Tuesday, May 12, 2026

जननी जन्मभूमी आमदार लहामटे

अकोले, ता. १३ : “जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही सुंदर असते, याचा प्रत्यय मला माझ्या लव्हाळी गावाकडे पाहिल्यावर आजही येतो,” अशा भावनिक शब्दांत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दैनिक सकाळ प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वसलेल्या आपल्या जन्मगावाची महती, इतिहास आणि लोकसंस्कृती उलगडून सांगितली. “सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांनी वेढलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लव्हाळी गावात माझे बालपण गेले. याच मातीत मी रांगलो, खेळलो, धावलो आणि शिकलो. पुढे शिक्षणासाठी साकिरवाडी येथे गेलो, तर राजूर ही माझी कर्मभूमी ठरली,” असे ते म्हणाले. लव्हाळी गावाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी गावात रस्ते, वीज आणि पाण्याच्या सुविधा नव्हत्या. मातीची आणि कौलारू घरे हेच गावाचे वैशिष्ट्य होते. पावसाळ्यापूर्वी घरांची डागडुजी केली जाई. फुटलेली कौले बदलून नवीन कौले टाकली जात. “अशा साध्या, संघर्षमय वातावरणात माझा जन्म झाला. वडील शाळामास्तर होते, तर आई शेती आणि घरकाम सांभाळत होती. दोन भाऊ, एक बहीण आणि मी असा आमचा परिवार होता,” असे त्यांनी सांगितले. गावातील सामाजिक रचनेविषयी बोलताना त्यांनी बारा बलुतेदार पद्धतीची आठवण सांगितली. “सुतार बाबा शेतीची लाकडी कामे करायचे, लोहार बाबा नांगर, विळे, कोयते, कुऱ्हाडी तयार करून द्यायचे. परीट घोड्यावर येऊन कपडे व गोधड्या धुऊन द्यायचा. तेली वर्षभर पुरेल इतके तेल आणून द्यायचा, तर वंजारी बोंबील व मांदेली देऊन जायचा. चार महिन्यांनंतर पीक आल्यानंतर त्यांना धान्यरूपाने बिदागी दिली जायची,” असे सांगताना त्यांनी जुन्या ग्रामीण जीवनपद्धतीचे जिवंत चित्र उभे केले.“वाघ बारसं हा आमच्या गावातील अत्यंत महत्त्वाचा सण होता. त्या दिवशी आम्ही लहान मुले जंगलात जाऊन लाकडे गोळा करायचो. त्यानंतर चूल पेटवून मोठ्या भगुल्यात भाताची खीर तयार केली जायची. मग नदीच्या काठावर जाऊन अंघोळ करायचो. आमच्यातील एक जण ‘वाघ्या’ बनायचा आणि बाकीची मुले भाताचे छोटे गोळे करून त्याच्यावर मारायची. सूरपारंब्या खेळण्यात संपूर्ण दिवस कसा निघून जायचा ते समजायचेही नाही. संध्याकाळी पुन्हा नदीत डुबकी मारून जनावरे घेऊन घरी परतायचो,” असे त्यांनी सांगितले. “रात्रीच्या वेळी गावात ‘चिली पाटी’सारखे पारंपरिक खेळ रंगायचे. गावातील लोक एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे. त्या काळातील वातावरण अतिशय रमणीय आणि जिव्हाळ्याचे होते,” असे सांगताना त्यांनी जुन्या ग्रामीण जीवनातील एकोप्याची आठवण सांगितली. गावातील ‘इर्जुक’ परंपरेविषयी बोलताना ते म्हणाले, “इर्जुक म्हणजे सामुदायिक श्रमदान. एखाद्या शेतकऱ्याचे शेत तयार करणे, फुटलेला बांध बांधणे, पडघई किंवा राबणीची कामे असली की गावकरी एकत्र येऊन काम करायचे. दिवस मावळतीला गेला की तिखट-गोड जेवणाचा बेत असायचा. त्यानंतर गाणी, नाच आणि आनंदाने गाव दुमदुमून जायचे. त्या काळातील गावगाडा हा खऱ्या अर्थाने माणुसकीवर चालणारा होता.” आपल्या वडिलांच्या शिक्षणसेवेच्या आठवणी सांगताना त्यांनी म्हटले, “वडील शाळामास्तर असल्याने रात्री गावात रात्रशाळा भरायची. गावातील गायखे म्हणजे गुराखी तरुण मोठाले टोंगळे, कोपरी आणि अर्धी इजारी घालून शिकायला यायचे. त्यांना अगदी सोप्या पद्धतीने अक्षरओळख शिकवली जायची. ‘इकडून एक वाटी, तिकडून एक वाटी, मध्यभागी एक काठी म्हणजे क’ अशा पद्धतीने मूळाक्षरे शिकवली जात होती. शिक्षण, संस्कार आणि सामुदायिक जीवन हेच त्या काळातील गावाचे खरे वैभव होते,” असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

माझे गाव आमदार लहामटे

अकोले,ता.१३:आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दैनिक सकाळ प्रतिनिधींशी बोलताना आपल्या गावाची महती इतिहास लोक संस्कृती सांगताना ते म्हणाले माझं गाव...