँका तयार झाल्या पाहिजेत हे त्यांचे लक्ष आहे .गावरान बियाणे संवर्धन आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन प्रचार प्रसार व प्रत्यक्ष कार्यक्रम यावर भर दिला जाईल. शाळा , कॉलेजे , विद्यालये हे सुध्दा या कार्यक्रमाचा भाग असणार आहे.येत्या काही काळात शाळेतील मुलांना गावरान बियाणे संवर्धन आणि प्रसार व शेतीत त्यांना यशस्वी यावर परिपूर्ण माहिती देण्याचा एक कृती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.त्यासाठी बायफ संस्था , शासन , विविध विकास यंत्रणा व संशोधन केंद्र यांना सामावून घेत कार्यक्रम केला जाणार आहे. जास्तीत जास्त हा विषय शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे हा जीवनाचा भाग असेल असे त्या आवर्जून सांगतात .
Monday, July 15, 2024
भंडारदरा परिक्रमा म्हणजे पर्यटनाची उच्च अनुभूती
सकाळ विशेष
शांताराम काळे
अकोले, ता. १६ : सहाद्रीच्या कुशीत सुमारे साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराजीच्या खोबनीत वसवलेला सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा धरण) ब्रिटिशांनी १९९० मध्ये धरणाच्या बांधकामाला सुरवात केली आणि ते १९२६मध्ये पूर्ण झाले. ब्रिटिशांनी धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीमुळे परिसराला 'प्रतिकाश्मीर' म्हटले जाते. म्हणूनच या परिसरात पावसाळी सहलीसाठी पर्यटकांचों गर्दी होते. धरणाची परिक्रमा करणे म्हणजे पर्यटनानंदाची उच्च अनुभूतीच!
भंडारदरा धरणाच्या परिसरात दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा म्हणजे बालाघाट. राकट कातळाच्या पिंगट करड्या रंगाची ही डोंगररांग ऋतुमानाप्रमाणेन तिचे सौंदर्यही बदलत जाते. कधी काळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटक इथे भ्रमंती करायचे, आता पावसाळी पर्यटनाचा आनंद येथे लुटला जातो.
पावसाळ्यापूर्वी काजवा महोत्सव सरता ग्रीष्म आणि वर्षाऋतूंच्या आगमना अगोदरच्या संधिरुतूत या परिसरातील सादाडाची झाडे प्रकाशमान होतात. काजव्यांचे पुंजके इथल्या झाडांवर वास्तव्याला असतात, या काळात झाडांवर जनू चांदण्याचे संमेलन भरल्याचा भास होतो. त्याला काजवा महोत्सव म्हटले जाते. खरे तर लवकरच येणाऱ्या कृष्णजलदाच्या आगमनाची चाहूलच हे काजवे देतात. पावसाला सुरवात होताच त्यांचे जीवनचक्र संपते वर्षाकाला सुरवात झाली, की इथल्या काळ्या कातळाचा रंगही बदलू लागतो, संपूर्ण डोंगरावर हिरवाईची शाल पसरू लागते. जसजसे पावसाचे प्रमाण वाढते, तसतसे या पर्वतरांगांचे सौंदर्य खुलू लागते. डोंगरापलीकडून येणारे कृष्णमेघही या उतुंग शिखरांवर विसावतात. रेंगाळणाऱ्या मेघांमध्ये शिखरे, डोंगरवाटा लुप्त होतात. मेघदुलई बाजूला होताच डोंगरांच्या फटीतून कोसळणारे शुभ्र फेसाळनारे धबधबे नजरेस पडतात.
लोभस 'अम्ब्रेला फॉल'
भंडारदरा धरणाच्या अतोकडे १० किलोमीटरवर रंधा धबधब्याचे दर्शन पडायचे; मात्र आता कोदनी जलविद्युत३२मेगा वॅट प्रकल्पासाठी पाणी अडविल्यानेहा धबधबा अकसल्यासारखा कोसळतो असे वाटते,
. त्यामुळे हल्ली धबधबा पाहायला मिळणे या भागातील पर्यटकाना अलभ्य लाभच। भंडारदरा जलाशय भरले, की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरुन सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकर धारण करत वहू लागतात. म्हणूनच त्याचे नाव 'अम्ब्रेला फॉल' ठेवण्यात आले. या धरणाखाली एक छोटेखानी पूल आहे. पर्यटकांना या पुलावर जाऊन तुषाररस्नान घेता येते. त्यामुळे 'अम्ब्रेला फॉल' लोभस झाला आहे. इथेही ब्रिटिशांच्या रसिकतेला दाद द्यावी तितकी थोडीच
महाराष्ट्राची चेरापुंजी
परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरवात करता येते. या भागातला प्रवास सुरू होतो, तसतसा निसर्ग आपल्याला त्याच्या कुशीत सामावून घेऊ लागतो. जलाशयाच्या बाजूने वळणे घेत घेत प्रवास करताना समोरच्या संततधार पाऊस, मेघांच्या दाट दुलईत अदृश्य होणारा रस्ता पार करताना आपसूकच ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा..' या ओळी ओठांवर येतात, रतनगडाच्या डोंगरमाथ्यावरील
एका गुहेत प्रवरा नदीचा उगम आहे .धरणापासून साधारण सात किलोमीटर आत गेल्यानंतर पांजरे नावाचे छोटेखानी गाव आहे. इथून कळसूबाई शिखराचे दर्शन घडते. 'महाराष्ट्राचे एव्हरेष्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाई येथून किंवा पलीकडच्या बारी गावातून चढाई सुरू करता येते. पांजरे गावातून पुढे घाटघरकडे जाता येते, पांजरे,घाटघर ,रतनवाडी ही गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात
एकदा पाऊस सुरू झाला, की चार-सहा दिवस अविश्रांत कोसळने ठरलेलेच, घाटघरच्या कोकणकडावर उभे राहून खाली डोकावले, की खोल दरीतल्या उदंचन जलविद्युत प्रकल्प नजरेत भरतो. एका बाजूला छातीत धडकी भरविणारा कोकणकडा वेगाने रोरावणाऱ्या वाऱ्याचा नाद पर्यटकांना भुरळ घालतो. घटघरच्या घाटनदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.
साम्रदची सांदण
घाटघर कडून सांदण मार्गे रतनवाडीकडे
जाताना साधारण एक किलोमीटर आडवाटेत सांदण आहे. पावसाचे तडाखे वर्षानुवर्षे झेलल्याने खडकावर आकाराला आलेल्या नानाविध रचना, कोकणकडाचे रौद्र रूप, कधी साहसला साद घालणारे सुळके तर कधी रांजणखळगे ..असा अनेक नैसर्गिक कला कृती येथे साकारल्या आहेत.
. एक किलोमीटर लांबीच्या सांदणीची रुंदी साधारण५० फूट आहे. रतनगडाच्या पोटातून येणारा ओढा हा सांदणीतून वाहतो .त्यातील मोठमोठ्या शिळा साहसी पर्यटकांना साद घालतात अर्थात, पावसाळ्यात सांदणीत उतरणे धोक्याचे असते. अचानक पूर आला, तर आसरा घेण्यास सांदनीमध्ये जागा नाही.
साम्रद पासून रतनवाडी येथे पोहचल्यावर इस इसन पूर्वीचे शिवकालीन हेमाडपंती शिवमंदिर पाहायला मिळते तर तेथूनच पुढे दक्षिणेला रतनगड आहे .
रतनगड मार्गे भंडारदरा कडे निघताना काळ्या कातळावरून पांढरे शुभ्र ,नाणी फॉल,नेकलेस फॉल,कोलटेम्भे येथील बाहुबली फॉल पाहताना पर्यटक हरखून जातात
धबधबे पाहत मुतखेलमार्गे धरणाचाजवळ पोचता येते. या ठिकाणी आपली संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते. या सर्व प्रत मुतखेलजवळच्यया डोंगरमाथ्यावरून पडणारे पायथ्याशों न पोचत वाऱ्यामुळे हवेतच विरतानाचे दृश्य पर्यटकांना थांबण्यास भाग पाडते काही ठिकाणी एकमेकांना बिलगुन उभी असलेलो कौलारू घरे इथल्या आदिवासी संस्कृतीचे येथे दर्शन घडवितात.
Sunday, July 14, 2024
सेवानिवृत्ती म्हणजे काय हो भाऊ
*सेवानिवृत्ती-*
नोकरीनंतर निरुपयोगी म्हणजेच ‘रिटायर्ड’ झाल्यानंतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर वेळ घालवणे ही एक भीषण समस्या बनली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोकांनी विविध मार्ग आणि पद्धती शोधून काढल्या आहेत.
काही 'कष्टाळू ब्रँड' चे लोक निवृत्ती नंतर लगेचच चित्रपटातील 'रामू काकां'च्या भूमिकेत येतात आणि सकाळी लवकर उठून खांद्यावर टॉवेल टाकून घराची साफसफाई आणि स्वयंपाकघर साफ करायला लागतात.
उरलेल्या दिवसात ते त्यांच्या बायकोसाठी 'वाहन चालक' म्हणून सेवा देतात आणि बाजारात खरेदी किंवा चित्रपट वगैरे दाखवतात. अशा लोकांच्या पत्नींनी पूर्वजन्मात काही चांगले कर्म केले असावेत, ज्याचे फळ म्हणून त्यांना ही सुखासीन परिस्थिती प्राप्त झाली आहे.
असेही काही लोक आहेत जे निवृत्तीनंतर अचानक अतिधार्मिक बनतात आणि त्यांनी यापूर्वी कधी मंदिरात डोकावले ही नसले तरीही सकाळ संध्याकाळ दोन दोन तास विविध मंदिरात पूजा आणि भजन कीर्तन करण्यात घालवतात, अशा लोकांना आपण नोकरीस असतांना केलेल्या सर्व गैरकृत्यांच्या पापातून आता निस्तरले जात असल्याची भावना होत आहे.
सेवानिवृत्तांचा असा आणखी एक वर्ग आहे, ज्यांच्यामध्ये निवृत्तीनंतर अचानक वाल्मिकी आणि तुळशीदासांचे आत्मे प्रवेश करतात आणि ते रातोरात 'कवी' च्या भुमिकेत येतात. हे लोक सोशल मीडियावर असे विचार लिहितात की त्यांचे मित्र या काव्य-प्रदूषणाने त्रस्त राहतात पण नाविलाजाने 'व्वा व्वा' म्हणायला भाग पडतात.
अशी काही थोर माणसे सुद्धा बघायला मिळतात ज्यांच्यात 'राजकारणाचा किडा' नेहमी धुमाकूळ घालत राहतो आणि नोकरीच्या कार्यकाळात 'आपण जनतेत खूप लोकप्रिय होतो' असा त्यांना भ्रम निर्माण होतो आणि निवृत्त होताच ते एखाद्या राजकीय पक्षाशी किंवा नेत्याशी हातमिळवणी करतात व एखाद्या गटात सामील होऊन निवडणूक लढवतात आणि निवडणुकीत आपटले की ते खूप संतापतात, पण त्यांना हे क्वचितच माहित असते की नोकरीत असताना त्यांची होणारी विचारपूस किंवा त्यांना 'मिळणारा मान, होणारा आदर' हा त्यांच्या आसनस्थ पदामुळे त्यांच्या लाळघोटेपणा करणाऱ्या चमच्यांनी पसरवलेला खोटा आभास होता. मग ते अनेकदा पक्षाच्या कार्यालयाबाहेर लाह्या किंवा चणे खात असतांना दिसतात.
निवृत्त वृद्धांचा एक मोठा वर्ग असा देखील आहे जे कुटुंबात कदाचित 'नकोशे झालेले' आहेत आणि म्हणूनच त्यांना घराबाहेर पडण्याचा एक अनोखा मार्ग सापडतो. सकाळी दहा वाजता ते स्वत:ची व कुटुंबातील सर्वांची बँकेची पासबुके जमा करतात आणि कुठल्यातरी बँकेत प्रवेश करून त्या पासबुकांच्या नोंदी काढण्यात आणि बँकेच्या वातानुकूलित वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी दिवसाचे एक दीड वाजवतात. हे लोक बँकेच्या ग्राहकांपेक्षा जास्त तेथील कर्मचारी असल्यासारखे दिसतात आणि बँक कर्मचाऱ्यांचे जगणे ते कठीण करुन सोडतात.
वरील सर्व श्रेण्यांव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने सेवानिवृत्त लोकांची आवडती ठिकाणे म्हणजे शेजारची उद्याने, जिथे ते सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या बहाण्याने जमतात आणि जरी त्यांच्यापैकी कोणीही नोकरीत असताना आपापल्या क्षेत्रात कधीही सकारात्मक काम केले नाही हे साफ विसरून सरकारला शिव्याशाप देण्याचे त्यांचे आवडते कार्य करत राहतात व दीर्घकाळ हळहळ व्यक्त करत असतात.
आमच्या अनेक सेवानिवृत्त बांधवांना हे सर्व अजिबात आवडत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ घरातच रहायला आवडते. अशा लोकांसाठी त्यांच्या सुना व मुलांनी वेळ घालवण्याचे चांगले साधन शोधून ठेवले आहे. आपल्या लहान मुलांना त्यांच्याकडे सोपवून सर्व काळजींपासून मुक्त होऊन ते ऑफिस, मार्केट आणि थिएटरमध्ये जातात आणि हे निवृत्त भाऊ लगेच 'आजोबा'च्या भुमिकेमध्ये येतात आणि आपल्या मुलांसाठी ते अत्यंत उपयुक्त आणि कामाचे व मौल्यवान असल्याचे सिद्ध होतात.
ज्यांची मुले-मुली कुठेतरी परदेशात आहेत, तिथे गेल्यावरही हे लोक महिनोनमहिने उत्तम 'बाळ संगोपन' सेवा दिल्याबद्दल कृतज्ञ होत आहेत.
यांतील असेही काही आहेत की निवृत्त झाल्यावरही ज्यांचे चेहरे मोहरे अजूनही तेजस्वी, ओजस्वी आणि समाधानाच्या ओघवत्या तेजाने चमकत आहेत, अशांच्याभोवती त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी ते सतत लोकांच्या गर्दीने वेढलेले आहेत. त्यांना आदराने, भेटवस्तू दिल्या जात आहेत.
काही सेवानिवृत्त लोक त्यांचे नोकरीत असतांनाचे 'कारनामे' ऐकवण्यासाठी 'श्रोते' शोधत बागेत फिरतात कारण बायको त्यांच्या या भाकडकथांना कंटाळालेली असते आणि मुलगा व सून मोबाईलमधून डोकंही वर काढत नाहीत.
काही सेवानिवृत्त लोक कार्यालयातील सवय झालेल्या फुकट चहाची तलफ भागवण्यासाठी जवळपासच्या चौकातील चहाची टपरी आणि जुने मित्रांच्या शोधात फिरत आहेत. घरात तर शुगर आणि वाढत्या वयाचे दाखले देत त्यांच्या चहा पिण्यावर बंधन घालण्यात आले आहे.
मला आशा आहे की आपण या वर्णनात स्वत: कुठे बसतो ते शोधत आहात.
मी स्वतः माझी जागा आणि काम निवडण्यासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब करत आहे. उंट कोणत्या बाजुवर बसणार हे बघू या..
तुम्हा सर्वांचे निवृत्ती नंतरचे जीवन सुखमय, आनंदी व स्वास्थ्यपूर्ण राहो हीच सदिच्छा.
Tuesday, June 25, 2024
बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे....
बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे.....
सौ . राहीबाई सोमा पोपेरे , राहणार कोंभाळणे तालुका- अकोले, जिल्हा अहमदनगर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला . वडिलांची गरिब परिस्थिती आणि घरी सात भावंडे असल्याने राहीबाईंना शाळेत घातलेच नाही . घरी आई वडिलांसोबत त्या शेतामध्ये मदत करु लागल्या . बालपणापासूनच शेतीची आवड असलेल्या राहीबाईंना वयाच्या बाराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी जावे लागले . त्यांचे माहेर आणि सासर कोंभाळने गावचेच आहे. सासरी आल्यानंतर पती सोमा यांचे सोबत त्या शेतात राबू लागल्या .सुरुवातीला रासायनिक शेतीकडे कल असल्याने त्यांनी या शेतीचा अनुभव घेऊन पााहिला . घरातील वाढते आजारपण व दवाखाण्यावर होणारा बेसुमार खर्च याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की संकरित वानांना उत्पादन जरी जास्त येते तरी उत्पादन खर्चही मोठा होतो .रासायनिक औषधे व कीटकनाशके मोठयाप्रमानात वापरल्याने त्यांचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो . त्यानंतर त्यांनी परस बागेत गावरान भाजीपाला उत्पादन घरी खण्यासाठी सुरू केले .त्यांना परसबाग उभारणी साठी जनरल मिल्स पुरस्कृत व बायफ संस्था संचलित आदिवासी विकास प्रकलपांतर्गत मदत करण्यात आली .त्यांना यासाठी विविध फळझाडे जसे की चिक्कू , आंबा , सीताफळ , पपई , लिंबू , कढीपत्ता , शेवगा , हादगा , अंजीर , या प्रकारची बहुवर्षायू फळझाडे लागवडीसाठी देण्यात आली . सोबतच तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले.पाणी नसल्याने ही झाडे कशी सांभाळणार हा प्रश्न त्यांना पडला .त्यावर त्यांना बायफच्या कृषी तज्ञांनी मार्गदर्शन करताना दगडांपासून आच्छादन झाडांच्या बुंध्या सभोवती करण्याचा सल्ला दिला. दगडांचे आच्छादन केल्यामुळे अत्यंत कमी पाण्यात झाडे तग धरू लागले . हवा , सोसाट्याचा वारा, वादळ व प्रखर ऊन यापासून बाष्पीभवनाने उडून जाणारे पाणी वाचून झाडांना त्याचा उपयोग होऊ लागला . हळूहळू परसबाग वाढू लागली आणि राहीबाईंचे मन परसबागेत रमू लागले . या परस बागेतच देशी गावरान बियांचा संग्रह पुन्हा जमू लागला. त्यांनी हाळू हाळू देशी बियांच्या वाणांचा संग्रह निर्माण करून शेती मधेही बदल घडवून आणला . रासायनिक शेतीकडे झुकलेला परिवार पुणे पुन्हा गावरान व अस्सल देशी पिकांकडे वळवला. दरम्यान बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेशी त्यांचा बचत गटांच्या माध्यामाने समंध आला .एके दिवशी बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे दिवसभराचे कामे आटोपून शेजारील मोठे असलेले गाव खिरविरे येथून परतीचा प्रवास करताना राहीबाई यांच्याकडे चहा पिण्यासाठी थांबले . रस्त्याच्या कडेलाच राहीबाई यांचे घर असल्याने व पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा कमालीचा वाढला होता त्यामुळे रस्त्यात विसावा म्हणून सहज ते राहीबाई यांच्या वस्तीवर वळले होते.. घरा समोरील ओट्यावर बसून त्यांनी राहीबाई सोबत गप्पा सुरू केल्या. चहा पिता - पिता त्यांचे लक्ष्य राहीबाई निवडत असलेल्या बियाण्यांकडे गेले. नुकताच पाऊस सुरू झाला म्हणून शेतावर लागवडीसाठी त्यांना ही बियाणे घेऊन जायचे होते . त्यांना विचारणा करून या बियांची माहिती त्यांनी घेतली . येवढे विविध प्रकारचे बियाणे बघताना त्यांना नवल वाटले. त्यांनी अधिक चौकशी केली असता गाडगे , मडके , कणग्या , बळद आणि शेणाने सारवलेल्या भिंती यातील अस्सल गावठी वणाचे बियाणे त्यांनी दाखविण्यासाठी काढून आनले . श्री.जितीन साठे यांनी ही सर्व बियाणे आणि त्यांचे प्रकार यांच्या नोंदी घेतल्या . सर्व प्रकार आणि काही भाज्या यांचे त्यांनी फोटोही घेतले . हेसर्व करत असताना त्यांच्या लक्षात आले की. श्रीमती राहिबाई यांच्याकडे सुमारे सतरा प्रकारचे पिके व 48 वाण एकाच वेळेस उपलब्ध आहेत . नुसतेच हे सांभाळलेले नव्हते तर या सर्व वाणांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होटी. विशेष म्हणजे त्या शाळा शिकलेल्याच नसताना हि सर्व माहिती ध्यानात ठेवणे ही खूप कठीण बाब आणि इतकीच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बियांची माहिती संकलित केल्यानंतर साठे यांनी ही माहिती वर्तमानपत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकार मित्रांना कळवली .या कामाची सर्वात पहिली दाखल सकाळ वृत्तपत्राने घेतली . नंतर जमा केलेली सर्व माहिती श्री. साठे यांनी विषय तज्ञ श्री. संजय पाटील यांना दिली व कोंभाळणे हे राहीबाई यांचे मूळ गाव जनुककोश प्रकल्पात जोडण्याची विनंती केली. हा कप्रकल्प या भागात नुकताच सुरू झाला होता . राहिबाईंचे पारंपरिक वाणांचे ज्ञान व बियाणे संग्रह याची नोंद घेऊन तिच्या राहत्या घरातील एक छोट्या खोलीत बियाणे बँक बायफ संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.गिरीशजी सोहनी यांचे मार्गदर्शनाने व हस्ते वर्ष 2016 मध्ये सुरू करण्यात आली . या बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रचार व प्रसार राहीबाई करू लागल्या. आज या बीज बँकेत 54 पिकांचे 116 विविध प्रकारचे आणि गुण वैशिष्ट्य असलेले वाण उपलब्ध आहेत . यातील वाल आणि पावटयाच्या सुमारे 20 वाणांचा संग्रह आहे .हे सर्व वाण प्रोटीन युक्त व कमी पाण्यावर येऊ शकणारे आहेत . यातील काही वाण तर हवेतील ओलाव्यावर येऊ शकणारे आहेत . या शिवाय भात , नागली , वरई , सुमारे 30 विविध प्रकारच्या भाज्या , तेल वर्गीय पिके , तृन व गळीत धान्य असे विविध प्रकारचे वाण त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत . निसर्गातील अमूल्य असा ठेवा पुढच्या पिढीसाठी ठेवला आहे. .बायफच्या मदतीने त्यांनी या वाणांचा प्रचार व प्रसार करतांना राज्य व देश पातळीवरील प्रदर्शनातून सहभाग नोंदवला आहे . या शिवाय शाळा , कॉलेज , बचत गट ,चर्चा सत्र ,शिबिरे , शेतकरी प्रशिक्षणे या माध्यमाने देशी वाणांचे जतन व प्रसार कार्य मोठया प्रमाणात केले आहे .अकोले तालुक्यातील आदिवासी भागात महिला बचत गटांच्या माध्यमाने स्थानिक वाणांचा प्रसार मोठया प्रमाणावर केला आहे .परसबागेत लागवडीयोग्य गावरान बियाणे राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहचवले आहे . कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची स्थापना करून त्या मार्फत स्थानिक वाणांचे संवर्धन व प्रसार कार्य बायफच्या मदतीने सुरू ठेवलेले आहे. .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोकमत वृत्तपत्र समूहाने सर्वप्रथम जिल्हा व नंतर विभाग पातळीवरील पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे .याशिवाय वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार ,बायफचा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार,आदिवासी विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार ,झी मिडियाचा अनन्य सन्मान ,कृषी विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय जिजामाता कृषिभूषण पुरस्कार , जिल्हा परिषद अहमदनगर कृषी विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शेतकरी जिल्हा स्तरीत पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत .बी.बी.सी. वर्ल्डने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 प्रतिभावान व प्रेरणादायी महिलांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे .
त्यांना नुकताच IBN Lokmat News 18 या मराठी वृत्तवाहिनीचा आदर्श शेतकरी सन्मान श्री .चंद्रकांतदादा पाटील कृषी मंत्री यांचे हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला . दादांनी त्यांचे कार्याची खास दखल घेत बीज बँक तात्काळ बांधून देणार असल्याचे व्यासपीठावरूनच जाहीर केले .आणि अवघ्या 45 दिवसात भव्य बीज बँक आणि घर त्यांना बांधूनही दिले .त्याचा हस्तांतरण सोहळा तीन मार्च 2019 रोजी कोंभाळणे येथे माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .या प्रसंगी जिल्याचे पालकमंत्री श्री.राम शिंदेही हजर होते .राहीबाईंनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री .अचुतानंद द्विवेदी यांनी एक लघुपट त्यांच्या कार्यावर आधारित तयार केला . त्या लघुपटाला वर्ष 2019 मधील फ्रान्स येथे झालेल्या कांन्स चित्रपट महोत्सवात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक भेटले आहे .देशपातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारचा महिला व बाल कल्याण विभागाचा वर्ष 2018 चा नारी शक्ती पुरस्कार माननीय राष्ट्पती श्री . रामनाथ कोविंद यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. झी मीडियाचा उंचा माझा झोका या पुरस्कारनेही त्या नुकत्याच सन्मानित झाल्या आहेत .महाराष्ट्रातील तूफान गाजलेला विनोदी कार्यक्रम चला हवा येउद्यानेही त्यांना मंचावर निमंत्रित केले होते. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कारहि जाहीर झाला आहे.वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात राहीबाईचा संदर्भ आणि माहिती विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घेण्यात आली आहे.जगातील सर्वात सुंदर स्त्री होण्याचा मान मिळवलेल्या युक्ता मुखी यांनी राहीबाईंकडून आहार विषयी सखोल माहिती घेतली . रयत शिक्षण संस्थेचा देशपातळीवर दिला जाणारा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार( अडीच लाख रुपये) नुकताच त्यांना नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच पी. के .आण्णा पाटील फाउंडेशन तालुका - शहादा जिल्हा नंदुरबार येथे एक लाख रुपयाचा पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
,नुकताच त्यांना 8 नोव्हेंबर 2021 रोजी मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा , भारत सरकार कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात झाला आहे . मसूरी , उत्तराखण्ड येथे असलेल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी भारत सरकार यांच्या माध्यमाने सुरू असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या फेस वन मधील प्रशिक्षणासाठी पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा कृषी क्षेत्रातील असलेला अनुभव नव्यानेच निवडण्यात आलेल्या व अमृत महोत्सवी बॅचचे 183 आयएएस अधिकाऱ्यांना माहिती करून देण्यासाठी किसान सामवेद अंतर्गत या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या यबीजमाता म्हणून ग्रामीम आणि आदिवासी भागात त्या प्रसिद्ध आहेत आणि हाजारो कष्टकरी ,गरीब लोकांना, शेतकरी कुटुंबाना त्या प्रेरणास्थान बनून राहिल्या आहेत .गावोगावी जशा पैशाच्या बँका आहेत तशाच गावरान बियाणे बँका तयार झाल्या पाहिजेत हे त्यांचे लक्ष आहे .गावरान बियाणे संवर्धन आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन प्रचार प्रसार व प्रत्यक्ष कार्यक्रम यावर भर दिला जाईल. शाळा , कॉलेजे , विद्यालये हे सुध्दा या कार्यक्रमाचा भाग असणार आहे.येत्या काही काळात शाळेतील मुलांना गावरान बियाणे संवर्धन आणि प्रसार व शेतीत त्यांना यशस्वी यावर परिपूर्ण माहिती देण्याचा एक कृती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.त्यासाठी बायफ संस्था , शासन , विविध विकास यंत्रणा व संशोधन केंद्र यांना सामावून घेत कार्यक्रम केला जाणार आहे. जास्तीत जास्त हा विषय शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे हा जीवनाचा भाग असेल असे त्या आवर्जून सांगतात .
बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे....
बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे.....
सौ . राहीबाई सोमा पोपेरे , राहणार कोंभाळणे तालुका- अकोले, जिल्हा अहमदनगर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला . वडिलांची गरिब परिस्थिती आणि घरी सात भावंडे असल्याने राहीबाईंना शाळेत घातलेच नाही . घरी आई वडिलांसोबत त्या शेतामध्ये मदत करु लागल्या . बालपणापासूनच शेतीची आवड असलेल्या राहीबाईंना वयाच्या बाराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी जावे लागले . त्यांचे माहेर आणि सासर कोंभाळने गावचेच आहे. सासरी आल्यानंतर पती सोमा यांचे सोबत त्या शेतात राबू लागल्या .सुरुवातीला रासायनिक शेतीकडे कल असल्याने त्यांनी या शेतीचा अनुभव घेऊन पााहिला . घरातील वाढते आजारपण व दवाखाण्यावर होणारा बेसुमार खर्च याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की संकरित वानांना उत्पादन जरी जास्त येते तरी उत्पादन खर्चही मोठा होतो .रासायनिक औषधे व कीटकनाशके मोठयाप्रमानात वापरल्याने त्यांचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो . त्यानंतर त्यांनी परस बागेत गावरान भाजीपाला उत्पादन घरी खण्यासाठी सुरू केले .त्यांना परसबाग उभारणी साठी जनरल मिल्स पुरस्कृत व बायफ संस्था संचलित आदिवासी विकास प्रकलपांतर्गत मदत करण्यात आली .त्यांना यासाठी विविध फळझाडे जसे की चिक्कू , आंबा , सीताफळ , पपई , लिंबू , कढीपत्ता , शेवगा , हादगा , अंजीर , या प्रकारची बहुवर्षायू फळझाडे लागवडीसाठी देण्यात आली . सोबतच तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले.पाणी नसल्याने ही झाडे कशी सांभाळणार हा प्रश्न त्यांना पडला .त्यावर त्यांना बायफच्या कृषी तज्ञांनी मार्गदर्शन करताना दगडांपासून आच्छादन झाडांच्या बुंध्या सभोवती करण्याचा सल्ला दिला. दगडांचे आच्छादन केल्यामुळे अत्यंत कमी पाण्यात झाडे तग धरू लागले . हवा , सोसाट्याचा वारा, वादळ व प्रखर ऊन यापासून बाष्पीभवनाने उडून जाणारे पाणी वाचून झाडांना त्याचा उपयोग होऊ लागला . हळूहळू परसबाग वाढू लागली आणि राहीबाईंचे मन परसबागेत रमू लागले . या परस बागेतच देशी गावरान बियांचा संग्रह पुन्हा जमू लागला. त्यांनी हाळू हाळू देशी बियांच्या वाणांचा संग्रह निर्माण करून शेती मधेही बदल घडवून आणला . रासायनिक शेतीकडे झुकलेला परिवार पुणे पुन्हा गावरान व अस्सल देशी पिकांकडे वळवला. दरम्यान बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेशी त्यांचा बचत गटांच्या माध्यामाने समंध आला .एके दिवशी बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे दिवसभराचे कामे आटोपून शेजारील मोठे असलेले गाव खिरविरे येथून परतीचा प्रवास करताना राहीबाई यांच्याकडे चहा पिण्यासाठी थांबले . रस्त्याच्या कडेलाच राहीबाई यांचे घर असल्याने व पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा कमालीचा वाढला होता त्यामुळे रस्त्यात विसावा म्हणून सहज ते राहीबाई यांच्या वस्तीवर वळले होते.. घरा समोरील ओट्यावर बसून त्यांनी राहीबाई सोबत गप्पा सुरू केल्या. चहा पिता - पिता त्यांचे लक्ष्य राहीबाई निवडत असलेल्या बियाण्यांकडे गेले. नुकताच पाऊस सुरू झाला म्हणून शेतावर लागवडीसाठी त्यांना ही बियाणे घेऊन जायचे होते . त्यांना विचारणा करून या बियांची माहिती त्यांनी घेतली . येवढे विविध प्रकारचे बियाणे बघताना त्यांना नवल वाटले. त्यांनी अधिक चौकशी केली असता गाडगे , मडके , कणग्या , बळद आणि शेणाने सारवलेल्या भिंती यातील अस्सल गावठी वणाचे बियाणे त्यांनी दाखविण्यासाठी काढून आनले . श्री.जितीन साठे यांनी ही सर्व बियाणे आणि त्यांचे प्रकार यांच्या नोंदी घेतल्या . सर्व प्रकार आणि काही भाज्या यांचे त्यांनी फोटोही घेतले . हेसर्व करत असताना त्यांच्या लक्षात आले की. श्रीमती राहिबाई यांच्याकडे सुमारे सतरा प्रकारचे पिके व 48 वाण एकाच वेळेस उपलब्ध आहेत . नुसतेच हे सांभाळलेले नव्हते तर या सर्व वाणांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होटी. विशेष म्हणजे त्या शाळा शिकलेल्याच नसताना हि सर्व माहिती ध्यानात ठेवणे ही खूप कठीण बाब आणि इतकीच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बियांची माहिती संकलित केल्यानंतर साठे यांनी ही माहिती वर्तमानपत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकार मित्रांना कळवली .या कामाची सर्वात पहिली दाखल सकाळ वृत्तपत्राने घेतली . नंतर जमा केलेली सर्व माहिती श्री. साठे यांनी विषय तज्ञ श्री. संजय पाटील यांना दिली व कोंभाळणे हे राहीबाई यांचे मूळ गाव जनुककोश प्रकल्पात जोडण्याची विनंती केली. हा कप्रकल्प या भागात नुकताच सुरू झाला होता . राहिबाईंचे पारंपरिक वाणांचे ज्ञान व बियाणे संग्रह याची नोंद घेऊन तिच्या राहत्या घरातील एक छोट्या खोलीत बियाणे बँक बायफ संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.गिरीशजी सोहनी यांचे मार्गदर्शनाने व हस्ते वर्ष 2016 मध्ये सुरू करण्यात आली . या बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रचार व प्रसार राहीबाई करू लागल्या. आज या बीज बँकेत 54 पिकांचे 116 विविध प्रकारचे आणि गुण वैशिष्ट्य असलेले वाण उपलब्ध आहेत . यातील वाल आणि पावटयाच्या सुमारे 20 वाणांचा संग्रह आहे .हे सर्व वाण प्रोटीन युक्त व कमी पाण्यावर येऊ शकणारे आहेत . यातील काही वाण तर हवेतील ओलाव्यावर येऊ शकणारे आहेत . या शिवाय भात , नागली , वरई , सुमारे 30 विविध प्रकारच्या भाज्या , तेल वर्गीय पिके , तृन व गळीत धान्य असे विविध प्रकारचे वाण त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत . निसर्गातील अमूल्य असा ठेवा पुढच्या पिढीसाठी ठेवला आहे. .बायफच्या मदतीने त्यांनी या वाणांचा प्रचार व प्रसार करतांना राज्य व देश पातळीवरील प्रदर्शनातून सहभाग नोंदवला आहे . या शिवाय शाळा , कॉलेज , बचत गट ,चर्चा सत्र ,शिबिरे , शेतकरी प्रशिक्षणे या माध्यमाने देशी वाणांचे जतन व प्रसार कार्य मोठया प्रमाणात केले आहे .अकोले तालुक्यातील आदिवासी भागात महिला बचत गटांच्या माध्यमाने स्थानिक वाणांचा प्रसार मोठया प्रमाणावर केला आहे .परसबागेत लागवडीयोग्य गावरान बियाणे राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहचवले आहे . कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची स्थापना करून त्या मार्फत स्थानिक वाणांचे संवर्धन व प्रसार कार्य बायफच्या मदतीने सुरू ठेवलेले आहे. .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोकमत वृत्तपत्र समूहाने सर्वप्रथम जिल्हा व नंतर विभाग पातळीवरील पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे .याशिवाय वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार ,बायफचा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार,आदिवासी विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार ,झी मिडियाचा अनन्य सन्मान ,कृषी विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय जिजामाता कृषिभूषण पुरस्कार , जिल्हा परिषद अहमदनगर कृषी विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शेतकरी जिल्हा स्तरीत पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत .बी.बी.सी. वर्ल्डने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 प्रतिभावान व प्रेरणादायी महिलांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे .
त्यांना नुकताच IBN Lokmat News 18 या मराठी वृत्तवाहिनीचा आदर्श शेतकरी सन्मान श्री .चंद्रकांतदादा पाटील कृषी मंत्री यांचे हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला . दादांनी त्यांचे कार्याची खास दखल घेत बीज बँक तात्काळ बांधून देणार असल्याचे व्यासपीठावरूनच जाहीर केले .आणि अवघ्या 45 दिवसात भव्य बीज बँक आणि घर त्यांना बांधूनही दिले .त्याचा हस्तांतरण सोहळा तीन मार्च 2019 रोजी कोंभाळणे येथे माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .या प्रसंगी जिल्याचे पालकमंत्री श्री.राम शिंदेही हजर होते .राहीबाईंनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री .अचुतानंद द्विवेदी यांनी एक लघुपट त्यांच्या कार्यावर आधारित तयार केला . त्या लघुपटाला वर्ष 2019 मधील फ्रान्स येथे झालेल्या कांन्स चित्रपट महोत्सवात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक भेटले आहे .देशपातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारचा महिला व बाल कल्याण विभागाचा वर्ष 2018 चा नारी शक्ती पुरस्कार माननीय राष्ट्पती श्री . रामनाथ कोविंद यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. झी मीडियाचा उंचा माझा झोका या पुरस्कारनेही त्या नुकत्याच सन्मानित झाल्या आहेत .महाराष्ट्रातील तूफान गाजलेला विनोदी कार्यक्रम चला हवा येउद्यानेही त्यांना मंचावर निमंत्रित केले होते. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कारहि जाहीर झाला आहे.वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात राहीबाईचा संदर्भ आणि माहिती विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घेण्यात आली आहे.जगातील सर्वात सुंदर स्त्री होण्याचा मान मिळवलेल्या युक्ता मुखी यांनी राहीबाईंकडून आहार विषयी सखोल माहिती घेतली . रयत शिक्षण संस्थेचा देशपातळीवर दिला जाणारा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार( अडीच लाख रुपये) नुकताच त्यांना नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच पी. के .आण्णा पाटील फाउंडेशन तालुका - शहादा जिल्हा नंदुरबार येथे एक लाख रुपयाचा पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
,नुकताच त्यांना 8 नोव्हेंबर 2021 रोजी मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा , भारत सरकार कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात झाला आहे . मसूरी , उत्तराखण्ड येथे असलेल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी भारत सरकार यांच्या माध्यमाने सुरू असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या फेस वन मधील प्रशिक्षणासाठी पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा कृषी क्षेत्रातील असलेला अनुभव नव्यानेच निवडण्यात आलेल्या व अमृत महोत्सवी बॅचचे 183 आयएएस अधिकाऱ्यांना माहिती करून देण्यासाठी किसान सामवेद अंतर्गत या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या यबीजमाता म्हणून ग्रामीम आणि आदिवासी भागात त्या प्रसिद्ध आहेत आणि हाजारो कष्टकरी ,गरीब लोकांना, शेतकरी कुटुंबाना त्या प्रेरणास्थान बनून राहिल्या आहेत .गावोगावी जशा पैशाच्या बँका आहेत तशाच गावरान बियाणे बँका तयार झाल्या पाहिजेत हे त्यांचे लक्ष आहे .गावरान बियाणे संवर्धन आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन प्रचार प्रसार व प्रत्यक्ष कार्यक्रम यावर भर दिला जाईल. शाळा , कॉलेजे , विद्यालये हे सुध्दा या कार्यक्रमाचा भाग असणार आहे.येत्या काही काळात शाळेतील मुलांना गावरान बियाणे संवर्धन आणि प्रसार व शेतीत त्यांना यशस्वी यावर परिपूर्ण माहिती देण्याचा एक कृती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.त्यासाठी बायफ संस्था , शासन , विविध विकास यंत्रणा व संशोधन केंद्र यांना सामावून घेत कार्यक्रम केला जाणार आहे. जास्तीत जास्त हा विषय शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे हा जीवनाचा भाग असेल असे त्या आवर्जून सांगतात .
Saturday, June 22, 2024
मी लढलो मी जिंकलो आमदार डॉ .किरण लहामटे
मी लढलो मी जिंकलो आमदार डॉ .किरण लहामटे
व्हिजन पर्यटनाचे, अकोल्याच्या विकासाचे !
अकोले,(शांताराम काळे)माझे वडील शाळा मास्तर लव्हाळी ओतूर हे माझे खेडे गाव आदिवासी व दुर्गम पहिल्यापासून शिक्षणाची आवड असल्याने खेड्यात चौथीपर्यंत शिक्षण नंतर राजूर,अकोले,नगर,पुणे येथे शिक्षण घेऊन डॉक्टर झालो आदिवासी भागात रुग्णांचे होणारे हाल पाहून आदिवासी भागातच वैधकीय व्यवसाय राजूर येथे सुरू केला ,व्यवसाय करत असताना सामाजिक कामाची आवड सर्वरोग निदान शिबीर भरवून गरीब रुग्णांची सेवा केली .समाज कारणातून मनसे संघटनेशी संपर्क आला व तालुक्यात मनसे चे काम सुरू केले .२०१४नंतर राजूर येथे जिल्हा परिषद निवडणुकीत उभा राहिलो तत्पूर्वी मनसेतून भाजप पक्षात प्रवेश केला होता .विजयी झालो त्यानंतर खऱ्या अर्थाने मी राजकारणात आलो .पुन्हा जिल्हा परिषद सातेवाडी गटातून भाजप पक्षातून विजयी झालो नी माझा चढता आलेख सुरू झाला .मी आमदार होईल का ?याबाबत अनेकांना शंका होती .मात्र माझा मार्ग पिचड पितापुत्रांनी सुकर केला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी शरदचंद्र पवार यांना भेटून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला व मला विधानसभेचे तिकीट मिळाले तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मला पाठिंबा व्यक्त करत लोकवर्गणी काढून मला नोट दिली व मते दिली त्यामुळे मी प्रचंड मताने निवडून आलो चाळीस वर्षाची सत्ता व प्रस्थापित राजकारण संपविले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले त्यात दुर्दव्य असे की कोरोना आल्याने अडीच वर्षे विकास कामे करता आली नाही .विकास कामासाठी संघर्ष करावा लागला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० शिवसेनाआमदार घेऊन शिवसेनेला सोडचिट्ठी दिल्याने राज्यातील आघाडी सरकार पडले व महायुतीचे सरकार आले त्यामुळे आणखीनच अडचण झाली राष्ट्रवादी चे नेते अजितदादा यांना सर्व आमदारांनी विकास निधी मिळत नसल्याची तक्रार केली व राष्ट्रवादी पक्षानेही सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र मी तालुक्याच्या जनता व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कोणता निर्णय घ्यावा असे विचारूनच अजितदादा यांच्यासोबत गेलो त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाला उपमुख्यमंत्री पद व अर्थ खाते मिळाले मुळे तालुक्याचा विकासाचा मार्ग मोकळा झाला ,जिथे तीन चार कोटी मिळायचे तिथे १८००कोटी रुपयांचा निधी तालुक्याला मिळाला ,रस्ते,सभागृह,शाळा,ग्रामपंचायत,अंगणवाडी,प्रत्येक गावात विकासाची कामे पोहचली याचे मला समाधान आहे .तालुक्यातील वाडी वस्ती मध्ये रस्ते वीज पोहचली गेल्या चाळीस वर्षात विकास झाला नाही तो विकास माझ्या माध्यमातून झाला याचे समाधान आहे . लवकरच तालुक्यात औद्योगिक वसाहत व टोलार खिंड ही कामे मार्गी लावू हा विश्वास आ. डॉ. किरण लहामटे यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला आहे . तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मायबाप जनता आपणाला निवडून देईल तिरंगी होऊ द्या नाही तर चौरंगी विजय आपलाच असेल असेही ते म्हणाले
अकोले तालुक्यात असलेली नैसर्गिक साधन संपत्ती आणि गड किल्ले, डोंगर दऱ्या, धरणे यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यात पर्यटन वाढीस मोठा वाव आहे. यातून स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होऊ शकते, यासाठी या पर्यटनस्थळांचा विकास करण्याबरोबरच रस्ते दळणवळणाची साधने पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच पर्यटनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून लवकरच या माझ्या तालुक्यात ही संकल्पना राबविणार असून पर्यटन हा तालुक्याचा आत्मा असल्याचे अकोले विधान सभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी म्हटले आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे काश्मिर समजल्या जाणाऱ्या या माझ्या अकोले तालुक्याची पर्यटनाच्या दृष्टीकोनातून एक नवी ओळख आपल्याला निर्मान करायची आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात यास मोठा वाव तर आहेच, पण मुळा- आढळा- प्रवरा खोऱ्यातही ही संधी आहे. ब्रिटीशकालीन भंडारदरा धरणाचा रिंगरोड एक वेगळ्या पद्धतीने तयार करायचा असून या रस्त्यावर असणारे विविध धबधबे व त्याचबरोबर साम्रद येथील रिव्हर्स फॉलसारखे आगळे वेगळे पॉइंट सुशोभित करायचे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी 'सांदन दरी' इथे ही विविध सुविधा पर्यटकांना निर्माण करावयाच्या असून घाटघरचा कोकणकडा, कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यातील विविध पक्षी, प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांना ओपन सफारी गाडीची व्यवस्था करणे, भंडारदरा धरणात बोटींगसाठी स्थानिक आदिवासी तरुणांना आधुनिक बोटी खरेदी करून देणे. पर्यटनासाठी स्थानिक रानमेवा असणारे करवंदे, आवळे, हिरडा-बेहडा वर प्रक्रिया करणारे छोटे छोटे उद्योग उभारण्यासाठी स्थानिक आदिवासींना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात गड, किल्ले असून यांची म्हणावी इतकी प्रसिद्धी झालेली नाही. साठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्याठिकाणी पर्यटकांना विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करायच्याआहेत, तसेच अकोले तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीही एक माहिती पर्यटन केंद्र उभारण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरवठा सुरू आहे. अकोले तालुक्यात पर्यटकांचे आकर्शन ठरलेला ड्रीम प्रोजक्ट म्हणजे रंधा फॉल येथे 'काचेचा पुल' मंजुर करण्यात आला होता. त्याला स्थगिती मिळाली होती; परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे ती स्थगिती उठली असून हा प्रकल्प मार्गी लागला असून तो लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. काचेचा पुल हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. . या प्रोजेक्टमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून स्थानिकांनाही रोजगार वाढणार
आहे. धरण जलाशयावरचा निळवंडे धरणाच्या वरील राज्यातला सर्वांत मोठा पिंपरकणे पूल रखडला होता. तोही पूर्णत्वास जात असून त्यासाठी आपण केलेले प्रयत्न आलेले यश यामुळे परिसरातील राजूरशी तुटलेला १५ गावांचा संपर्क पुन्हा एकदा प्रस्थापित होताना राजूरची बाजारपेठ आणखी फुलेल, तसेच हा उड्डाणपूलही पर्यटकांचे आकर्षण ठरणार असुन इथे परिसरात काही पर्यटनवाढीसाठी पर्यटकांना सोयी सुविधा निर्माण करणार आहेत.
अकोले तालुक्यातील प्राचिन मंदिरांचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरवठा सुरू असून तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत इतर मंदिरांबरोबरच या मंदिरांचाही विकास करणार आहेत. पर्यटक, भाविक मोठ्या संख्येने इथे येतात. त्याठिकाणी त्या मंदिराचा इतिहास आणि पौराणिक
महात्म्य सर्वांना समजावे, यासाठी 'आमची मंदिरे हे अभियान लवकरच राबविणार आहे. या मंदिरांना विकासासाठी काही निधी प्राप्त झालाय आणि अजून काही प्राप्त होणार आहे
गोदावरी पार्कच्या धर्तीवर अकोले येथे प्रवरा पार्क प्रवरा नदीच्या काठावर निर्माण करण्यासाठी त्याला काही प्रमाणात यश आले आहे. अकोले तालुक्याची काही गोष्टीमुळे ओळख आहे. जसा
राजूरचा पेढा, अकोल्याची आवळा कँडी, चाळीस गाव डांगाणाचा भात, रानमेवा, रानभाज्या याचेही मार्केटिंग करण्याचा मानस असून या क्षेत्रात काम करणान्या मंडळींसोबत चर्चा सुरु आहे. तज्ज्ञ लोक यावर सध्या काम करीत आहेत यातून आपण रोजगार निर्मितीचा आपण विचार करतोय. प्रत्यक्षात एक वेगळे मॉडेल आपण लवकरच विकसित करणार आहोत, लवकरच अकोले तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. पर्यटनाचे फेज मिळविण्यास प्रयत्न करीत आहे.
गेल्या ४० वषाँत जी कामे झाली नाहीत. ते आपण मार्गी लावली आहेत एआयडीसी, उप जिल्हा ग्रामीण रुग्णालय, रंध्याचा काचेचा पुल, कोत पूल, तोलारखिंड फोडणे, अकोले बसस्थान अकोले बाजारतळ, पिंपरकने उड्डाणपुल अनेक कामे मार्गी लावलेअसून, आणखीही कामे मार्गी लागत आहेत.
2024 ची आशा-वैभवराव पिचड, मी लढलो मी जिंकलो..
2024 ची आशा-वैभवराव पिचड, मी लढलो मी जिंकलो....
अकोले,(शांताराम काळे)
आपल्या राजकीय वाटचालीत वडील माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मला माझ्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविता आला , आपल्या राजकीय प्रवासात अकोले तालुक्यात शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सोयी सुविधा, सिंचन योजना, ग्रामविकास योजना, शेती, दूध व्यवसाय औद्योगिक विकास वीज याचा सूक्ष्म अभ्यास करून प्रशासनासोबत काम करता आले. आपल्या समाजकल्याण सभापती पद व आमदारकीच्या कार्यकाळात विकासाचे मॉडेल तयार करून अकोले तालुक्याची विकासकामे मार्गी लावली. अकोले तालुक्यात वाडी-वस्तीवर वीज आश्रमशाळेचे जाळे, गाव तिथे रस्ता करून कोट्यवधी रुपयांची विकासगंगा तालुक्यात आणली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार असताना राज्याच्या आदिवासी विकास समितीचे सदस्य झालो त्यामुळे राज्यात दौरे करून आदिवासीच्या शिक्षणाचा प्रश्न हाताळून तसेच आदिवासी विकास योजना आदिवासी समाजापर्यंत पोहचल्या की नाही,याचा आढावा घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर केला .आदिवासींच्या शिक्षणाला मदत केली. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, यासाठी जिल्हा बँकेच्या संचालकपदी असताना बँकेमार्फत उपसा सिंचन योजनेस कर्ज उपलब्धतेसाठी प्रयत्न केले. अकोले तालुक्यातील प्रलंबित वीजजोड, घरकुले, शेततळी, आर्थिक लाभाच्या सामुदायिक व वैयक्तिक योजनांचा पाठपुरावा करून जनतेला त्याचा लाभ मिळवून दिला. अगस्ती कारखान्याचे
अकोले तालुक्याचे युवा नेतृत्व, माजी आमदार वैभव पिचड यांच्या घरी राजकीय वारसा असल्याने लहानपणापासून समाजकारणाचे बाळकडू मिळाले. आपण कॉलेज जीवनापासूनच समाजकारण व राजकारणाची कास धरून प्रवास सुरू केला. जिल्हा परिषद सदस्य, समाजकल्याण सभापती ते आमदारकी असा माझा प्रवास राहिला आहे. अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. वडील राजकारणात असले, तरी त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावरच आपली वाटचाल सुरू आहे.संचालक पदावर असताना बाहेरून ऊस आणण्यापेक्षा तालुक्यात जास्तीत-जास्त ऊस उत्पादन कसे वाढेल, यावर भर दिला. अमृतसागर दूध संघाचा अध्यक्ष असताना तोट्यात असलेला संघ नफ्यात आणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त भाव देऊन दुधाळ जनावरे घेण्यासाठी आर्थिक मदत केली. उत्कृष्ट काम करणाऱ्या दूध संस्थांना भरीव मदत करून दूध संकलन वाढविण्यासाठी आपली धडपड सुरू असते. आजही दुधाला दीड रुपया लाभांश देऊन इतर दूध संघांपेक्षा शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव दिला. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अमृतसागर दूध संघावर विश्वास वाढला. आपलं
कार्यकाळात दुधापासून इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू केले. या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दुधास प्रतिलिटर दोन रुपयांचा लाभांश विनाकपात देण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. दूध संघातील कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनसही जाहीर करण्यात आला. त्यानुसार ११ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम बँकेत वर्ग केले.
२०१४लाआमदार झाल्यानंतर युतीचे सरकार स्थापन झाले त्या काळात मी विकास निधी साठी ,शेतकऱ्यांचे प्रश्न ,मुस्लिम आरक्षण यासाठी १११आंदोलने मोर्चे केले .तालुक्याच्या विकासासाठी मोठा संघर्ष करावा लागला .सत्ता नसल्याने तालुक्याचा विकासही रखडला
मी भाजपात का गेलो ? ५वर्षे विरोधी आमदार असताना सरकारने पाहिजे तो निधी दिला नाही.पक्षानेही साथ दिली नाही त्यामुळे मी भाजपात प्रवेश करून तालुक्यात विकास कामासाठी केवळ तीन महिन्यात मोठा निधी आणला ,त्यात कोल्हार घोटी रस्ता सव्वा दोनशे कोटी रुपयांची कामे,निळवंडे जलाशय तसेच पिंपरकने पुलासाठी १५कोटींचा निधी ,उपजिल्हा रुग्णालय पाठपुरावा केला असे असूनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला मी तो स्वीकारलाही मात्र माझ्या विजयी घोडदौडीत ज्यांनी माझे सोबत काम केले माझ्या माध्यमातून पदे मिळवली प्रतिष्ठा मिळवली त्यांनी माझ्या पराभवानंतर पाठ फिरवली मात्र प्रामाणिक कार्यकर्त्यांनी माझी आजही साथ सोडली नाही ...गत विधानसभा निवडणुकीत अकोले तालुक्यात मोठा राजकीय बदल झाला.या बदलामुळे तालुक्यातील लोकांच्या आशा-अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या मात्र दीड दोन वर्षातच तालुक्यातील लोकांचा भ्रमनिराश झाला.भावनेच्या भरात मागील विधानसभा निवडणुकीत आपल्या कडून चूक झाल्याचे आता अनेक जण बोलून दाखवीत आहे.तालुक्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलू लागली आहे.2024 साठी लोक पुन्हा अपेक्षेने पाहू लागले आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत अनेक सर्वसामान्य माणसांनी,कार्यकर्त्यांनी पदरमोड करीत प्रचार केला.विकासाला मोठी गती मिळेल या अपेक्षेने बदल घडून आणला.निवडणूक प्रचारातील लहान मोठ्या आश्वासणांना लोक भुलले.पण आता वास्तवाची जाणीव झाल्यानंतर चूक झाल्याचे अनेकांना वाटू लागले आहे.लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षा मुळे प्रशासनावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही.तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.गावोगाव ग्रामसभेत लोक त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत.गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून पद्मश्री राहीबाई पोपरे यांना अवैध व्यवसायावर हल्ला बोल करावा लागला.स्वतःच्या गावातील पोलीस ठाण्यात कुणीही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचा अनुभव दस्तुर खुद्द लोक प्रतिनिधींना आला.अकोलेची एम आय डी सी लिंगदेव च्या घाटातच अडकली.तीन वर्षात तालुक्यात साधा बंधारा झाला नाही की वीज वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण झाले नाही. निळवंडेचे उच्च स्तरीय कालवे,निळवंडेच्या उड्डाण पूल,32 गाव पाणी योजना अशा अनेक प्रकल्पांची रखडपट्टी सुरूच आहे.कोरोना काळात लोकांचे मोठे हाल झाले.वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अनेकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले.कोरोना काळात आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांचा सामान्य माणसाला मोठा आर्थिक फटका बसला.तालुक्यात सुरू असणाऱ्या रस्ते आणि इतर कामांच्या दर्जा बाबत माध्यमांत सातत्याने बातम्या येत आहेत.पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीच आपल्या गावच्या रस्त्याच्या सुरू असणाऱ्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
गतवर्षी वेळेवर कारखान्याने ऊस न नेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल ,प्रशासनाकडून अडवणूक होणार नाही,अर्थिक उन्नती होऊ शकेल असे कोणतेही काम तीन वर्षात झाले नाही.गावातील रस्ते,ग्रामपंचायत व तलाठी कार्यालये,सभामंडप यालाच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही विकास म्हणत ढोल वाजविले जात आहेत.
या सर्वांचा परिणाम लोकांच्या मानसिकतेत झाला आहे.. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची आठवण होऊ लागली आहे.आजही उच्च स्तरीय कालव्याचे काम अंतिम टप्प्यात असून जुलै महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार आहे .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकाल्प अग्रक्रमाने घेऊन अकोले तालुक्यातील जनतेला पाणी देण्याचे ठरविले आहे .
सत्तेवर असताना सत्तेच्या माध्यमातून विकास योजना राबविण्यासाठी सतत आग्रही भूमिका आपण घेतलीव सत्ता नसताना विकासाच्या प्रश्नांवर,जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका तेव्हड्याच ताकतीने पार पाडली आहे,पार पाडत आहेत .विकास आणि संघर्ष या दोन्ही भूमिका .करावी लागत आहे .
विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.राज्यातही विरोधी पक्षांचे सरकार आले तालुक्यात जलसिंचनाचे प्रकल्प माझे वडील पिचड साहेब व मी दोघांनीही काम केले.इतके काम करूनही पराभव झाल्याने .वाईट वाटले .पण या पराभवाने आपण खचलो नाही .एक जबाबदार विरोधी पक्ष नेत्याची भूमिका अडीच वर्षे तालुक्यात सक्षमपणे बजावली.तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी सरकार बरोबर केलेला पत्रव्यवहार असो की प्रसंगी जनतेला भेडसावणाऱ्या लहान मोठ्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष असो,यातून जनहिताची चळवळ उभारली .आपला पराभव झाला महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले .त्यामुळे कामे झाली नाही . शिवसेना नेते एकनाथ शिंदे,राष्ट्रवादी नेते अजितदादा हे भाजपसोबत आले त्यामुळे राज्यात सत्ताबदल होऊन महायुतीचे सरकार आले .तालुक्याचे लोकप्रतिनिधी सरकारसोबत आले .त्यामुळे आपला पराभव झाला असला तरी आपली भूमिका योग्य होती हे तालुक्यालाही व विरोधकांनाही समजली मी जर विकास कामासाठी भाजपात गेलो तर माझ्या मागून आलेले देखील हीच भूमिका बजावत आहे .त्यामुळे मी तालुक्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे ही वस्तू स्थिती समोर आली व टिकाकारांची बोलती बंद झाली .विधानसभेत माझा पराभव असला तरी माझ्या भूमिकेचा हा विजयच आहे .,आता राज्यातील सत्ता बदलानंतर माझ्यावर टीका करणारे लोकप्रतिनिधी यांचीही भूमिका बदलली आहे.
2019 नंतर माझे अनेक जेष्ठ सहकारी आपणाला सोडून सत्ताधारी पक्षात गेले .पण या राजकीय वावटळीतही आपण ठाम पणे उभे आहोत .कार्यकर्त्यांना धीर देत विचलित न होता ताकदीने उभे राहण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले .माझ्या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत नाराज असणारी तरुणाई पुन्हा जवळ येऊ लागली आहे . बोलू लागली आहे
. मागील अडीच वर्षात विरोधी सत्ता असतांना तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येत माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला,राजकारणात एकटे पडलो,पण खचलो नाही.अगस्ती कारखाना निवडणुकीत फटका बसला तरीही न डगमगता अमृतसागर दूध संघात एकहाती सत्ता . अकोले नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा एक हाती विजयश्री खेचून आणली.अनेक विकास सोसायट्या ,ग्रामपंचायत आपल्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या.यापूर्वी आपण कधीही सोसायटीच्या निवडणुकीत लक्ष घालत नव्हतो पण यावेळी आवर्जून लक्ष घातले.आणि सोसायट्या वर वर्चस्व मिळविले. पुढील जिल्हा बँकेचया निवडणुकीत याचा निश्चितच लाभ होईल .महानंदा च्या संचालक पदावरही आपली बिनविरोध निवड झाली त्यामुळे पुन्हा एकदा राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
कोरोनाच्या काळात तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले, रुग्णांना,गरिबांना,आदिवासी बांधवाना मदत केली. विविध प्रश्नांवर पत्रव्यवहार करीत तत्कालीन सरकारलाही निर्णय घेण्यास भाग पाडले. जे काम विद्यमान आमदाराने करणे गरजेचे असताना ती कामे आपण मार्गी लावली. तालुक्याच्या दृष्टीने जी विकास कामे प्रलंबित आहे,होणे गरजेचे आहे त्याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, विरोधी पक्षनेते, संबंधित विभागाचे मंत्री,सचिव,जिल्हाधिकारी, इतर विभागाचे प्रमुख अधिकारी यांचे कडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला. आता राज्यातील सत्ता बदलानंतर यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील यात संदेह नाही.. भाजप पक्षनेतृत्वाने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्याच्या दृष्टीने भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करून सन्मान केला. भाजपच्या कारकिर्दीत पहिल्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास संधी मिळली राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निरीक्षक पदाची जबाबदारी येणार होती,मात्र भाजप ची कार्यप्रणाली,विचारधारा समजून घेऊन मला काम करू द्या, असे म्हणत मोठी संधी नाकारली . दिल्ली येथील पक्षाच्या पहिल्याच मिटिंग मध्ये आपल्या कामाची वेगळी छाप पडली हा मला अभिमान आहे .
परिचय
नाव: वैभव मधुकरराव पिचड गाव: राजूर, ता. अकोले
वाढदिवस: २७ एप्रिल
शिक्षण: बी. ए.
पक्ष भाजप
सध्याची पदे अध्यक्ष अमृत सागर दूध संघ
■विश्वस्त, आदिवासी उनती शिक्षण संस्था समिती
• सदस्य, आदिवासी विकास प्रकल्प समिती
महामंत्री भाजप अनुसूचित जमाती मोर्चा नवी दिल्ली
भूषविलेली पदे :
वै भव पिचड यांनी आदिवासी उनती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यायांवरील मुला-मुलींना शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले. सामान्यांना उच्य शिक्षण मिळवून देण्याचा ध्यास घेतला, शैक्षणिक कामात पारदर्शकता आणली जिला परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती असताना दारिद्यरेषेखालील कुटुंबे, समाजकल्याण विभागाच्या योजनांचा, हरिजन सुधारणा योजना, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना, शेतीच्या योजना यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून दिला. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून
चौकट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले आदर्श व आयकॉन असून देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निष्ठा ठेवून आपली सामाजिक व राजकीय वाटचाल असून कितीही संघर्ष करावा लागला तरी त्यांच्यावरील निष्ट ठेवून तालुक्याचा विकास करू असेही वैभव पिचड म्हणाले
Subscribe to:
Posts (Atom)
वन्यजीवांचीही आबाळ
Swami Amazing Saturday, June 18, 2011 वन्यजीवांचीही आबाळ राजूर, १८ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिस...
-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...